Skip to main content

शिक्षण क्षेत्रातील मौलिकता मलीन होतेय का?

 

शुभंकरोति साहित्य परिवार
सप्ताह क्रमांक : २०२
विषय क्र. : ४
विषय : शिक्षण क्षेत्रातील मौलिकता मलीन होतेय का? (वैचारिक लेख)
शब्दांकन : योगेश गोगवेकर
परीक्षक : मा. ऋचाताई पारेख, मुंबई
संकेतस्थळ :

शिक्षण क्षेत्रातील मौलिकता मलीन होतेय का? या प्रश्नाचे उत्तर जरी सकारात्मक वाटत असले, तरी वैचारिक दृष्टीकोनातून विश्लेषण करण्यापूर्वी आपल्याला मौलिकता या शब्दाचा अर्थ नीटपणे समजून घेतला पाहिजे. मौलिकता म्हणजे केवळ नवीन कल्पना मांडणे नव्हे, तर स्वतःच्या चिंतनातून, अनुभवातून आणि नैतिक जाणीवेतून तयार झालेला स्वतंत्र व चिकित्सक विचार, ज्यात दुसऱ्याची नक्कल नसते. याचा अर्थ, मौलिकता ही पाठांतराची पुनरावृत्ती नसून अर्थनिर्मिती आहे. मौलिक शिक्षण केवळ विद्यार्थी घडवत नाही; ते विचार करणारा मनुष्य घडवते. जर शिक्षणातून मौलिकता कमी झाली, तर ज्ञान जरूर वाढेल; पण विवेक कमी होईल. माहिती मिळेल; पण दिशा हरवेल.

शिक्षण हे कोणत्याही मानवी समाजाच्या यशाचे आणि विकासाचे मूलभूत अधिष्ठान आहे. समाजाच्या बौद्धिक, सांस्कृतिक आणि नैतिक प्रगतीसाठी सुदृढ शिक्षणव्यवस्था आवश्यक आहे, याबाबत कोणाचे दुमत नाही. कोणत्याही समाजाचा शैक्षणिक दृष्टीकोन न्याय, समता आणि बंधुत्व या मूल्यांवर आधारित असायला हवा. म्हणूनच कोणत्याही देशाच्या शासनाने अशी शिक्षणव्यवस्था उभारली पाहिजे, जी समाजातील सर्व घटकांना त्यांची सामाजिक किंवा आर्थिक पार्श्वभूमी काहीही असो, त्यांना समान संधी देणारी असेल. तरीसुद्धा या चर्चेत मौलिकता हा महत्त्वाचा घटक अनेकदा दुर्लक्षित राहतो.

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय शिक्षणधोरण आखताना सामाजिक समानता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तर्कशुद्ध विचारसरणी यांना केंद्रस्थानी ठेवले. कोणतेही शिक्षण विशिष्ट धर्म, श्रद्धा किंवा अंधपरंपरांच्या प्रभावापासून मुक्त असले पाहिजे, असे त्यांचे ठाम मत होते. म्हणूनच त्यांनी वैज्ञानिक शिक्षणावर भर देत समाजात टीकात्मक विचारकौशल्ये आणि चौकशीची वृत्ती विकसित होणे आवश्यक आहे, हे अधोरेखित केले. त्यांच्या दृष्टीने वैज्ञानिक शिक्षणाचा अर्थ केवळ तंत्रज्ञान नव्हता; तर चौकशीची वृत्ती, प्रश्न विचारण्याची सवय आणि स्वतंत्र विचार करण्याची क्षमता, म्हणजेच मौलिकता जपणे होय. अशा शिक्षणातूनच संशोधन, नवीन कार्यक्रम आणि समाजनिर्मिती शक्य होते, असे त्यांना वाटत होते.

आज भारतात शिक्षणाच्या संधी वाढल्या आहेत. शाळा-महाविद्यालये, विद्यापीठे, ऑनलाइन अभ्यासक्रम आणि तंत्रज्ञानाधारित शिक्षणामुळे ज्ञानसंपादन अधिक सुलभ झाले आहे. साक्षरता वाढली, कौशल्याधारित शिक्षणाला चालना मिळाली आणि जागतिक स्पर्धेसाठी तरुण तयार होत आहेत. तरीही समाजात वाढती हिंसा, असहिष्णुता, भ्रष्टाचार, लैंगिक अत्याचार आणि आत्मकेंद्रित वृत्ती दिसून येते. मग प्रश्न उभा राहतो की इतके शिक्षण असूनही माणूस अधिक संवेदनशील का होत नाही? हा विरोधाभास सूचित करतो की शिक्षणाची वाढ झाली आहे; पण मौलिक नैतिक विचारांची वाढ झालीच असे नाही.

मौलिकता मलीन होण्याचे मुख्य कारण म्हणजे परीक्षाकेंद्रित शिक्षण. भारतीय शिक्षणाची मुख्य रचना अजूनही परीक्षा भोवती फिरते. विद्यार्थ्याला शिकविताना “योग्य उत्तर लक्षात ठेव, कारण गुण त्यावर मिळतात,” असा संदेश दिला जातो. या प्रक्रियेमुळे प्रश्न विचारण्याची किंवा वेगळा दृष्टिकोन मांडण्याची सवय हळूहळू कमी होत जाते. कोचिंग क्लासेस, गाईड्स, रेडीमेड नोट्स आणि ‘महत्त्वाचे प्रश्न’ यांच्या संस्कृतीने शिक्षणाला स्पर्धात्मक यंत्रणेत रूपांतरित केले आहे. यात विद्यार्थ्याला ज्ञानाचा शोधक नव्हे, तर उत्तरांचा ग्राहक बनवले जाते.

मौलिकता कमी होण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे आजचे शिक्षण मोठ्या प्रमाणावर रोजगारकेंद्रित झाले आहे. चांगली नोकरी, अधिक पगार आणि सामाजिक प्रतिष्ठा यांनाच अंतिम ध्येय मानले जाते. काय शिकायचे यावर भर असतो; पण का शिकायचे आणि कसे जगायचे हा प्रश्न मागे पडतो. त्यामुळे मध्यमवर्गीय पालक मुलांना जोखीम न घेता खात्रीचा मार्ग निवडण्याचा सल्ला देतात. वंचित घटकांसाठी शिक्षण हे अस्तित्व टिकवण्याचे महत्त्वाचे साधन असल्याने, त्यांनाही प्रयोगशीलतेपेक्षा निश्चित यश अधिक महत्त्वाचे वाटते. परिणामी समाजाच्या सर्व स्तरांवर एकच संदेश दिला जातो की “स्वतंत्र विचारापेक्षा सुरक्षित निकाल महत्त्वाचा.” त्यामुळे मौलिकता हा गुणधर्म न राहता धोक्याची गोष्ट वाटू लागते.

आजचे युग डिजिटल युग आहे. इंटरनेट आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे माहिती सहज उपलब्ध होते; पण त्याचबरोबर कॉपी-पेस्ट संस्कृती, तयार प्रकल्प आणि त्वरित उत्तरांवर अवलंबित्व वाढले आहे. विद्यार्थी माहिती पटकन मिळवतो; पण तिचे विश्लेषण किंवा स्वतःचे मत तयार करण्याची प्रक्रिया टाळतो. यात तंत्रज्ञान दोषी नाही; दोष त्या शैक्षणिक मानसिकतेचा आहे जी प्रक्रियेपेक्षा परिणामाला प्राधान्य देते. इथेच मौलिकता हरवताना दिसते.

नीतिमूल्ये, सहअस्तित्व, करुणा आणि सामाजिक जबाबदारी या संकल्पना अभ्यासक्रमात असल्या, तरी त्या अनेकदा पाठांतरापुरत्या मर्यादित राहतात. विद्यार्थ्यांना यश मिळवण्याचे मार्ग शिकवले जातात; पण सत्याशी प्रामाणिक राहण्याची ताकद शिकवली जात नाही. त्यामुळे बुद्धिमत्ता वाढते; पण भावनिक परिपक्वता मागे पडते. विवेकापेक्षा चलाखपणाला महत्त्व मिळते आणि हाच प्रवास मौलिकतेच्या जागी यांत्रिक यशाची संस्कृती निर्माण करतो.

सामाजिक माध्यमांनी मतप्रदर्शन सोपे केले; पण चिंतन करणे कठीण केले आहे. तात्काळ प्रतिक्रिया, आक्रमक आत्मप्रचार आणि घोषणाबाजी यांच्या वातावरणात सखोल विचाराला वेळ मिळत नाही. शिक्षणाने विचारशील नागरिक घडवायचे असताना आपण प्रतिक्रिया देणारे उपभोक्ते तयार करत आहोत. सत्यापेक्षा व्यक्तीचा प्रभाव आणि संवादापेक्षा ध्रुवीकरण या प्रवृत्ती मौलिकता मलीन करत आहेत.

ही समस्या केवळ भारतापुरती मर्यादित नाही; अनेक देशांमध्येही असेच चित्र दिसते. अमेरिकन तत्त्वज्ञ Allan Bloom यांच्या The Closing of the American Mind या पुस्तकात उच्च शिक्षणाने नैतिक स्पष्टता आणि चिकित्सक विचार गमावल्याची टीका आहे. विद्यार्थ्यांमध्ये चांगले-वाईट ओळखण्याची क्षमता कमी होत असल्याचे ते दाखवतात. त्याचप्रमाणे जर्मन मानसतत्त्वज्ञ Erich Fromm यांच्या मते शिक्षणाचे उद्दिष्ट मानवी क्षमता विस्तारणे, प्रेम आणि स्वायत्तता जोपासणे हे आहे. म्हणजेच शिक्षणाने माहिती नव्हे, तर व्यक्तिमत्त्व आणि विवेक घडवला पाहिजे. आणि हे मौलिकता असल्याशिवाय शक्य नाही. म्हणूनच इथे Martin Luther King Jr. यांचे वाक्य येथे अत्यंत समर्पक वाटते. ते म्हणतात, “नैतिकतेशिवायचे शिक्षण म्हणजे होकायंत्राशिवाय जहाज.”

मौलिकता ही फक्त शैक्षणिक मूल्य नाही; ती लोकशाहीची पायाभूत गरज आहे. ज्या समाजात प्रश्न विचारण्याची सवय कमी होते, तिथे निर्णयांवर चिकित्सक चर्चा कमी होते. शिक्षण जर विद्यार्थ्यांना फक्त माहिती देत असेल, तर ते आज्ञाधारक समाज तयार करेल; पण विचारक्षम समाज नाही. म्हणून शिक्षणातील मौलिकता मलीन होण्यापासून वाचवली पाहिजे. त्यासाठी परीक्षांच्या पलीकडे जाऊन विचारप्रक्रियेला मूल्यमापनात स्थान द्यावे लागेल. 

शिक्षकांना प्रयोग करण्याचे स्वातंत्र्य आणि अपयश स्वीकारण्याची मोकळीक द्यावी लागेल. प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा केंद्रबिंदू मानावे लागेल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समाजाने वेगळा विचार करणाऱ्या तरुणांकडे संशयाने नव्हे, तर आदराने पाहायला शिकले पाहिजे. इतिहास विवेक शिकवू शकतो, विज्ञान जबाबदारीची जाणीव करून देईल आणि साहित्य संवेदना देईल. या सर्वातून मौलिकता विकसित होण्यास मदत होईल. त्यासाठी विद्यार्थांना अवांतर वाचन, चर्चा आणि प्रश्न विचारण्याची मुभा दिल्यास विद्यार्थ्यांची बौद्धिक व नैतिक शक्ती वाढते

आज शिक्षण क्षेत्रातील मौलिकता मलीन होताना दिसत आहे. ही केवळ नीतिमूल्यांची घसरण नाही किंवा शिक्षणव्यवस्थेची अपयशकथा नाही; तर ती समाजासाठी इशाराघंटा आहे. कारण शिक्षण हेच असे साधन आहे, जे माणसातील राक्षसी वृत्तीवर विवेक, करुणा आणि मानवतेच्या बळावर मात करू शकते. मात्र त्यासाठी शिक्षणात मौलिकता केंद्रस्थानी असावी लागेल. अन्यथा प्रगतीच्या झगमगाटात माहिती वाढेल, कौशल्ये वाढतील; पण माणूस हरवेल, आणि तोच शिक्षणाचा सर्वात मोठा पराभव ठरेल.

धन्यवाद
योगेश गोगवेकर

Comments

  1. अगदी बरोबर.
    खूप छान चिंतन आणि विश्लेषण केलं आहे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...