महाराष्ट्र दिनानिमित्त... संकेतस्थळ: १ मे १९६० हा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. याच दिवशी मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ आणि मराठवाडा हे सर्व मराठी प्रांत एकत्र येऊन महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. या भूमीने आपल्या सामर्थ्याच्या बळावर मराठी संस्कृती केवळ भारतभरच नव्हे, तर जगभर पोहोचवली. महाराष्ट्राचा इतिहास हा केवळ इतिहास नाही, तर तो पराक्रम, विचार आणि संस्कृती यांचा तेजस्वी वारसा आहे. रणांगणावरचे शौर्य असो, खेळाच्या मैदानावरील कर्तृत्व असो, किंवा संगीत, साहित्य, नाटक, सिनेमा, वैद्यकीय आणि वैज्ञानिक क्षेत्रातील योगदान — प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्राने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या भूमीने संतांचा वारसा दिला, विचारवंत घडवले आणि समाजाला दिशा दिली. म्हणूनच गोविंदाग्रज आपल्या महाराष्ट्र गीतात म्हणतात, "देवी ज्ञानेश्वरी करि जिथे भक्तीचा खेळ तिथेच गीतारहस्य बसवी बुद्धीचा मेळ जिथे रंगली साधीभोळी जनाईची गाणी तिथेच खेळे श्रीपादांची कलावती वाणी." हा आपला गौरवशाली भूतकाळ आहे: पण एक प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा—आज आ...