सप्ताह क्रमांक: २१६
विषय क्रमांक: ४
विषय: मला आवडलेले पुस्तक (लेख)
शब्दांकन: योगेश गोगवेकर
परीक्षक: मा. तनुकिर्तीताई देशपांडे
संकेतस्थळ:
“पुस्तक” हे केवळ अक्षरांचे संकलन नसते; ते विचारांना दिशा देणारे माध्यम असते. काही पुस्तके माहिती देतात, काही मनोरंजन करतात, तर काही आपल्या जगाकडे पाहण्याच्या दृष्टीला नवा आकार देतात. माझ्यासाठी नरहर अंबादास कुरुंदकर लिखित जागर हे असेच पुस्तक आहे. इतिहास, समाज, धर्म, राजकारण आणि अर्थकारण यांकडे चिकित्सक नजरेने पाहण्याची दृष्टी या पुस्तकाने दिली.
नरहर कुरुंदकर हे बहुआयामी, तर्कनिष्ठ आणि प्रगल्भ लेखक होते. इतिहास, साहित्य, धर्म, राजकारण, सौंदर्यशास्त्र, संगीत अशा विविध विषयांवर त्यांनी निर्भीडपणे लेखन केले. त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही विचारसरणीचा अंध आग्रह न धरता प्रश्न विचारणे, तर्क मांडणे आणि वाचकाला स्वतः विचार करण्यास प्रवृत्त करणे. जागर हे त्यांच्या अशाच वैचारिक लेखनाचे प्रभावी उदाहरण आहे.
जागर म्हणजे जागृतीची प्रक्रिया — विचारांना जागे करण्याचा प्रयत्न. हे पुस्तक प्रथम वाचले तेव्हाही त्याचा प्रभाव पडला होता; पण भारतातील सध्याच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीकडे पाहताना हे पुस्तक पुन्हा वाचावेसे वाटले. २५६ पृष्ठांचे हे पुस्तक अल्पावधीत वाचून संपले; पण त्यातील विचारांचा प्रवास मनात दीर्घकाळ रेंगाळत राहिला. १९६९ मध्ये प्रकाशित झालेले असूनही त्यातील विचार आजही आश्चर्यकारकरित्या समकालीन वाटतात. त्यामुळेच हे पुस्तक चर्चित पुस्तकांच्या गर्दीतही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करते.
आज प्रसिद्धी माध्यमे, समाजमाध्यमे आणि डिजिटल व्यासपीठांवर दररोज असंख्य पुस्तके, विचार, भाष्ये आपल्यावर कोसळत असतात. अनेकदा ही पुस्तके तात्कालिक प्रतिक्रियांचे, सनसनाटी मतांचे किंवा एकांगी विचारसरणीच्या प्रचाराचे माध्यम ठरतात. जागर मात्र यापेक्षा वेगळे आहे. आजच्या ‘त्वरित मतनिर्मिती’च्या युगात अनेक पुस्तके उत्तरं देतात; जागर मात्र प्रश्न विचारायला शिकवते. हेच त्याचे वैशिष्ट्य आहे. म्हणूनच हे पुस्तक आजही प्रासंगिक आणि वेगळे वाटते.
कुरुंदकर समाजवादी विचारसरणी असलेल्या राष्ट्र सेवा दलाशी संबंधित होते. जागरमधील अनेक लेख राष्ट्र सेवा दलाच्या शाखांवरील बौद्धिक चर्चांमधून आकाराला आलेले दिसतात. मात्र, कुरुंदकर कोणतीही गोष्ट आंधळेपणाने स्वीकारत नाहीत. आपल्या प्रस्तावनेत ते म्हणतात, “गेले कैक वर्षे आपण राजकारणाचा अभ्यास करणे सोडून दिले आहे. जाहीर सभेतील व्याख्याने, पुस्तके आणि लेख यांच्या आधारे आपण राजकारणाचा विचार करत आहोत.” ते पुढे सांगतात की राजकारणाचा विचार राजकीय प्रवाहाच्या संदर्भात करायचा असतो व राजकीय नेत्यांच्या वर्तनाची त्यांच्या व्याख्यानांत सुप्तपणे दडलेल्या ध्वन्यर्थाशी संगती लावून राजकारणाचा विचार करायचा असतो, ही शिस्तच आपण सोडून दिलेली आहे.
या काही ओळी आजच्या काळात अधिक अर्थपूर्ण वाटतात. सोशल मीडियावरील फॉरवर्ड्स, पक्षनिष्ठ प्रचार आणि भावनिक प्रतिक्रियांच्या गोंधळात चिकित्सक विचार हरवत चालल्याची जाणीव प्रकर्षाने होते. अशा वेळी या पुस्तकाचा प्रभाव अधिक जाणवतो; कारण ते वाचकाला स्वतःशी संवाद साधण्यास आणि विचार करण्यास भाग पाडते.
जागरची विभागणी तीन भागांत केलेली आहे. पहिल्या भागात बुद्धिजीवी वर्गाचे वैफल्य, राष्ट्रीय एकात्मता, समाजवादी शक्तींची पीछेहाट, मार्क्सवाद, विकेंद्रीकरण यांचा विचार आहे. दुसऱ्या भागात महात्मा गांधी : एक चिंतन आणि शांतिदूत नेहरू ही व्यक्तीविश्लेषणे आहेत. तिसऱ्या भागात सेक्युलरिझम, धर्म, इस्लाम आणि राजकीय विचारांची चिकित्सा आहे. या भागातील लेख वाचताना मला अनेक पूर्वग्रहांवर नव्याने विचार करावा लागला.
पहिल्याच भागात “बुद्धिजीवी वर्गाचे वैफल्य” या लेखात कुरुंदकरांनी चिकित्सक वृत्तीचा अभाव दाखवून दिला आहे. समाजातील बुद्धिजीवी वर्ग आधुनिकतेचा पुरस्कार करत असला तरी तो अनेकदा तडजोडींच्या सापळ्यात अडकतो, असे त्यांचे निरीक्षण आहे. या तडजोडवादी प्रवृत्तीमधून आजचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
असे सांगून कुरुंदकर म्हणतात की मागासलेल्या समाजात परंपरागत श्रद्धा अतिशय प्रबळ असतात. या श्रद्धांचा उच्छेद करण्याची आमची इच्छा नाही, आणि या श्रद्धा आहेत तशा स्वीकारण्याची आमची तयारी नाही. याचे कारण सांगताना कुरुंदकर म्हणतात की जातीयवादाच्या मर्यादा फक्त समाजालाच पडल्या आहेत, असे नसून त्या बुद्धिजीवी वर्गालाही पडल्या आहेत. तसेच बहुजन समाजातील शेतकरी वर्ग आपल्या जातीजमातीतील लोकांच्या नेतृत्वाखाली कसा भराडला गेला आहे याचे पद्धतशीरपणे विश्लेषण त्यांनी केले आहे.
समाजवादी तत्त्वज्ञान आणि मार्क्सवाद: तत्त्व आणि व्यवहारमध्ये ते सांगतात की ज्या देशात औद्योगिककरण पुरे झाले होते अशा देशात क्रांती प्रथम व्हायला हवी होती असे सांगून कुरुंदकर मार्क्सवादी तत्त्वज्ञानातील व्यवहारिक मर्यादा चिकित्सकपणे उलगडतात.
जागरच्या दुसऱ्या भागात महात्मा गांधी : एक चिंतन या लेखातील त्यांचे निरीक्षण प्रश्न उपस्थित करणारे वाटते. ते लिहितात की अनेक राजकीय लोकांना गांधी धार्मिक वाटतात, तर अनेक धार्मिक लोकांना गांधी शत्रू वाटतात. एका संताने आपले विचार व्यवहारात आणण्याचा प्रयत्न केला की समाजातील परंपरावादी गट अस्वस्थ होतात, ही त्यांची मांडणी फारच प्रभावी आहे.
कुरुंदकर गांधीजींच्या धार्मिकतेविषयी म्हणतात, “गांधीजीसारखे लोक पवित्र असतात, संत असतात; पण खऱ्या अर्थाने ते धार्मिक नसतात.” त्यांच्या मते प्रथमदर्शनी असा माणूस सर्व धर्माचा पूजक दिसतो पण खऱ्या अर्थाने तो कोणताच धर्म मानत नसतो. म्हणून गांधींच्या नेतृत्वाचे त्यांनी केलेले विश्लेषण कोणत्याही अंधश्रद्धेशिवाय, पण आदरपूर्वक आहे.
तसेच शांतिदूत नेहरू या लेखात नेहरूंच्या उणिवा नाकारल्या नाहीत, पण त्यांच्या दूरदृष्टीचे महत्त्वही कमी केले नाही. व्यक्तीपूजा किंवा द्वेष यांपलीकडे जाऊन केलेले हे संतुलित विश्लेषण आज दुर्मिळ वाटते.
तिसऱ्या भागात सेक्युलरिझम, धर्म, इस्लाम आणि राजकीय विचारांची सखोल चिकित्सा केलेली आहे. सेक्युलरिझम आणि इस्लाम या लेखात कुरुंदकर इस्लामी समाजातील काही प्रवाह आधुनिकता व धर्मसुधारणेशी संघर्ष करताना दिसतात, असे निरीक्षण नोंदवतात. त्या संदर्भात सेक्युलरिझमच्या प्रक्रियेतील अडथळ्यांची ते चिकित्सा करतात. त्याचवेळी हिंदू समाजातील सनातनी मनोवृत्तीही सेक्युलर मूल्यांच्या आड येते, हे ते निर्भयपणे मांडतात.
त्यांचा शेवटचा लेख राजकीय शोध आणि बोध फारच सुंदर आहे. हा लेख प्रत्येकाने वाचावा असे वाटते; कारण तो वाचल्यानंतर राजकीय, आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांकडे अधिक चिकित्सक नजरेने पाहण्याची प्रेरणा मिळते.
इथे लेखक भारतीय राजकारणाच्या संदर्भात मुस्लीम प्रश्नाचा विचार हिंदू मनामधील दुःखाच्या संदर्भात करतात. ते करण्याचे कारण म्हणजे भारताची फाळणी आहे असे सांगून फाळणीमागील ऐतिहासिक व मानसिक गुंतागुंत ते सूक्ष्मपणे उलगडतात.
कुरुंदकरांची लेखनशैली हे पुस्तक विशेष ठरण्याचे आणखी एक कारण आहे. त्यांची शैली उपदेशात्मक नाही; ती संवादात्मक आहे. ते निष्कर्ष वाचकावर लादत नाहीत, तर प्रश्नांच्या मालिकेतून वाचकाला स्वतः निष्कर्षापर्यंत पोहोचवतात. एखाद्या गुंतागुंतीच्या विषयाला ते सोप्या पण प्रभावी शब्दांत उलगडतात. त्यांच्याकडे अभ्यासाची खोली आहे; पण त्याचे प्रदर्शन नाही. त्यामुळे पुस्तक बौद्धिक असूनही अवघड वाटत नाही. उलट प्रत्येक प्रकरणानंतर वाचक अधिक प्रश्न विचारू लागतो.
तथापि, सजग वाचक म्हणून काही त्रुटीही जाणवल्या. काही लेखांची भाषिक व वैचारिक घनता इतकी दाट आहे की नव्या वाचकाला मधेच थांबून संदर्भ शोधावे लागतात. काही ठिकाणी लेखकाच्या वैचारिक भूमिकेची तीव्रता पर्यायी मतांशी पुरेशा संवादात येत नाही, अशी जाणीव काही वाचकांना होऊ शकते. त्यामुळे पुस्तकाची वाचनीयता काही ठिकाणी कमी होते. ही मर्यादा पुस्तकाच्या वैचारिक गाभ्यामुळे निर्माण झालेली असल्याने ती काही अंशी अपरिहार्यही वाटते.
आजच्या डिजिटल युगात नवनवीन माध्यमांतून लेखक-लेखिका सतत वाचकांसमोर येत आहेत. एक सजग वाचक म्हणून माझी अपेक्षा असते की पुस्तकाने मला विचार द्यावा, प्रश्न विचारायला शिकवावे, पूर्वग्रह मोडावेत आणि स्वतःची भूमिका निर्माण करण्यास प्रवृत्त करावे. जागर हे पुस्तक ही अपेक्षा पूर्ण करते. ते वाचकाला कोणत्याही मतप्रवाहाचे आंधळे अनुकरण शिकवत नाही; उलट विवेक, चिकित्सा आणि बौद्धिक प्रामाणिकता शिकवते.
हे पुस्तक वाचल्यानंतर माझ्या इतिहास, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात बदल झाला. गांधी, नेहरू, सेक्युलरिझम, धर्म आणि राजकीय प्रक्रियांकडे अधिक डोळसपणे पाहण्याची प्रेरणा मिळाली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कुठलीही गोष्ट अंधपणे स्वीकारण्याऐवजी तिचा चिकित्सक विचार करण्याची सवय लागली.
म्हणूनच जागर हे माझे आवडते पुस्तक आहे. ते केवळ माहिती देणारे पुस्तक नाही; तर विचारांना अस्वस्थ करणारे, प्रश्न विचारण्याचे धाडस देणारे आणि विवेकाच्या दिशेने नेणारे बौद्धिक जागरण आहे. पुस्तक वाचून संपते, पण त्यातून सुरू होणारा विचारांचा प्रवास मात्र दीर्घकाळ मनात चालू राहतो.
धन्यवाद
योगेश गोगवेकर

यशोदा भागवत
ReplyDelete