Skip to main content

प्रतिक्रिया देताना कमीत-कमी दोन वेळा विचार व्हावा (वैचारिक लेख)

 

शुभंकरोति साहित्य परिवार
विषय क्रमांक: ४
विषय: प्रतिक्रिया देताना कमीत-कमी दोन वेळा विचार व्हावा (वैचारिक लेख)
परीक्षक: मा. राधिकाताई भांडारकर, पुणे
शब्दांकन: योगेश गोगवेकर, माहीम, मुंबई
संकेतस्थळ:

आजच्या वेगवान जगात प्रतिक्रिया देणं अत्यंत सोपं झालं आहे; पण योग्य प्रतिक्रिया देणं मात्र तितकंच कठीण झालं आहे. एखादी घटना घडते, एखादा संदेश आपल्या मोबाईलवर येतो, आणि आपण क्षणाचाही विलंब न करता त्यावर मत व्यक्त करतो. पण त्या प्रतिक्रियेमागे विचार किती असतो? आपण जे बोलतो आहोत, ते खरंच योग्य आहे का, याचा आपण स्वतःला प्रश्न विचारतो का? म्हणूनच आजच्या काळात प्रतिक्रिया देण्यापूर्वी किमान दोनदा विचार करणे ही केवळ गरज नसून जबाबदारी आहे.

आपण सध्या सत्योत्तरी (Post-Truth) युगात जगत आहोत. या युगात सत्य आणि असत्य यांच्यामधली रेषा अधिकाधिक धूसर होत चालली आहे. माहितीचा प्रचंड ओघ आपल्या समोर येतो; परंतु त्या माहितीमागचं सत्य शोधण्याची सवय मात्र कमी होताना दिसते. अशा परिस्थितीत घाईघाईत दिलेली प्रतिक्रिया अनेकदा चुकीची ठरते आणि तिचे दुष्परिणामही मोठे असतात.

आज समाजमाध्यमांनी संवादाच्या सीमा विस्तारल्या आहेत. व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक यांसारख्या माध्यमांमुळे माहिती काही क्षणांत हजारो-लाखो लोकांपर्यंत पोहोचते. परंतु या वेगासोबतच एक मोठं आव्हानही निर्माण झालं आहे—ते म्हणजे माहितीची सत्यता. खोटी, अर्धवट किंवा दिशाभूल करणारी माहिती मोठ्या प्रमाणात पसरते आणि आपण तिच्यावर विचार न करता प्रतिक्रिया देतो. अशा प्रतिक्रिया बहुधा भावनांच्या भरात दिलेल्या असतात, आणि नंतर त्या चुकीच्या ठरतात.

प्रचार आणि अपप्रचार यांचा इतिहास नवा नाही. विसाव्या शतकात हिटलर, मुसोलिनी आणि स्टालिन यांसारख्या हुकूमशहांनी लोकांच्या भावनांवर परिणाम करून आपली सत्ता प्रस्थापित केली. माध्यमांचा वापर करून त्यांनी खोटं सत्य म्हणून लोकांसमोर मांडलं. याच पार्श्वभूमीवर जॉर्ज ऑर्वेल यांच्या “1984” या कादंबरीत ‘बिग ब्रदर’च्या माध्यमातून विचारांवर नियंत्रण ठेवणाऱ्या सत्तेचं प्रभावी चित्रण आढळतं. या उदाहरणांमधून एक गोष्ट स्पष्ट होते—माहितीचा गैरवापर करून लोकमत घडवण्याची प्रक्रिया जुनी असली, तरी आजच्या डिजिटल युगात ती अधिक वेगवान आणि व्यापक झाली आहे.

आजच्या काळात फोटोशॉप केलेली चित्रे, बनावट व्हिडिओ, आणि चुकीचे संदर्भ देणारे संदेश सहज तयार होतात आणि वेगाने पसरतात. अनेकदा हे संदेश आपल्या भावना भडकवणारे असतात. परिणामी, आपण विचार न करता त्यावर प्रतिक्रिया देतो आणि नकळतपणे त्या अपमाहितीच्या प्रसारात हातभार लावतो.

रवी आमले यांच्या “प्रोपगंडा” या पुस्तकात माहिती कशी वळवली जाते आणि लोकांच्या भावनांवर कसा परिणाम केला जातो, याचा सखोल ऊहापोह केला आहे. ते स्पष्ट सांगतात की, अपूर्ण माहितीच्या आधारे मत बनवणं धोकादायक असतं. म्हणूनच, पूर्ण माहिती नसताना प्रतिक्रिया देण्याऐवजी ती टाळलेलीच अधिक शहाणपणाची ठरते.

तसेच, जेसन स्टानली यांच्या “How Propaganda Works” या पुस्तकात प्रचारतंत्राचा सखोल अभ्यास मांडला आहे. ते सांगतात की, सत्याचा शोध घेण्याची वृत्ती जपली पाहिजे. आपण जर सत्याची साथ सोडली, तर आपण आपलं विचारस्वातंत्र्य गमावतो. म्हणूनच, प्रतिक्रिया देण्यापूर्वी माहितीची पडताळणी आणि सखोल विचार आवश्यक आहे.

याच संदर्भात एक वैयक्तिक अनुभव सांगावासा वाटतो. आमच्या कुटुंबाच्या व्हॉट्सअ‍ॅप गटावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने एक चुकीची माहिती शेअर करण्यात आली होती. त्या पोस्टमध्ये एका पुस्तकाचा चुकीचा संदर्भ देऊन त्यांच्या विचारांचे विपर्यास करण्यात आले होते. विषयाची माहिती असल्यामुळे मी शांतपणे, पुराव्यांसह त्या पोस्टला उत्तर दिलं. योग्य संदर्भ दिले आणि त्या माहितीतील चुका स्पष्ट केल्या. परिणामी, गटातील इतर सदस्यांपर्यंत खरी माहिती पोहोचली आणि गैरसमज दूर झाला. या अनुभवातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली—विचारपूर्वक दिलेली प्रतिक्रिया केवळ योग्यच ठरत नाही, तर ती समाजात सकारात्मक बदल घडवू शकते.

आपण अनेकदा एखाद्या व्यक्तीच्या वागण्यावर किंवा बोलण्यावर तात्काळ प्रतिक्रिया देतो. पण त्या व्यक्तीच्या परिस्थितीचा, भावनांचा किंवा पार्श्वभूमीचा विचार करत नाही. जर आपण दोन क्षण थांबून विचार केला, तर आपली प्रतिक्रिया अधिक समजूतदार आणि संतुलित होऊ शकते. “मी जे बोलतो आहे ते योग्य आहे का?”, “यामुळे कुणाला दुखावलं जाईल का?”, “मला संपूर्ण सत्य माहिती आहे का?”—असे प्रश्न स्वतःला विचारल्यास आपली प्रतिक्रिया अधिक जबाबदार बनते.

आज अनेक वाद, गैरसमज आणि नात्यांमध्ये आलेला दुरावा हा अशा घाईघाईत दिलेल्या प्रतिक्रियांमुळेच निर्माण होतो. क्षणिक भावनेच्या भरात दिलेली प्रतिक्रिया नंतर पश्चात्तापाचे कारण ठरते. त्यामुळे प्रतिक्रिया देताना थोडा वेळ घेणं ही कमजोरी नसून परिपक्वतेची खूण आहे.

याचाच अर्थ असा आहे की प्रत्येक घडत असलेल्या घटनांचा शोध घेण्याचा प्रयत्न माणसाने केला पाहिजे. प्रदीर्घ लेख वाचण्यात किंवा चांगली पुस्तके वाचण्यात वेळ गुंतवला पाहिजे. प्रचाराच्या मोहिमांबद्दल सत्य मांडणाऱ्या वेबसाईटची माहिती करून घेऊन ती माहिती इतरांना सांगत राहिली पाहिजे.

शेवटी, प्रतिक्रिया देणं अपरिहार्य आहे; पण ती कशी आणि केव्हा द्यायची हे आपल्या हातात आहे. म्हणूनच, प्रत्येक वेळी प्रतिक्रिया देण्यापूर्वी दोन क्षण थांबून विचार करण्याची सवय लावली, तर आपण अधिक सजग, संवेदनशील आणि जबाबदार व्यक्ती बनू शकतो.

प्रतिक्रिया देणं सोपं आहे; पण योग्य प्रतिक्रिया देणं हीच खरी शहाणपणाची कसोटी आहे.

धन्यवाद
योगेश गोगवेकर

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...