Skip to main content

A New Structural Transformation of the Public Sphere and Deliberative Politics by Jürgen Habermas-पुस्तक विश्लेषण

 

विषय : पुस्तक विश्लेषण
पुस्तकाचे नाव : A New Structural Transformation of the Public Sphere and Deliberative Politics
लेखक : Jürgen Habermas
पृष्ठे : १०२
प्रकाशक : Polity Press
शब्दांकन : योगेश गोगवेकर, माहीम, मुंबई
संकेतस्थळ :

आजच्या डिजिटल युगात माणूस पूर्वीपेक्षा अधिक जोडला गेला आहे, पण तो तितकाच तुटलाही आहे. संवादाची साधने वाढली, माहितीचा महास्फोट झाला, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला; परंतु तरीही समाजात परस्परविश्वास कमी होताना दिसतो. मतभेद संवादातून मिटण्याऐवजी संघर्षात रूपांतरित होत आहेत. अशा काळात Jürgen Habermas यांचे A New Structural Transformation of the Public Sphere and Deliberative Politics हे पुस्तक केवळ राजकीय किंवा सामाजिक विश्लेषण म्हणून समोर येत नाही, तर ते आधुनिक लोकशाहीच्या आत्मपरीक्षणाचा एक गंभीर दस्तऐवज बनते.

जर्मन भाषेत लिहिले गेलेले हे पुस्तक इंग्रजीमध्ये Ciaran Cronin यांनी भाषांतरित केले आहे. अवघ्या शंभर पानांच्या आसपास असलेले हे पुस्तक आकाराने छोटे असले, तरी त्यातील विचारांचे विश्व अत्यंत व्यापक आहे. हे पुस्तक वाचताना जाणवते की हाबरमास केवळ तत्त्वज्ञ नाहीत; ते लोकशाहीच्या जिवंत स्पंदनांबद्दल काळजी करणारे विचारवंत आहेत.

हाबरमास यांनी १९६२ मध्ये The Structural Transformation of the Public Sphere: An Inquiry into a Category of Bourgeois Society हा महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिला होता. त्यात त्यांनी “Public Sphere” अर्थात “सार्वजनिक क्षेत्र” ही संकल्पना मांडली. त्यांच्या मते सार्वजनिक क्षेत्र म्हणजे अशी एक सामाजिक जागा, जिथे नागरिक समान प्रश्नांवर मुक्तपणे चर्चा करतात, विचारांची देवाणघेवाण करतात आणि जनमत घडवतात. लोकशाहीचा खरा प्राण निवडणुकांत नसून संवादात आहे, हा त्यामागील मूलभूत विचार होता.

मात्र गेल्या सहा दशकांत जग झपाट्याने बदलले. बाजारपेठेचे वाढते वर्चस्व, माध्यमांचे व्यापारीकरण, इंटरनेटचा उदय आणि सोशल मीडियाचे सर्वव्यापी अस्तित्व यांनी सार्वजनिक क्षेत्राची रचना पूर्णतः बदलून टाकली. या बदलांची नोंद घेत हाबरमास यांनी २०२३ मध्ये A New Structural Transformation of the Public Sphere and Deliberative Politics या नव्या ग्रंथातून आपल्या पूर्वीच्या विचारांचे पुनरावलोकन केले आहे.

या पुस्तकातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेखकाची चिंता. ती तंत्रज्ञानाविषयी नाही; ती माणसाविषयी आहे. हाबरमास डिजिटल माध्यमांचे महत्त्व नाकारत नाहीत. उलट, ते मान्य करतात की सोशल मीडियामुळे सामान्य माणसालाही आवाज मिळाला आहे. पूर्वी मुख्य प्रवाहातील माध्यमांपासून दूर असलेल्या समाजघटकांनाही आता स्वतःची भूमिका मांडण्याची संधी मिळते. परंतु या लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेसोबतच अनेक गंभीर प्रश्नही निर्माण झाले आहेत.

आज माहितीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे, पण सत्य अधिक धूसर झाले आहे. “फेक न्यूज”, ट्रोल संस्कृती, दिशाभूल करणारी माहिती आणि “Echo Chambers” यामुळे समाजातील संवाद हळूहळू बंदिस्त होत चालला आहे. माणूस आता स्वतःच्या मतांना पुष्टी देणारी माहितीच पाहतो आणि विरोधी विचारांना नाकारतो. परिणामी विचारांची देवाणघेवाण थांबते आणि संघर्षाची दरी अधिक खोल होत जाते. संवादाची जागा प्रतिक्रिया घेतात आणि विवेकाच्या जागी उत्तेजना येते.

हाबरमास यांना सर्वाधिक चिंता आहे ती पत्रकारितेच्या बदलत्या स्वरूपाची. त्यांच्या मते पूर्वी पत्रकारिता ही समाजाप्रती उत्तरदायी होती. तथ्यपडताळणी, संपादकीय मूल्ये आणि सामाजिक बांधिलकी यांना महत्त्व होते. परंतु आज माध्यमांवर बाजारपेठेचे वर्चस्व वाढले आहे. TRP, क्लिकबेट आणि अल्गोरिदम यांच्या शर्यतीत माहितीचे गांभीर्य हरवत चालले आहे. सनसनाटीपणा, तत्काळ प्रतिक्रिया आणि भावनिक उत्तेजना यांना अधिक महत्त्व मिळत आहे. त्यामुळे सार्वजनिक चर्चा उथळ होत चालल्याची खंत पुस्तकात वारंवार जाणवते.

या पुस्तकाची शैली तात्त्विक आहे; काही ठिकाणी ती क्लिष्टही वाटू शकते. पण त्यामागील मानवी अस्वस्थता अत्यंत स्पष्ट आहे. हाबरमास यांना लोकशाही टिकवायची आहे आणि त्यासाठी संवादसंस्कृती जिवंत राहणे आवश्यक आहे, असे ते सातत्याने सांगतात. लोकशाही केवळ मतदानावर उभी राहत नाही; ती विवेकपूर्ण चर्चेवर, परस्पर आदरावर आणि सत्याच्या शोधावर टिकून असते, हा त्यांचा ठाम विश्वास आहे.

आजच्या काळात हे पुस्तक अधिक महत्त्वाचे वाटते, कारण आपण माहितीच्या महासागरात राहतो; पण समजुतीच्या दुष्काळात जगतो. संवादाचे माध्यम वाढले, पण संवादाची गुणवत्ता कमी झाली. प्रत्येकाकडे मत आहे, पण ते ऐकून घेण्याची तयारी कमी झाली आहे. अशा वेळी हाबरमास यांचे हे पुस्तक आपल्याला थांबून विचार करायला भाग पाडते.

हे पुस्तक वाचताना सतत जाणवत राहते की लोकशाहीचा खरा शत्रू मतभेद नाहीत; तर संवादाचा अभाव आहे. कारण जिथे संवाद संपतो, तिथे लोकशाही कमकुवत होऊ लागते.

म्हणूनच या पुस्तकाचा सर्वात प्रभावी संदेश असा आहे की, “लोकशाही केवळ निवडणुकांनी जिवंत राहत नाही; ती जिवंत राहते विचारपूर्वक, जबाबदार आणि तर्काधारित संवादामुळे.”

धन्यवाद
योगेश गोगवेकर

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...