Skip to main content

महात्मा फुले स्त्रीशिक्षणाचे पुरस्कर्ते (लेख)


शुभंकरोति साहित्य परिवार
सप्ताह क्रमांक : २०९
विषय क्र. : ४
विषय : महात्मा फुले स्त्रीशिक्षणाचे पुरस्कर्ते (लेख)
शब्दांकन : योगेश गोगवेकर, मुंबई
परीक्षक : सौ सपनाताई फुलझेले नागपूर
संकेतस्थळ:

आधुनिक भारताच्या इतिहासात महात्मा फुले यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. आधुनिक भारताचे निर्माते म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. त्यांचे कार्य एवढे व्यापक आहे की, त्याचा आढावा घेतल्याशिवाय आधुनिक भारताचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. शतकानुशतके अंधकारात चाचपडणाऱ्या बहुजन समाजाला आणि विशेषतः स्त्रियांना शिक्षण मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे.

ते म्हणत असत की, शिक्षणाचा उपयोग फक्त उदरनिर्वाहासाठी नसून गुलामगिरीतून मुक्तता मिळवण्यासाठी आणि वैचारिक दृष्टीकोन वैज्ञानिक बनवण्यासाठी होतो. शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी म्हटले आहे—
“विद्येविना मती गेली | मतिविना नीती गेली ||
नीतीविना गती गेली | गतिविना वित्त गेले ||
वित्ताविना शूद्र खचले | इतके अनर्थ एका अविद्येने केले ||”
या ओळींतून शिक्षणाशिवाय समाजाची होणारी दुरवस्था स्पष्ट होते.

अशा या आधुनिक महात्मा फुलेंचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. त्यावेळी पेशवाई अस्ताला जाऊन जवळजवळ एक दशकाचा काळ लोटला होता आणि ब्रिटिश साम्राज्य महाराष्ट्रात सगळीकडे विस्तारलेले होते. त्या पार्श्वभूमीवर समाजातील अनेक स्तरांवर अधोगती झाली होती; समाज जणू कुंठित झाला होता. सांस्कृतिक गुणांचा अत्यंत ऱ्हास झाला होता. धार्मिक वातावरण खूपच खराब झाले होते. त्या कालखंडात बौद्धिक आणि शारीरिक मूल्यांचा पूर्णपणे ऱ्हास झाला होता. त्यावेळी पहिला इंग्रज जिल्हाधिकारी असलेल्या रॉबटसन याला दुर्गुणांचे भयानक रूप पाहून धक्का बसला होता.

अशा वातावरणात महात्मा फुले मोठे होत होते. एका स्कॉटिश मिशनच्या इंग्रजी शाळेमधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. शाळेत असतानाच त्यांना मानवी कर्तव्य आणि हक्कांची जाणीव झाली. त्यांचा विवाह १८४० मध्ये खंडोजी नेवासे पाटील यांची कन्या सावित्रीबाई यांच्याशी झाला. 

त्यांना वाचनाची फार आवड होती. थॉमस पेन यांच्या राईटस ऑफ मॅन आणि एज ऑफ रिझन या ग्रंथाने त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले आणि भारतीय समाज सुधारायचा असेल तर त्यासाठी शिक्षण सर्व जाती-जमातींना मग तो पुरुष असो अथवा स्त्री असो, सर्वांना मिळाले पाहिजे असे त्यांचे मत झाले. यासाठीच त्यांनी शिक्षणाची चळवळ उभी केली. वयाच्या २१व्या वर्षीच त्यांनी स्त्रीला तिच्या प्राचीन गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी त्यांना शिक्षण देण्याचा विडा उचलला. जर देशाची प्रगती झपाट्याने व्हायची असेल तर मुलींच्या शिक्षणासाठी शाळा काढणे गरजेचे आहे यावर त्यांचे विचार ठाम झाले. ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगते उद्धरी’ या सत्याचा प्रत्यय त्यांना आला.

भारतामध्ये स्त्री शिक्षणाकडे दुर्लक्ष करण्यात येते या बद्दलची माहिती अहमदनगर जिल्ह्यातील मिशनरी शाळेमध्ये शिकवणाऱ्या मिस फॅरारबाईनी महात्मा फुले यांना दिली. त्या काळात पुरुषांच्या शाळांपेक्षा स्त्रियांच्या शाळांची गरज अधिक प्रकर्षाने जाणवत होती. जेव्हा या स्त्रियांची मुले दुसऱ्या, तिसऱ्या वर्षात शिकायला जातात तेव्हा स्त्रिया आपल्या मुलांना शिक्षणासाठी चांगले वळण लावू शकतील असे त्यांना दिसून आले. म्हणून त्यांनी पुण्यात बुधवार पेठेत भिड्यांच्या वाड्यात १८४८ मध्ये त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. ही शाळा एका भारतीय माणसाने स्वतःच्या प्रयत्नाने आणि खर्चाने सुरू केलेली पहिली मुलींची शाळा होती. स्त्रीशिक्षणाची हीच खरी मुहूर्तमेढ ठरली.

ज्या काळात स्त्रियांनी शिक्षण घ्यावे ही कल्पनाच समाजाला मान्य नव्हती. त्याकाळात महात्मा फुलेंनी स्त्रियांना शिकवण्याचा निर्धार केला. तेव्हा सनातनी विचारांच्या लोकांनी त्यांना भरपूर विरोध केला. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यावेळी सरकारी अनुदानाची पद्धत नसल्यामुळे त्यांना आर्थिक संकटांचाही सामना करावा लागला.

यात सर्वात मोठी अडचण होती ती म्हणजे स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी कोणतीही भारतीय हिंदू स्त्री उपलब्ध नव्हती. मिशनरीमध्ये शिकवत असलेल्या बायकांकडे हिंदू समाजातील मुली शिकण्यासाठी येणार नाही याची कल्पना महात्मा फुलेंना होती. या सर्वातून मार्ग महात्मा फुलेंनीच शोधून काढला. त्यांनी प्रथम आपल्या पत्नीस शिक्षणासाठी प्रवृत्त केले आणि स्वतः त्यांना शिक्षण दिले. सावित्रीबाईही आनंदाने शिकल्या आणि महात्मा फुलेंनी सुरू केलेल्या शाळेत पहिल्या महिला शिक्षिका म्हणून रुजू झाल्या.

१८४८ मध्ये महिलांसाठी एक शाळा सुरू झाली. त्यांची संख्या १८५७ पर्यंत ३३५ झाल्याचे दिसून येते. पुढे शाळेसाठी व्यवस्थापक मंडळ उभारणे, शाळेच्या खर्चाने मुलींना शाळेत आणण्याची आणि घरी पोहोचविण्याची व्यवस्था करणे, परीक्षेचा निकाल चांगला देऊन शाळेचे नाव शैक्षणिक दृष्टीकोनातून मोठे करणे हे काम महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांनी केले.

याची दाखल इंग्रज सरकारने देऊन त्यांनी मेजर कॅंडी मार्फत या फुले दांपत्याचा सत्कार केला आणि त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना मानपत्र देण्यात आले. या विषयी लिहिताना धनंजय कीर यांनी महात्मा फुले या चरित्र ग्रंथात म्हटले आहे की मुलींची शाळा काढून महात्मा फुलेंनी स्त्रीशिक्षण-क्षेत्रात जे प्रचंड कार्य केले होते त्याविषयी त्यांचा सत्कार झाला होता भारतीय महिलांच्या शैक्षणिक जीवनातील हा सोन्याचा दिवस होता.

आज भारतीय स्त्रिया विविध क्षेत्रांत आपले वेगळे आणि उल्लेखनीय योगदान देत आहेत. डॉक्टर, इंजिनियर, वकील, खेळ, राजकारण, नाटक, चित्रपट, वैमानिक, पोलीस, लष्कर, गायन अशा अनेक क्षेत्रात महिला आघाडीवर असल्याचे आपण पाहतो. यासाठी आपण महात्मा फुले यांचे सदैव ऋणी राहू. जर महात्मा फुले स्त्रीशिक्षणासाठी ठामपणे उभे राहिले नसते, तर स्त्रियांची काय गत झाली असती याचा विचारसुद्धा आज करवताही येत नाही.

प्रख्यात इतिहासकार रामचंद्र गुहा  यांनी त्यांच्या Makers of Modern India या ग्रंथात फुले यांच्या कार्याचा अत्यंत सूक्ष्म आणि व्यापक आढावा घेतला आहे. त्यात ते म्हणतात, “आधुनिक भारताची उभारणी ही केवळ राजकीय स्वातंत्र्याच्या लढ्याची फलश्रुती नाही, तर ती सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिक क्रांतींच्या एकत्रित परिणामातून घडलेली प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत अनेक विचारवंतांनी आपले मोलाचे योगदान दिले. महात्मा फुले हे त्यापैकी एक अग्रगण्य नाव आहे.”

रामचंद्र गुहा यांच्या मते फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते, तर ते “Agrarian Radical” म्हणजेच शेतकरी-केंद्रित क्रांतिकारक विचारवंत होते. त्यांनी भारतीय समाजातील विषमता, विशेषतः जातिव्यवस्था आणि आर्थिक शोषण यावर थेट प्रहार केला. त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता तो म्हणजे समाजातील सर्वात खालच्या स्तरावरील माणसाचे सक्षमीकरण.

महात्मा फुले धर्माच्या नावाखाली होणाऱ्या अंधश्रद्धा आणि शोषणाला विरोध करताना सत्यशोधक विचारसरणी मांडली. “सत्यशोधक समाज” ही त्यांच्या विचारांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होती. रामचंद्र गुहा यांच्या मते ही चळवळ केवळ सामाजिक सुधारणा नव्हती, तर ती एक वैचारिक क्रांती होती, ज्यामुळे लोकांना स्वतःच्या स्थितीबद्दल विचार करण्याची प्रेरणा मिळाली.

महात्मा फुले यांच्या कार्याचे आणखी एक महत्त्वाचे पैलू म्हणजे त्यांच्या विचारांचा पुढील पिढ्यांवर झालेला प्रभाव. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महान नेत्यांनी फुले यांच्या विचारांपासून प्रेरणा घेतली. सामाजिक न्याय, समता आणि शिक्षण या मूल्यांचा वारसा पुढे नेण्याचे कार्य त्यांनी केले. यावरून फुले यांचे योगदान केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित नसून ते कालातीत आहे, हे स्पष्ट होते.

आजच्या तंत्रज्ञानप्रधान भारतातही सामाजिक विषमता, जातीय भेदभाव आणि शैक्षणिक असमानता अद्याप दिसून येते. अशा परिस्थितीत फुले यांचे विचार अधिकच महत्त्वाचे ठरतात. इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्या मते, आधुनिक भारताची खरी उभारणी ही फुलेसारख्या विचारवंतांच्या तत्त्वज्ञानावर आधारित असली पाहिजे. त्यांनी मांडलेली समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाची तत्त्वे आजही तितकीच लागू आहेत.

थॉमस पेन यांच्या विचारांप्रमाणे समाजातील अज्ञान आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी चिकित्सक दृष्टी आवश्यक असते. फुले यांच्या कार्यात हीच चिकित्सकता आणि विवेकशीलता प्रकर्षाने दिसून येते. त्यांच्या कार्याचे योग्य विश्लेषण करताना प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा म्हणतात की महात्मा फुले हे आधुनिक भारताच्या सामाजिक परिवर्तनाचे खरे शिल्पकार होते. त्यांनी आपल्या Makers of Modern India या ग्रंथातून फुले यांच्या कार्याचे जे विश्लेषण केले आहे, ते आपल्याला केवळ इतिहास समजून घेण्यासाठीच नव्हे, तर वर्तमान आणि भविष्य घडवण्यासाठीही मार्गदर्शक ठरते.

फुले यांचे विचार हे केवळ अभ्यासाचा विषय नसून ते आचरणात आणण्याची गरज आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊनच आपण खऱ्या अर्थाने समतामूलक, न्याय्य आणि प्रगत भारताची भक्कम पायाभरणी करू शकतो — हीच त्यांना खरी अभिवादन ठरेल.

धन्यवाद
योगेश गोगवेकर

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...