Skip to main content

भारतातील थोर संत परंपरा, संतांची शिकवण आणि 'माझे आदर्श संत

 

शुभंकरोती साहित्य परिवार
सप्ताह क्रमांक.: १९७  
विषय क्रमांक.: ४
विषय : भारतातील थोर संत परंपरा, संतांची शिकवण आणि 'माझे आदर्श संत' (दीर्घ वैचारिक लेख)
शब्दांकन : योगेश गोगवेकर
परीक्षक : डॉ. माया दि. यावलकर
संकेतस्थळ :

संत साहित्याची सुरुवात

मध्ययुगीन भारताला अंधारयुग म्हणावे का, हा प्रश्न वादग्रस्त असला तरी त्या काळातील सामाजिक वास्तव पाहता हे विधान काहीसे रास्त वाटते. सततची राजकीय आक्रमणे, धार्मिक संघर्ष, देवालये, तीर्थस्थाने व सांस्कृतिक वारशाची झालेली मोडतोड यांमुळे समाजजीवन अस्थिर झाले होते. रूढी, परंपरा आणि कर्मकांड यांच्या जंजाळात सामाजिक विकास अडकून पडला होता. धर्माचा आत्मा हरवून त्याचे व्यापारीकरण झाले होते. भक्तीचा मूळ भावार्थ लुप्त होत चालला होता. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात व्रतवैकल्ये, अंधश्रद्धा आणि देवतावाद फोफावला होता. अशा या अंधाऱ्या काळात संत परंपरा ही समाजासाठी आशेचा किरण ठरली, हे निर्विवाद सत्य आहे.

अशा वेळेस,  "हरिहरा नाही भेद | नका करू वाद |" असे श्लोक सामान्य जनतेच्या कानावर पडू लागले. समाजात रूढ झालेले देवातांचे बंड मोडून टाकण्याचे आव्हान होऊ लागले. समाजाला कर्मकांडातून बाहेर काढण्यासाठी कोणी म्हणू लागले, "शेंदूर- शिरणी जी इच्छिती | ती काय आर्त पुरविती |". आणि इथेच याच बंडखोर पण करुणामय विचारांतून संत साहित्याचा उगम झाला.  

हे संत साहित्य म्हणजे त्यावेळी स्वतःला पंडित समजून समाजाची दिशाभूल करणाऱ्या माणसांवर एक प्रकारचा आघात होता. त्यात आत्मज्ञानाचा आग्रह होता. "ज्ञानापसी प्रेम उत्तम" असे सांगत संत सांगू लागले की देव दगडात नसून माणसांच्या हृदयात आहे. जातीभेद मोडून टाकून मानवतेची शिकवण देताना संत सांगतात, " जे जे देखिजे भूत | ते ते जाणिजे भगवंत |". त्यामुळे मध्ययुगीन समाजावर क्रांतिकारक विचारांचा परिणाम जसा होत गेला तसाच  सामाजिक सुधारणाचा विचारसुद्धा समाजामध्ये रुजू लागला. आपले कर्तव्य निरालसपणे करणे म्हणजेच खरी ईश्वर पूजा असे सांगताना संत म्हणू लागले, " जे का रंजले गांजले | त्यासी म्हणे जो आपुले | तोचि साधु ओळखावा | देव तेथेची जाणावा ||".

लोकभाषेत लोकांचे प्रबोधन

महाराष्ट्रातील संत परंपरा ही समन्वयवादी आहे. परंपरेचा संपूर्ण नकार न करता तिचे चिकित्सक मूल्यमापन करून संतांनी योग्य-अयोग्याचा भेद समाजाला समजावून सांगितला. अध्यात्मशास्त्रासारखे गहन तत्त्वज्ञान संस्कृत भाषेत बंदिस्त होते. संस्कृत ही ‘देवांची भाषा’ असल्याचा दावा करून बहुजन समाजाला ज्ञानापासून दूर ठेवले गेले.

या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वरांचे कार्य ऐतिहासिक ठरते. त्यांनी भगवद्गीतेचे मराठीकरण करून *‘ज्ञानेश्वरी’*सारखा सखोल तत्त्वचिंतनात्मक ग्रंथ लिहिला; इतकेच नव्हे तर ‘अमृतानुभव’ या स्वतंत्र तत्त्वज्ञानात्मक ग्रंथाच्या माध्यमातून मराठी भाषेला स्वतंत्र वैचारिक अधिष्ठान व अभिव्यक्तीची वैशिष्ट्यपूर्ण शैली बहाल केली. ज्ञानेश्वरी ही केवळ गीतेचे भाषांतर नसून, गीतेवरील सखोल लोकाभिमुख असे तात्त्विक भाष्य आहे. विशेष म्हणजे गीतेतील युद्धप्रधान तत्त्वज्ञानापलीकडे जाऊन ज्ञानेश्वरांनी पसायदानात विश्वकल्याणाची प्रार्थना केली – “जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूतां परस्परे पडो, मैत्री जीवांचे.”

संस्कृतमधून मराठीत आलेले ब्रह्मज्ञानही निखळ आणि बावनकशी आहे असे सांगताना संत एकनाथ म्हणतात, " भागवत प्राकृत जाले | परि नाही चुकले निजज्ञाना ||". संस्कृत मधील भागवताप्रमाणे रामायण सुद्धा भावार्थ रामायण म्हणून एकनाथानी मराठीत आणले आहे. जेव्हा संत आपले विचार लोकांच्या भाषेत सांगू लागले तेव्हा त्यांच्यात आणि सर्वसामान्य लोकांमध्ये एक प्रकारचा आपलेपणा निर्माण झाला. जेव्हा आपण या गोष्टी वाचतो तेव्हा आपल्याला जाणवते की संस्कृत साहित्यापेक्षा मराठीत आलेले संत साहित्यात अध्यात्मविवरण आणि आत्मसाक्षात्काराचे अनुभव सुंदरपणे मांडले गेले आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत एकनाथानी हे कार्य केले आहे. ते करत असताना त्यांनी समग्रसाहित्यशात्र मांडले नाही हे खरे पण त्याचा विचार त्यांनी जरूर केलेला आहे याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.

संताची शिकवण : विवेक, प्रवृत्ती आणि निवृत्तीचा समन्वय

मराठी संत साहित्याचे केंद्रस्थानी असलेले मूल्य म्हणजे विवेक. संत परंपरेत निवृत्तीवाद आणि प्रवृत्तीवाद या दोन्ही प्रवाहांचे दर्शन घडते; मात्र त्यांचा समन्वय साधला गेला आहे. संत निवृत्तीनाथांपासून ते निळोबारायांपर्यंत सर्व संतांनी विवेकाचे महत्त्व अधोरेखित केले. संत एकनाथ नरदेहाचे महत्त्व सांगताना म्हणतात की नरदेह हा ‘चोवीस गुरूंचा गुरू’ आहे, कारण त्यात विवेक, विचार आणि वैराग्य आहे. प्रसिद्ध अभ्यासक डॉ. युसूफ महंमद पठाण यांच्या मते, विवेक आणि विचार हे संत साहित्याचे पायाभूत मूल्य आहे. विवेकाच्या अभावामुळे समाजात अविवेकी, हिंसक आणि अमानवी प्रवृत्ती वाढतात, हे संतांनी कथांच्या माध्यमातून स्पष्ट केले.

कथात्मक शैली आणि साहित्यिक योगदान

संतांनी आपल्या तत्त्वज्ञानाची मांडणी कथांच्या माध्यमातून केली. ज्ञानेश्वरांनी ‘कथा’ या शब्दाचा ज्ञानेश्वरीत वापर केला आहे. संत एकनाथांची भारुडे वरकरणी स्फुट वाटली, तरी त्यात सखोल सामाजिक संदेश आहे. भावार्थ रामायणामध्ये राम कथेद्वारे अंतिम सत्य मांडले आहे. समर्थ रामदासांनी ‘दासबोध’ हा ग्रंथ कथात्मक शैलीतूनच लिहिला. गुरुचरित्र हाही ग्रंथ कथांच्या माध्यमातून भक्ती व विवेक शिकवतो. या कथात्मक परंपरेमुळे संत साहित्य केवळ तत्त्वज्ञानापुरते मर्यादित न राहता लोकसाहित्याच्या रूपाने समाजात रुजले गेले.

समता, अंधश्रद्धा विरोध आणि वर्णव्यवस्थेला ठाम विरोध

मराठी संत साहित्याने वर्णव्यवस्थेला ठाम विरोध केला. संत नामदेव, संत एकनाथ आणि संत तुकाराम यांनी समतेचा पुरस्कार केला. तुकाराम महाराजांची ओळ, “बरा देवा कुणबी केलो, नातरी दंभे असतो मेलो”  ही वर्णव्यवस्थेवरील तीव्र टीका आहे. संतांनी अंधश्रद्धा, भोंदूगिरी आणि देवतावादाविरुद्ध एकेश्वरवादाचा मार्ग दाखवला. नाथ संप्रदाय शिव, वारकरी संप्रदायात विठ्ठल, दत्त संप्रदायात दत्त, समर्थ संप्रदायात राम –देवतांची नावे वेगळी असली तरी त्यांचे स्वरूप निर्गुण-निराकार असल्याचे संतांनी स्पष्ट केले.

स्त्री संतांचे योगदान

भारतातील कोणतीही स्त्री, मग ती कोणत्याही जातीची किंवा कोणत्याही धर्माची असो, ती आपल्या धर्मासाठी, समाजासाठी, घरातल्या मंडळीसाठी नेहमीच त्याग करीत आली आहे. त्याग हा तिचा स्थायी भावच असतो असे दिसते. मराठी संत साहित्यात अनेक स्त्री संतांचे योगदान खूप मोठे आहे. संत मुक्ताई, संत जनाई, संत कान्होपात्रा आणि संत बहिणाबाई सिऊरकर अशी काही नावे आहेत.

मराठी मुस्लिम संतांचे योगदान

जसे मराठी हिंदू संतांचे योगदान आहे, तसेच मुस्लिम संतांचे सुद्धा आहे. मुस्लिम समाजाचा अभ्यास करताना ही गोष्ट दृष्टीस पडल्याशिवाय राहत नाही. आधुनिक मुस्लिम संत म्हणून सांगली इथे जन्मलेल्या सय्यद अमीन यांचे नाव आधुनिक मुस्लिम संत साहित्यिक म्हणून घ्यावे लागेल. इ. स. १०५० ते इ. स. १८५० पर्यंत ५० मुस्लिम मराठी संतांनी मराठी साहित्यात मोलाची भर टाकली आहे. या संतांनी सुद्धा हिंदू मराठी संताप्रमाणे भक्तीचा मार्ग अवलंबिलेला होता. असे करताना त्यांनी अनेक ओव्या, अभंग, काव्य यांची भर मराठी साहित्यात घातलेली दिसते. संतकवी आलमखान, शाह मुर्तुजा कादरी, मुंतोजी लखजी, हसरत लाडके मशाक, श्रीगोंदेकर शहामुनी, शेख दाजी, शाह बेग वगैरे अशा अनेक मुस्लिम मराठी संतांचे योगदान मराठी संत साहित्यात मोठे आहे.

संत शेख महंमद श्रीगोंदेकर हे एक हिंदू मुस्लिम ऐक्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. कादरी शाखेचे सुफी तत्वज्ञान आणि भागवत धर्माचे विचार यांचा समन्वय खूप छानपणे त्यांनी मांडला आहे. विठ्ठल हे महाराष्ट्रातील आराध्य दैवत. त्याच्या विशिष्ट रूपाची व ध्यानाची संगत लावताना संत श्रीगोंदेकर म्हणतात, " वि म्हणजे विकासाला | ठ म्हणजे ठसावला | म्हणोनी विठ्ठल बोला | टीका प्रश्न्यिक ||". म्हणजे विठ्ठलाच्या तीन अक्षरांपैकी वि चा अर्थ महत्वाचा असून तो विश्वरूपाने विकासला आहे, पण  विकारला नाही आणि ठ या शब्दाचा अर्थ ठसवला असा होतो म्हणजे त्याचे सर्वत्र असणे, प्रकटणे हे सूचित होते. तिसऱ्या ल या शब्दाचा अर्थ आम्हा भक्तांना लवकर लाभतो. संत शेख श्रीगोंदेकर हे धर्माने मुस्लिम असले तरी हिंदू तत्वज्ञान आणि अध्यात्म यांच्यावर त्यांनी विशेष अधिकार मिळवलेला होता. म्हणून एका ठिकाणी ते म्हणतात, " ज्ञानगोदेचे वासी | सोवळे वोवळे नाही आम्हासी | जळ अंघोळ मळ त्यागी | ज्ञान आंघोळी शुच योगी ||".

माझे आदर्श संत आहेत संत तुकाराम महाराज

संत परंपरेतील अनेक थोर संतांपैकी संत तुकाराम महाराज हे माझे आदर्श संत आहेत. त्यांच्या अभंगवाणीत सामाजिक भान, करुणा आणि निर्भीड विवेक यांचा विलक्षण संगम आहे. समाजाच्या गरजांनुसार उपदेश करताना ते म्हणतात, "बोलणे ते आम्ही बोलो उपयोगी | पडिले प्रसंगी काळाऐसे || जयामध्ये देव आदी मध्ये अंती | खोल पाया भिंती खचेनिया || ". इथे ते सांगतात की जे काही ते बोलले आहे ते ईश्वराची आज्ञा झाली म्हणून बोललो. असे सांगून त्यांनी ईश्वरी सत्तेचे अधिष्ठान सांगितले आहे. हे सर्व सांगताना त्यांचा उपदेश लोकांना उपयुक्त आणि लोकांच्या गरजा पूर्ण करणारा असाच आहे. असा उपदेश करताना लोकांचा अधिकार आणि त्या काळानुसार त्यांच्या गरजा यांचा विचार करूनच केल्याचे जाणवते. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, " समय जाणा समय जाणा | भलते नाणा भल तेथे ||". इथेच संत तुकाराम महाराजांच्या वाणीचे सामर्थ समजते.

म्हणूनच संत बहिणाबाई त्यांना ‘तुकाराम वेद’ म्हणतात, तर काही पाश्चात्त्य अभ्यासक त्यांना महाराष्ट्राचे राष्ट्रीय कवी मानतात.

संत साहित्य हे जरी अध्यात्मिक गोष्टींचा पुरस्कार करीत असले तरी ते एक प्रकारचे तत्वज्ञान आहे आणि हे तत्वज्ञान आज समाजातील सर्व थरापर्यंत म्हणजे तळागाळापर्यंत झिरपलेले असल्याचे जाणवते. आपल्या अभंगातून समाजातील वेगवेगळ्या गोष्टींचे प्रबोधन संतांनी केले आहे. त्यांच्या अभंगवाणीमध्ये अध्यात्मिक अवस्थांचे सुंदर प्रतिबिंब उमटल्याचे जाणवते. म्हणूनच त्यांच्यामध्ये आणि समाजामध्ये एक दुर्गम दरी निर्माण झाली नाही आणि सर्व समाज त्यांच्या तत्वज्ञानाशी, त्यांच्या विचारांशी पूर्णपणे समरस झाला. समाजाच्या उध्दारासाठी जर संत झिजले नसते तर सर्वसामान्य माणसांना त्यांच्या बद्दल आपुलकी वाटली नसती. याचे उत्तम उदाहरण म्हणजे संत तुकाराम आहेत.

आकलन

मराठी संत साहित्याचे योगदान सांगण्याचा एक प्रयत्न मी माझ्या आकलनाने केला आहे. संत साहित्य हे केवळ अध्यात्मिक लेखन नसून समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे. निःस्वार्थीपणा, त्याग, विवेक आणि मानवतावाद यांच्या आधारे संतांनी समाजाचे अंतःकरण जागे केले. आजच्या मूल्य संघर्षाच्या काळात संतांची शिकवण अधिकच महत्त्वाची ठरते. संत परंपरेचा वारसा जतन करणे म्हणजे अधिक समतावादी, विवेकी आणि मानवी समाज घडवण्याचा प्रयत्न होय.

धन्यवाद
योगेश गोगवेकर

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...