विषय: पुस्तक परीक्षण
पुस्तकाचे नाव: द पर्सनल इज पॉलिटिकल: ॲन ॲक्टिव्हिस्ट मेमो
लेखक: अरुणा रॉय
प्रकाशक: हार्पर कॉलिन्स इंडिया
पाने: २७२
किमत: रुपये ४७०
शब्दांकन : योगेश गोगवेकर
बऱ्याच कालावधी नंतर भारतीय समाजाला रहस्यमय पद्धतीने जागृत करणारे अरुणा रॉय लिखित ‘The Personal is Political An Activist’s Memoir नावाचे एक इंग्रजी पुस्तक नुकतेच वाचनात आले. हे पुस्तक म्हणजे लेखिकेने आपले आयुष्य विधायक कार्यात कसे व्यथित केले याचा लेखाजोगा आहे. १९६८ रोजी आयएएस झालेल्या एका महिलेला कळून चुकले की नागरी सेवेमध्ये केवळ नोकरशाही पद्धतीने काम करणे यासाठी तिचे आयुष्य नाही म्हणून तिने १९७५ रोजी नागरी सेवेतून राजीनामा दिला आणि तिलोनिया, राजस्थानमधील बेअरफुट कॉलेज सोशल वर्क अँड रिसर्च सेंटर (SWRC) मध्ये आपले पती बंकर रॉय यांच्यासोबत काम करू लागली. त्यांचे पती बंकर अनेक गरीब लोकांना खास करून अनवाणी पायाच्या अभियंत्यांना तंत्रज्ञान शिकवत होते जेणेकरून गावकऱ्यांचे जीवन सुसह्य आणि समाधानी होऊ शकेल. त्याचवेळी लेखिकेने म्हणजे अरुणा रॉय यांनी तेथील स्त्रीयांना कापड आणि पिशव्या, कुशन कव्हर्स आणि लहान मुलांसाठी खेळणी कशी बनवितात याचे शिक्षण देण्यास सुरुवात केली. हे सर्व सांगताना लेखिका अरुणा रॉय स्वतःच्या वैयक्तिक जीवनाबद्दल कोणतेही भाष्य करताना दिसत नाही कारण अरुणा रॉय आणि बंकर रॉय या दोघांनी पूर्ण आयुष्य एका मोठ्या समुदायासाठी समर्पित केले होते. हे पुस्तक वाचकांना दुसऱ्यांच्या जीवनातील दु:खद वेदना कशा समजून घेऊन त्यांच्या दु:खात कसे सहभागी व्हावे याबद्दल सांगते.
अरुणा रॉय यांचा जन्म ६ जुने १९४६ रोजी चेन्नई, तामिळनाडू येथे इडी जयराम आणि हेमा या तामिळ ब्राह्मण कुटुंबात झाला. हे कुटुंब कुठल्याही सामाजीक परंपरा न पाळणारे होते. धर्माच्या कोणत्याही सनातनी समजुती या कुटुंबाने नाकारल्या होत्या आणि समतावादी तत्वांशी ते जोडले गेले होते. या कुटुंबाच्या अनेक पिढ्यांनी सार्वजनिक सेवेत आपले आयुष्य वेचले होते. तिचे सर्व आजी-आजोबा उच्च शिक्षित होते. याबाबत लिहिताना अरुणा रॉय म्हणते की तिची सुशिक्षित आजी ही तिच्यासाठी प्रेरणा देणारी महिला होती. सनातनी ब्राह्मण कुटुंबात जन्म घेऊनसुद्धा ती गरीब लोकांसाठी सामाजिक कार्य करीत होती. तिच्या आईने भौतिक शास्त्र, गणित आणि संस्कृत विषयात प्राविण्य मिळविले होते. तिचे वडील व्यवसायाने वकील होते आणि त्यांचे शिक्षण शांतीनिकेतन मध्ये झाले होते. अरुणा रॉय यांना दोन बहिणी आणि एक भाऊ होता. त्या सर्व भावंडात मोठ्या होत्या. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना शिक्षण घेत असताना वैचारिक दृष्टीकोन वापरण्यास प्रोत्साहन दिले आणि वंश,जात,धर्म असे कोणतेही पूर्वग्रह न ठेवता सर्व समाजाचा आदर करण्यास शिकविले. अरुणा रॉय यांना शिक्षण पूर्ण करून फक्त गृहिणी बनायचे नव्हते. इंग्रजी भाषा घेऊन एम ए करून त्यांनी भारतीय प्रशासन सेवेची परीक्षा दिली आणि त्यात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्या. दिल्ली महाविद्यालयात शिकत असताना त्यांची ओळख संजीत (बंकर) रॉय या बंगाली तरुणाशी झाली. पुढे संजीत रॉयशी लग्न करून त्यांनी आपल्या पतीसमवेत सामाजिक कार्यात भाग घेण्यास सुरु केले.
अरुणा रॉय यांनी तिलोनियामध्ये कामाला सुरुवात केली ती एका स्थानिक सहकाऱ्याच्या मदतीने. ती गावातील महिलांशी संपर्क साधू लागते. पहिल्यांदा लेखिका गावातील एका स्थानिक महिलेशी संवाद साधायचा प्रयत्न करते तेव्हा ती बाई अरुणा रॉयकडे संशयित नजरेने बघते आणि बोथट प्रतिसाद देते. आपल्याला काही नको आहे असे सांगत लेखिकेला जायला सांगते. त्यामुळे लेखिकेला धक्का बसतो. असे प्रकार बऱ्याचवेळा घडू लागतात. या घटनांचे परिणाम एका मध्यमवर्गीय महिलेला आणि माजी आयएएस अधिकारी म्हणून असलेल्या लेखिकेने जपलेल्या मूल्यांच्या अगदी विरोधी होते, याचे सुंदर विश्लेषण रॉय यांनी पुस्तकात केला आहे. जनसेवा हे व्रत घेतल्यामुळे लेखिका आपले एक पाउल मागे घेते आणि आपल्या हृदयाचे सर्व दरवाजे उघडून ग्रामीण भागातील महिलांना उत्तम मोबदला मिळण्यासाठी त्यांचे प्रचिलित गैरसमज दूर करते. शेती,बांधकाम,घरघुती आधार आणि पशुपालन करणाऱ्या महिलेसाठी अनेक उपक्रम राबवते आणि अशा महिलांची संख्या कमी नसून भारतीय अर्थ व्यवस्थेमध्ये त्यांचे योगदान खूप मोठे आहे हे दाखवून देते. हे करीत असताना त्यांना अनेक आव्हानांना तोंड तर द्यावे लागत होते आणि स्वतःला सुद्धा सतत पंधरा दिवस रोजंदारी कामगार म्हणून काम करावे लागत होते. तसे करत असताना त्यांच्या पाठीला कधी न भरून निघणारी दुखापत झाली. याबद्दल बोलताना लेखिका म्हणते की जरी ही कामे अकुशल असली तरी त्यात भरपूर कौशल्याची गरज असते. अधिकारावर असलेल्या व्यक्तीला जर या कामाची कल्पना नसेल तर ती व्यक्ती चुकीचे अर्थ काढून अशा कामगारांचे हेतू परस्पर शोषण करून या कामगारांना योग्य मोबदला देणार नाही. यासाठीच अशा कामगारांच्या श्रमाची ओळख आणि त्यांचे राजकीय मूल्य यांचे महत्व केंद्रस्थानी ठेवून लेखिकेने आयुष्यभर व्यापक संघर्ष्याचा सामना कसा केला याचे सुंदर वर्णन या पुस्तकात आले आहे.
आज सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना अरुणा रॉय एक अत्यंत प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. त्यांनी भारतातील बहुतेक सर्व सामाजिक मोहिमांमध्ये भाग घेतला आहे आणि त्या यशस्वीसुद्धा केल्या आहेत. या मोहिमेत त्यांनी सकारात्मक पद्धतीने कायदे बनविण्यास सरकारला भाग पाडले. यात तिचे सहप्रवासी होते शंकर सिंग आणि निखील डे. हे दोघेही अनेक कर्तुत्व असलेले महान कार्यकर्ते आहेत. लेखिकेप्रमाणे ते सुद्धा अस्वस्थ प्रश्न उपस्थित करण्यास आणि त्यांना यशस्वी पद्धतीने तोंड देण्यास तयार असतात. त्यांच्या मते हे पुस्तक खूप गंभीर स्वरूपाचे आहे. म्हणून इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे जरी हे पुस्तक गंभीर स्वरूपाचे असले तरी त्यात बरेच मजेदार किस्से आलेले आहेत. त्यामुळे हे पुस्तक वाचताना वाचकाला आनंद मिळत जातो. या पुस्तकाचे अजून एक वैशिष्ट म्हणजे आपल्याला मौखिक इतिहास आणि साहित्यापासून स्त्री वादापासून आणि विकेंद्रीकरणासह लोकशाहीवर लेखिकेने केलेल्या टिपण्या आढळतात. हे पुस्तक वाचकांना दाखवून देते की तळागाळातील लोकांच्या संघर्षाला राष्ट्रीय उपक्रमांशीसुद्धा जोडले जाऊ शकते. यासाठी त्यांनी स्थापन केलेली मजदूर किसान शक्ती संघटना (MKSS) सारखी बिगर राजकीय संघटनेला माहितीचा कायदा (RTI) लागू करण्यास उत्तेजन दिले. त्याबाबत त्या म्हणतात,” तुम्हाला स्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्याचा अधिकार असेल पण माहिती काहीच नसेल, तर त्यात काय फायदा? याउलट, जर तुम्हाला माहितीचा अधिकार असेल पण बोलण्याचे स्वातंत्र्य नसेल तर त्यात काय फायदा? कारण प्रत्येक गोष्ट खरेतर एक दुसऱ्याला पूरक आहे,”
या पुस्तकाला गोपालकृष्ण गांधी यांनी प्रस्तावना लिहिली आहे. त्यांच्या मते हे पुस्तक दोन पातळ्यांवर फिरते. त्यांच्या पतीने स्थापन केलेली सोशल वर्क अँड रिसर्च सेंटरमध्ये काम करताना आलेले अनुभव सुरवातीला येतात नंतर स्थापन झालेल्या मजदूर किसान शक्ती संघटना आणि स्कूल फॉर डेमोक्रसीमध्ये आलेले अनुभव सुद्धा महत्वाचे ठरतात. याशिवाय हे पुस्तक वाचकांना तिने केलेल्या माहिती अधिकाराची चळवळ, अन्नाच्या अधिकाराची चळवळ आणि कामाचा अधिकार जाणून घेण्याची चळवळ यांची मौल्यवान माहिती देत जाते. तिने केलेल्या लिंग समस्येवरील काम करताना आलेले अनुभवसुद्धा या पुस्तकात लेखिकेने दिले आहेत. हे सर्व करीत असताना तिला अवगत असलेल्या कलांना म्हणजे हस्तव्यवसाय आणि संगीतामध्ये केलेल्या कामाचा उल्लेख अरुणा रॉय यांनी केला आहे. तसेच लेखिका राजकारणावरसुद्धा आपले विचार मांडत जाते. मनरेगा ही मनमोहनसिंग सरकारने आणलेली योजना खूप चांगली होती आणि कोविद काळात ती कशी उपयोगी पडली याबद्दल तिने आपले विचार मांडले आहेत. मनरेगा योजनेतील काही फायदे कमी केल्याबद्दल ती विद्यमान सरकारवर टीका करते. त्याचप्रमाणे वर्तमान भारतात होत असलेल्या पर्यावरणाचे गंभीर परिणाम, सर्वत्र पसरत असलेला द्वेष, धोक्यात आलेली शांतता आणि लोकशाहीची होत असलेली घसरण यावर ती विद्यमान सरकावर टीका करत त्यांना दोष देते. लोकशाही आणि न्यायव्यवस्थेवर असलेली कटिबद्धता यावरून त्यांची प्रतिक्रिया फार उपयुक्त ठरते.
हे पुस्तक जरूर वाचले गेले पाहिजे कारण रॉय म्हणतात त्याप्रमाणे वैयक्तित सक्रियता पद्धतशीर बदल आणू शकते आणि ते कसे आणू शकते, त्याचे योगदान काय आहे याची प्रेरणा या पुस्तकाद्वारे मिळू शकेल.
धन्यवाद
योगेश गोगवेकर

Comments
Post a Comment