विषय: पुस्तक परीक्षण
पुस्तकाचे नाव: On the meaning of life (जीवनाचा अर्थ)पाने: ११०
किमत: रुपये १३६३/-
शब्दांकन : योगेश गोगवेकर
जेव्हा काही वाईट बातम्या कानावर येतात तेव्हा
मन खूपच अस्वस्थ होते आणि काहीही करावासे वाटतं नाही. मग अशा अस्वस्थ मनाला फुंकर
घालण्यासाठी स्वतःला आवडलेल्या काही गोष्टी परत एकदा करावयाच्या वाटतात. त्या
गोष्टी म्हणजे एखादे चांगले पुस्तक परत एकदा वाचणे किंवा आपले आवडते संगीत ऐकणे
अथवा आवडता चित्रपट परत पाहणे. ते करत असतानाच आपल्याला समजते की कोणीतरी नवीन
काव्य करतो, कुणी सुंदर गाणं गातो, कुणी
छान लिहीत असतो आणि मग मनात निर्माण झालेला अस्वस्थपणा दूर होतो आणि जगाकडे
पाहण्याची नवीन दृष्टी तयार होते. इथे मला The Sound Of Music या सुंदर इंग्रजी संगीतमय
चित्रपटातील एका गाण्याची आठवण येते. ते गाणे होते, “The hills are alive
sound of Music, With songs they have sung for a thousand years....
हे गाणे मला खूप आवडते कारण हे गाणे
प्रत्येकाला कठीण परिस्थितीत जगण्याची ऊर्जा निर्माण करते. हे गाणे म्हणते, ”हजारो
वर्षांपासून चालत आलेलं संगीत मी या पर्वतांच्या टेकडी मधून आजही ऐकत आहे आणि हे
संगीत मला भारावून टाकत आहे. त्यातील प्रत्येक गाणी, त्यातील प्रत्येक ओळ माझ्या मनाला हवी हवीशी
वाटते. त्यासाठी मला माझ्या हृदयासाठी पंख हवे आहेत जे मला तलावापासून झाडापर्यंत
सहजपणे नेऊन आणतील. त्यातून होणारा ढगाचा आवाज, ते पाण्याचे झरे, वाटेवरील दगड मला गाणे शिकवत राहतील. जेव्हा
माझे हृदय एकाकी पडेल तेंव्हा मी परत टेकडीवर जाईन आणि मला परत माझे गाणे
मिळेल.आणि मी पुन्हा एकदा गाईन”.
हे गाणे आठविण्याचे कारण म्हणजे परत एकदा माझ्या वाचनात आलेले विल डुरंट यांनी इंग्रजीतून लिहिलेले आणि पिढ्यानं पिढ्या उपयुक्त ठरणारे पुस्तकं *On the meaning of life*. या पुस्तकात जीवनाचा अर्थ सांगण्याचा किंवा समजून घेण्याचा प्रयत्न विल डुरंट या लेखकाने केला आहे. हे पुस्तक 1932 रोजी प्रथम प्रकाशित झाले पण ते आजच्याही पिढीला उपयुक्त होईल असेच आहे.
विल डुरंट एक तत्वज्ञ आणि इतिहासकार होते. त्यांनी तत्वज्ञानावर लिहिलेले History of Philosophy हे पुस्तक खूपच सुंदर आहे. पत्नी एरियल डुरंट बरोबर त्यांनी Story of Civilization नावाचा अकरा खंडाचा संच लिहिला आहे. त्यात त्यांनी पाश्चात्य इतिहासावर विशेष भर देऊन, पूर्व आणि पाश्चात्य दोन्ही संस्कृतींचा समावेश केलेला आहे. १९२० च्या दशकात ते भारतात आले होते, तेव्हा त्यांनी भारतावर The case of India नावाचे अप्रतिम पुस्तक लिहिले आहे. इतिहास आणि तत्वज्ञानावर त्यांनी विपुल लिखाण केलेले आहे. इथे आपण त्यांच्या *On the meaning of life* हे पुस्तक समजून घेऊ.
1930 वर्षाच्या
अखेरीस एक चांगले कपडे घातलेला अनोळखी माणूस विल डुरंट यांच्या न्यूयॉर्क येथील
घरासमोर आला आणि त्याने डुरंट यांच्याजवळ जीवन जगण्याचा अर्थ काय असा प्रश्न केला.
जीवन जगण्यासाठी काही तात्विक कारणे आहेत का अशी विचारणी केली. जर त्याला तात्विक
कारणे मिळाली नाही तर तो आपले आयुष्य संपवून टाकणार असे त्याने डुरंट यांना
सांगितले. डुरंट यांनी अनेक कारणे देऊन त्याला आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न
केला. परंतु तो मनुष्य तेथून निघून गेला आणि परत तो त्यांना कधीही दिसला नाही. एका
अनोळखी माणसाला आत्महत्येच्या विचारापासून दूर करणे आणि त्याला जीवनाचे
महत्व समजून सांगणे हे डुरंट यांना कठीण गेले होते.
पण ही कोंडी होती. त्यातून अनेक महत्वाचे
प्रश्न निर्माण झाले. जीवनाचा सर्वात सोपा अर्थ म्हणजे आनंद. तरीपण त्याचा योग्य
अर्थ शोधण्यासाठी अनेक शिक्षण तज्ञांनी आणि विद्वानांनी त्याचा अर्थ
शोधण्याचा प्रयत्न केला आहे. कोणी देव आहे का? जर असेल तर आपण इतका त्रास
का सहन करत आहोत? असे प्रश्न निर्माण झाले. त्यामुळे डुरंट
ह्यांनी अनेक विचारवंतांना आव्हान करून तात्विक आणि काव्यात्मक पद्धतीने पत्र
लिहिले आणि त्यात जीवनाचा अर्थ समजून सांगण्याचा प्रयत्न करण्यास सांगितले.
त्यांनी हे पत्र कलाकार, लेखक, शास्त्रज्ञ, शिक्षक, राजकीय आणि धर्मिक नेते, खेळाडू, तत्वज्ञानी
आणि कैद्यांना सुद्धा पाठवले. त्यात डुरंटनी त्यांना लिहिले की तुमच्यासाठी
आयुष्याचा काय अर्थ आहे. ते तुम्ही कसे जगत आहात आणि तुम्हाला आयुष्याची कशी मदत
होते. हे मला सांगण्यासाठी क्षणभर थांबा आणि तुमचे प्रेरणास्थान काय आहे, तुमचे
ध्येय काय आहे. तुम्ही करत असलेल्या कामाचा तुम्हाला कसा आनंद मिळतो आणि आपण त्यात
समाधानी आहात का. या बद्दल मला नीटपणे समजून सांगा.
डुरंट
यांनी हे पत्र जवळ जवळ 100 व्यक्तींना लिहिले. त्यातील बहुतेक जणांनी
सकारात्मक पद्धतीने आपले जीवन आनंदायक कसे बनले याचे विश्लेषण करून पाठवले. त्यात
महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, लेखक एच एल मेणकेन आणि सिंक्लेर लेविस, कादंबरिकार
जॉन एरस्किन, इतिहासकार चार्ल्स बीर्ड, नाटककार
George Bernard Shaw, टेनिस खेळाडू हेलेन विल्स, तत्वज्ञानी
बेर्टॅन्ड रसेल आणि न्यूयॉर्क जेल मधील कैदी नंबर 79206 ओवेन
मिडलेटन आणि अजून काही व्यक्तिमत्वाचा उल्लेख आहे. यातील बऱ्याच जणांनी त्यांना
उत्तरे पाठवली आणि जीवनाचा आनंद कसा घेतला ह्याबद्दल लिहिले. या सर्व
पत्रांची उत्तरे त्यांच्या श्रेणीनुसार वर्गीकृत केली आहे आणि वाचकांना रस वाटेल
अशा पद्धतीने या पुस्तकात समावेश केलेले आहे. काहींनी त्यांच्या कार्याला महत्व
दिले होते आणि काम करताना कसा आनंद घेतला असे सांगितले.
या
पुस्तकाच्या शेवटी विल डुरंट ह्यांनी असा निष्कर्ष काढला की ज्यांना जाणीवपूर्वक
जगण्याची इच्छा आहे, ज्यांना कार्यें जाणून घेण्याची आणि सर्वोकृष्ट
निर्मिती करण्याची इच्छा आहे, त्यांनी शंकास्पद वागण्याकडे दुर्लक्ष केले
पाहिजे. अस्वस्थ वातावरणामुळे आपण निराशावादी बनले नाही पाहिजे. आपली घरे किंवा
संपत्ती रिक्त झालेली नसून आपले अंतःकरण रिक्त झाले आहे. त्यासाठी मानवाच्या
महानतेवर विश्वास ठेवून माणसाला आत्महत्येपासून परावृत्त करू शकतो आणि जीवनाचा
आनंद घेऊ शकतो.
हे
पुस्तक खरोखर आजच्याही जगासाठी लागू आहे. या पुस्तकात असे ही म्हटले आहे की ज्ञान
प्राप्तीच्या सर्व गोष्टी विज्ञानात आहे आणि विज्ञान सर्वप्रकारच्या रिमेक साठी
मुक्त आहे. विज्ञानाचा उपयोग सर्व मानव जातीसाठी करून मानवाला सुखी करता येऊ शकते.
त्यासाठी तत्वज्ञानाची मदत होते. विद्यापीठे ह्या आमच्या महान संस्था आहेत. त्या
आम्हाला नवीन कल्पना, नवीन शोध लावण्यास मदत करीत आहेत. त्यामुळे
आमचा आशावादी दृष्टिकोन विकसित होत जातो.
जीवनाचा अर्थ समजण्यासाठी आणि महान व्यक्तीचे
मन जाणून घेण्यासाठी हे पुस्तकं फार चांगले आहे. हे 1932 साली
प्रकाशित झालेलं पुस्तक, ९० वर्षानंतरहि खूप वाचून आनंद मिळतो.
धन्यवाद
योगेश
गोगवेकर
.jpg)
Comments
Post a Comment