Skip to main content

Mothepanala Swapne Havit-मोठेपणाला स्वप्ने हवी असतात द्वेष नव्हे.

 




विषय :मोठेपणाला स्वप्ने हवी असतात द्वेष नव्हे.
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई

आज भारत एका संक्रमण व्यवस्थेतून जात आहे आणि ही व्यवस्था बदलण्यासाठी भारतीय समाजालाच या भयानक व्यवस्थेतून बाहेर यावे लागेल. आजच्या भारतात विवेकी किंवा सुसंगत बोलण्यासारखे काही राहिलेले नाही. कुठलीही गोष्ट कोणत्याही तत्वज्ञानाचा आधार न घेता किंवा कोणतेही पुरावे न देता चुकीच्या पद्धतीने मांडली जात आहे. भारतीय संविधानातील निधर्मीवाद, मानवतावाद, वैज्ञानिक दृष्टीकोन या सर्व गोष्टींना तिलांजली दिली गेली आहे. समाजवाद, मुक्त्ततत्ववाद आणि विचार स्वातंत्र्य बाजूला सारून आजचा भारत धर्मांध आणि जातीयवादी होताना दिसत आहे. आज भारतीय समाजाचे घाणेरड्या पातळीवर जे ध्रुवीकरण होत असतानासुद्धा हा समाज काहीही न बोलता अविवेकीपणाने सर्व गोष्टींशी तडजोड करून समाधानी असल्याचे चित्र निर्माण होत आहे. हे फार भयानक आहे.

अशा वेळेस प्रत्येक समाजात सर्व गोष्टींची चिकित्सक पद्धतीने मांडणी करणाऱ्या लोकांची गरज फार असते. आज भारतीय समाजात सांस्कृतिक ज्ञान संचीतेचे अध्ययन-अध्यापन करणारे कोणी दिसत नाही. जे कोणी स्वतः कडे असलेल्या ज्ञानाचा प्रसार करून सत्य सांगण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यावर अनेक बंधने घातली जात आहे. म्हणून आज भारतात (त्यास महाराष्ट्रसुद्धा अपवाद नाही) प्रबोधनाची चळवळ पूर्णपणे बंद झाली असल्याचे दिसून येत आहे. समाजाचे प्रबोधन करणाऱ्या व्यक्तींची देशाला खुप गरज असते. त्यामुळे समाजाला चांगल्या प्रकारचे सांस्कृतिक नेतृत्व मिळते आणि समाजाचा दृष्टीकोन संकुचित न राहता व्यापक होऊन मानवतावादी व उदारमतवादी दृष्टीकोन तयार होत जातो. त्याचा परिणाम होऊन ज्ञानोपासक समाज निर्माण होत जातो.

गेल्या सत्तर वर्षात काँग्रेस सरकारने काही केले नाही असे सांगत आज केंद्रीय नेतृत्व काँग्रेस सरकारनेच आणलेल्या योजनेंची नावे बदलून स्वतःच्या नावावर आणण्याचा जो प्रकार करत आहेत ते पाहून असे वाटते की हे सरकार फक्त जुन्या योजनांचे पुनर्लेखन करीत आहे. याची काही उदाहरणे म्हणजे नियोजन आयोगाचे (Planning Commission) नाव बदलून नीती आयोग ठेवणे, राष्ट्रीय मदत निधीला (National Relief Fund) PM Cares हे नाव देणे, भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषदे मधून पंडित जवाहरलाल नेहरुंचे नाव वगळणे, नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी (NMML) हे नाव बदलून पंतप्रधानांचे संग्रहालय आणि ग्रंथालय सोसायटी असे नाव ठेवणे, वगैरे. त्याप्रमाणे कोणत्याही संस्थेचे नूतनीकरण करावयाचे असल्यास तेथे उच्चपदी काम करीत असलेल्या विश्वस्त वर्गाला विश्वासात न घेता सरळ काम चालू करणे, असे प्रकारसुद्धा पुढे येणाऱ्या काळासाठी खूप वाईट आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे साबरमती मधील महात्मा गांधी आंतराष्ट्रीय आश्रमाचे केलेले नूतनीकरण आणि दुसरे उदाहरण म्हणजे जालियनवाला बागचे केलेले डिस्नेफिकेशन.

एवढे करून केंद्र सरकार थांबले नाही तर गेल्या सत्तर वर्षामध्ये खूप मेहनतीने उभारलेल्या सार्वजनिक संस्थांचे खाजगीकरण केले आहे. त्यात विमानतळ, रेल्वे, गोदामे, खाणी, स्टेडीयम यांचा समावेश आहे. इतिहासाचे चुकीच्या पद्धतीने पुनर्लेखन सुद्धा चालू केले आहे. यात सर्वात वाईट गोष्ट म्हणजे दिल्ली शहराच्या मध्यावर असलेल्या प्रतिष्ठित वास्तूंची तोडफोड सेन्ट्रल विस्टा प्रकल्पासाठी केली गेली आहे. त्यात जुनी संसद, राष्ट्रीय संग्रहालय, इंदिरा गांधी कला केंद्र, राष्ट्रीय अभिलेखागार, विज्ञान भवन, कृषी भवन, निर्मल भवन, शास्त्री भवन, उद्योग भवन इत्यादी वास्तूंचा समावेश आहे. हे सर्व करण्याचे मुख्य कारण म्हणजे त्या वास्तूंशी निगडीत असलेल्या सर्व आठवणी स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित आहे आणि वर्तमान सरकारच्या नेतृत्वाला हे पूर्णपणे माहित आहे की त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा कोणताही संबंध स्वातंत्र्याच्या चळवळीशी नाही. म्हणून त्यांना या आठवणी कायम स्वरूपी मिटवून टाकायच्या आहेत. याला काही राजकारण म्हणता येणार नाही. त्याचप्रमाणे संसद पूर्णतःनिकामी करून तिथे कुठल्याही विधेयकावर चर्चा न होऊ देणे ही फार वाईट गोष्ट आहे. नुसती संसदच नव्हे तर सर्व लोकशाही संस्था संपवत असल्याचे दिसत आहे. हे सर्व एका व्यक्तीच्या हट्टासाठी केले जात आहे. या सर्व गोष्टी थांबवल्या पाहिजे. नाहीतर पुढच्या पिढीचे आयुष्य खडतर बनेल.

आजची तरुण पिढी ही झटपट संस्कृतीची शिकार होताना दिसत आहे. आजचा काळ हा झटपट अन्न पेय, झटपट खेळ, झटपट ज्ञानविज्ञानाचा काळ आहे. स्वतः अवांतर वाचन करून कुठल्याही गोष्टींचा शोध घेणे हे या तरुण पिढीला नको आहे. वाचन, चिंतन आणि मनन या गोष्टींकडे लक्ष द्यायला आजची तरुण पिढी तयार नाही ही एक खेदजनक गोष्ट आहे. या पिढीला आधुनिक गणिते आणि विज्ञाने यातील सुत्रांप्रमाणे, चिन्हांकित परिभाषेप्रमाणे साकार होणारे ज्ञानच त्यांना बरोबर वाटत आहे. भाषेचा किमान व प्रतीकात्मक उपयोग करणारा ज्ञानविष्कार त्यांना नको असतो. संगणकीय मार्फत मिळणारे ज्ञानच त्यांना गरजेचे वाटत आहे. त्यामुळे सोशल मिडीयावर येणाऱ्या चुकीच्या माहिती त्यांना बरोबर वाटू लागतात. म्हणूनच आताचे वर्तमान सरकार या गोष्टींचा फायदा घेऊन भारतीय समाजाचे ध्रुवीकरण करीत आहे.

इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे जर माणसाला मोठेपणा हवा असेल तर त्याप्रमाणे काम करणे गरजेचे आहे. त्यासाठी स्वप्न हवी. नुसता द्वेष करून मोठेपणा मिळत नाही. भूतकाळात घडलेल्या गोष्टी विचारात घेऊन भविष्यकाळ उज्ज्वल करण्याची दृष्टी सामुहिक नेतृत्वाकडे असावी लागते. तरच पुढील पिढी आपल्याला शाप देणार नाही.

धन्यवाद
योगेश गोगवेकर

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...