रंग लेखणीचे परिवार
आठवडा क्रमांक : २५१
विषय क्रमांक : ४
विषय : कर्मण्येवाधिकारस्ते
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता: माहीम ,मुंबई
प्रत्येक माणसाला त्याचे कर्म करण्याचा अधिकार आहे आणि हा मानवी हक्क सार्वजनिक जाहीरनाम्यात माणसाचा काम करण्याचा अधिकार म्हणून अंतर्भृत केला गेलेला आहे. त्यामुळे माणसाला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विचारांवर काम करण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही. म्हणून मानव आपला रोजगार स्वतःच निवडू शकतो आणि एखादी कृती करण्यासाठी स्वतःच्या बुद्धीने निर्णय घेऊ शकतो. वास्तविक पाहता काम करण्याचा अधिकार ही एक मानवी संकल्पना आहे. फ्रेंच समाजवादी नेते लुई ब्लँक यांनी १८४६ मध्ये आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या बेरोजगारीच्या समस्येवर उपाय म्हणून ही संकल्पना पहिल्यांदा मांडली आणि पुढे त्याचे कायद्यात रुपांतर झाले. कर्मण्येवाधिकारस्ते या शब्दाचा अर्थसुद्धा माणसाला काम करण्याचा अधिकार आहे असाच आहे. हा शब्द भगवद गीतेच्या अध्याय २ मधील श्लोकात येतो. हो श्लोक आहे, ”कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन| मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगोऽ स्त्वकर्मणि॥.” याचा अर्थ असा होतो की माणसाने स्वतःची बुद्धी वापरून आपले कर्म करावे पण त्याच्या फळाची अपेक्षा करून नये. कारण काम करणेच माणसाच्या अधिकारात येते पण त्या कर्माची फळे काय असतील यावर त्याचा अधिकार नाही. महाभारतात युद्धाच्या प्रसंगी अचानक जेव्हा अर्जुन युद्ध न करण्याचा निर्णय घेतो तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला युद्ध करण्यासाठी जो उपदेश केला आहे तेव्हा हा श्लोक सांगितला आहे. इथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की फक्त युद्ध करणे तुझ्या हातात आहे आणि ते कर्तव्याचा एक भाग असल्याने तुला काही पातक लागणार नाही आणि तू कर्मबंधातून मुक्त होशील.
बऱ्याच वेळा ”कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन| मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगोऽ स्त्वकर्मणि॥.” या श्लोकाचा अर्थ असा सांगितला जातो की फळाची अपेक्षा न करता कर्म करा. पण हा अर्थ पूर्ण असल्यासारखा वाटत नाही. कारण श्लोकातील पहिल्या शब्दात अधिकार हा शब्द आलेला आहे आणि तो फार महत्वाचा आहे. माणसाला नेहमी वाटत असते की त्याने कुठलेही कर्म केले की त्याला त्याचे फळ लगेच मिळाले पाहिजे. जर कर्म करून योग्य आणि न्यायपूर्ण फळ मिळणार नसेल तर कर्म का म्हणून करायचे, असा त्याचा प्रश्न माणसाला पडलेला असतो. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी याचे विश्लेषण करताना म्हटले आहे की माणसाला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे. मग ते कर्म चांगले आहे का वाईट याचा विचार त्याने करता कामा नये. जर माणसाने कर्म करता करता त्या कर्मातून मिळणाऱ्या फळाची इच्छा धरली तर तो काम करीत असलेल्या कामाकडे दुर्लक्ष होईल आणि ते कर्म अपेक्षेप्रमाणे चांगले होणार नाही. तेव्हा कोणतीही अपेक्षा न धरता माणसाने आपले लक्ष ज्यावर आपला अधिकार चालतो अशा आपल्या कामावर केंद्रित करावा. जर त्याचे काम जास्त सुंदर आणि विवेकपूर्ण झाले तर त्याला चांगले फळ मिळाल्या शिवाय राहणार नाही. चांगल्या कामाची फळे ही नेहमीच चांगली असतात तर वाईट कामाची वाईट फळेच भोगायला लागतात. जसे कर्म असेल तसेच फळ मिळणार आणि या कर्माच्या सिद्धांतापासून कुणाचीच सुटका नाही. म्हणून भगवद गीते मधला हा श्लोक माणसाला त्याच्या कामाचा अधिकार दाखवून कर्म करावयास सांगतो आणि त्याच्या जीवनाच्या विकासाचा पहिला टप्पा तयार करतो.
याचा अर्थ असा की भगवद गीता निष्काम कर्मयोगाला महत्व देते. जर माणसाने त्याच्या मनातील कर्तव्याची इच्छा त्याच्या बुद्धीशी सांगड घालून एकाग्रतेने केली तर चांगली योगबुद्धी होईल. त्यामुळे परमात्म्याशी त्या कर्माचा संयोग होईल आणि स्वतःच्या इंद्रियांवर ताबा होईल आणि स्थिर बुद्धीने चांगले काम होण्यास मदत होईल. हे तत्वज्ञान कदाचित द्वापार युगात बरोबर असेल किंवा काही काळापर्यंत कलियुगात सुद्धा चालेल. आजच्या काळाचा विचार करताना इथे एक प्रश्न पडतो तो म्हणजे जर माणसाने चांगले काम केले आणि त्याला त्या कर्माचे काहीच फळ मिळाले नाही तर माणसाने काय करावे ? असा प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे कर्म करण्याचा अधिकार माणसाला आजपण आहे पण जेव्हा तो त्याचे काम करीत असतो तेव्हा त्याच्या कर्मावर नियंत्रण करणाऱ्या अनेक गोष्टी असतात. त्याचप्रमाणे माणूस ज्या देशात राहतो त्या देशाच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक बाबींचा परिणाम सुद्धा त्या माणसाच्या कर्मावर होत असतो. कधी कधी तर स्वतःची चुकी नसताना सुद्धा दुसऱ्याच्या चुकामुळे माणसाचे कर्म बरोबर होत नाही. कारण दुसऱ्याच्या कामाचे नियंत्रण हे जो कर्म करतो त्याच्या हातात असते. अशी अनेक उदाहरणे देता येतील. समजा ‘अ’ नावाची व्यक्ती व्यवस्थितपणे रस्त्यावरून चालत आहे आणि ‘ब’ नवीची व्यक्ती दारू पिऊन त्याची दुचाकी वाहन चालवत ‘अ’ नावाच्या व्यक्तीला धक्का देऊन जखमी करतो. इथे ‘अ’ नावाची व्यक्ती स्वतःचे कर्तव्य बजावत रस्त्याने नीटपणे जात होती, पण ‘ब’ नावाच्या व्यक्तीने त्याच्या कर्तव्यात बाधा आणली आणि ‘अ’ नावाच्या व्यक्तीला त्याचे फळ मिळत नाही, मग अशावेळेस ‘अ’ नावाची व्यक्ती निराश होणार. याबातीत आपण दुसरे उदाहरण पाहू . जेव्हा शेतकरी उत्तम शेती करून आपले धान्य पिकवितो पण ऐन कापणीच्या वेळी अतिवृष्टी होऊन पिकांचा नाश होतो. तेव्हा त्या शेतकऱ्याला त्याने चांगले काम केल्याचे फळ मिळाले असे म्हणता येईल का ? असा प्रश्न या श्लोकाचा अर्थ समजून घेताना पडतो. तेव्हा असेच म्हणावे लागेल कुठल्याही विपरत परिस्थितीत मानवाने त्याचे कर्म करीत राहिले पाहिजे. तेव्हा परत प्रश्न पडतो की त्यामुळे मानव खुश होईल का? नाहीतर शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या झाल्याच नसत्या. अशावेळेस ”कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन” हे तत्वज्ञान परिपूर्ण आहे का? असा प्रश्न पडल्या शिवाय राहत नाही.
”कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन” या श्लोकातून भगवान कृष्णांनी अर्जुनाला कर्माची माहिती सांगताना म्हटले आहे की कर्म हाच धर्म आणि धर्म हेच कर्म असे समजून युद्ध कर. आता बौद्ध धर्मात कर्माच्या अधिकाराबद्दल काय सांगितले आहे ते पाहूया. बौद्ध धर्मात धर्म आणि कर्म यांची सांगड घालाताना बुद्धाने माणसाच्या स्वैराचार मनाला लगाम घालण्याचे काम केले आहे. बौद्ध धर्मात धर्माला धम्म (पाली भाषेतील अर्थ) आणि कर्माला कम्म असे म्हणतात आणि हा धम्म मानव जातीच्या हितासाठी किंवा कल्याणासाठी कार्यरत असतो. इथे धम्म आणि कम्म एकच असल्यासारखे वाटते. गौतम बुद्धाने सत्य, वास्तवता, निसर्गनियम आणि वैज्ञानिक दृष्टीकोन लक्षात घेऊन धम्माचे आणि कम्माचे तत्वज्ञान सांगितले आहे. तसे करताना त्यांनी माणसाला केंद्र बिंदू केले आहे. चांगले व वाईट कर्म सांगताना त्यांनी कुशल कर्म व अकुशल कर्म असे कर्माचे दोन भाग केले आहेत. कम्म सिद्धांत मांडताना त्यांनी सांगितले की कर्म हे कारण आणि परिणामाच्या तत्वाला सूचित करते आणि कृतीचा परिणाम, जो शाब्दिक, मानसिक किंवा शारीरिक असू शकतो, तो केवळ कृतीनेच नव्हे तर हेतूने देखील निर्धारित केला जातो. याचाच अर्थ त्यांनी कम्म किंवा कर्म हे विज्ञानाचा किंवा निसर्गनियमांचा आधार घेऊन मांडला आहे. हा सिद्धांत एक उदाहरण देऊन सांगायचे झाल्यास असे म्हणता येईल की झाडे तोडल्यामुळे वने उजाड झाली आणि त्याचा परिणाम पाऊस कमी पडण्यात झाला. त्यामुळे शेती व्यवसाय मुबलक धान्य पिकवू शकले नाही. हे अकुशल कर्म असून मानवाने केले असले तरी ते निसर्गनियमांशी निगडीत असल्यामुळे या अकुशल कर्माचा परिणाम आहे. त्याचप्रमाणे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहताना बुद्धाने कुठेही माणसाने केलेल्या कर्माचा भार परमेश्वरावर टाकलेला नाही. माणूस कोणतेही काम करीत असेल तर त्यात त्याच्या परमेश्वराचा कोणताही संबंध नाही असे सांगून ते होमहवन करणे किंवा यज्ञ करणे या गोष्टी जरुरीच्या नाहीत असे मानतात. इथे बुद्ध वैज्ञानिक दृष्टीकोन समोर ठेवून अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न करताना सांगतात की कुठल्याही कुशल आणि अकुशल कर्माला मानवच जबाबदार असून देवांचा त्यात काडीमात्र संबंध नाही. त्यामुळे माणसाने नेहमी कुशल काम करताना वैज्ञानिक दृष्टीकोन आणि निसर्गनियमांचे पालन करणे त्याचा अधिकार आहे आणि त्याच्या होणाऱ्या परिणामांची जबाबदारी कर्म करीत असलेल्या कर्त्याचीच आहे असे बौद्ध धर्म सांगतो.
वरती कर्म करण्याच्या अधिकारावर लिहिताना हिंदू धर्मात आणि बुद्ध धर्मात काय सांगितले आहे हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कर्म म्हणजे क्रिया. मग ती क्रिया पवित्र असो किंवा नसो पण ती क्रिया जी व्यक्ती करते त्या व्यक्तीच्या अस्तित्वाच्या भविष्यातील पद्धती निर्धारित करतात. कर्म हा संस्कृत शब्द असून हिंदू धर्माच्या वैदिक प्राचीन ग्रंथामध्ये याचा उल्लेख विधी आणि त्यागाच्या कृतीत असल्याचे म्हटले आहे. इथे एवढेच लक्षात ठेवले पाहिजे की कोणतेही धार्मिक कृत्ये देवांपासून वेगळी ठेवली आहेत. याचा अर्थ विधी स्वतंत्रपणे केली जातात आणि वैश्विक विधी धार्मिक नियमानुसार केली जातात. पण बौद्ध आणि जैन धर्मानी तपस्वी जीवन पद्धती स्वीकारून विधीविषयक कर्मे नाकारली. तरीही दोन्ही धर्म कर्माची संकल्पना मांडताना जे फिरते ते सभोवताली येते आणि तुम्ही जे पेरता तेच उगवते याची उदाहरणे देत असतात. याचाच अर्थ कर्म हेतूपुरस्सर कृतीला प्रोत्साहन देते. जेव्हा तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करतात तेव्हा त्या कृतीचा एक ठसा तुम्ही उमटवत असतात. त्यामुळे तुम्हांला जेव्हा गरज असते तेव्हा मदत मिळण्याची शक्यता त्या केलेल्या कृत्यामुळे वाढलेली असते. याउलट हानिकारक कृती नकारात्मक परिणाम घडवून आणू शकतात. त्यातून केवळ नुकसानच होऊ शकते. त्यामुळे कर्माला मानसशास्त्रामध्ये महत्वाचे स्थान आहे कारण चांगले कर्म माणसाला आनंद देते तर वाईट कर्म समस्या उभे करते. म्हणजेच कर्म हे क्रिया आणि प्रतिक्रियेचा नियम आहे जो जीवनावर नियंत्रण करतो. कर्माचा शाब्दिक अर्थ कृती किंवा कृत्य असा होतो आणि अधिक व्यापकपणे कारण आणि परिणामाच्या तत्वाचे वर्णन करतो. म्हणून कर्म हे भाग्य नव्हे कारण देवाने माणसाला स्वतंत्रपणे वागण्याची शक्ती दिली आहे. त्यामुळे कर्म म्हणजे मानवाच्या कृतीतील संपूर्णतेच्या जीवनातील त्यांच्या सह-प्रतिक्रियांचा संदर्भ आहे, जे मानवाचे भविष्य ठरवीत असते.
म्हणूनच ‘कर्मण्येवाधिकारस्ते’ हा सिद्धांत मानवाला कर्माचा अधिकार आहे हे मान्य करतो आणि कर्म प्रत्येक व्यक्तीसाठी विशिष्ट असले तरी, भारतीय धर्मांचे अनेक पैलू कर्माच्या रूपाने सामायिक होऊ शकतात असा व्यापक विश्वास प्रतिबिंबित करीत असतो. याचे उत्तम उदाहरण द्यायचे झाल्यास हिंदू आणि बौद्ध धर्मात एक गोष्ट प्रामुख्याने आढळते ती म्हणजे गुणवत्तेच्या हस्तांतरणाचा सिद्धांत, ज्या प्रमाणे एक व्यक्ती आपले चांगले कर्म दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करु शकते.
धन्यवाद
Comments
Post a Comment