रंग लेखणीचे परिवार
आठवडा क्रमांक : २५४
विषय क्रमांक : ३
विषय : जिवलगा
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम , मुंबई
१९७१ साली ऋषिकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेल्या आनंद या चित्रपटात राजेश खन्ना संवाद म्हणत असताना एक वाक्य म्हणतो, “देखो बाबूमोशाय, हर एक बॉडी एक ट्रांसमीटर है और एक रिसीवर। बस उसकी बॉडी में से एक वायब्रेशन निकली और मैंने पकड़ ली, बस दोस्ती हो गई।“. या संवादाचा अर्थ असा आहे की एकत्रित आलेल्या व्यक्तींचे ऋणानुबंध जुळून येतात आणि काळाच्या ओघात ते जिवलग मित्र बनतात. मैत्री बाबतचा इतका सुंदर संवाद मला इतर कोणत्याही चित्रपटात ऐकायला मिळाला नाही. या संवादात कुठेही जिवलगा हा शब्द आला नसला तरी दोन माणसे एकत्र येतात तेव्हा त्यांचे भावनिक संबंध मजबूत असतात. यामध्ये प्रत्येक व्यक्ती एकमेकांवर विश्वास ठेवतात किंवा एकमेकांवर विसंबून राहू शकतात अथवा अशा व्यक्ती एकमेकांशी स्वतःची रहस्येसुद्धा शेअर करतात. याचाच अर्थ असा आहे की दोन व्यक्तींमध्ये संयोगाने झालेली भेट पुढे एकामेकांचे स्वभाव, विचार आणि आवडींच्या समानतामुळे आपोआपच जिवलग मित्र होऊन जातात. म्हणून जिवलगा या शब्दाचा अर्थ समजून घेताना म्हणावे लागेल की जिवलगा म्हणजे जिव्हाळ्याची, आवडती किंवा प्रिय व्यक्ती जी जिवाभावाचा मित्र बनून माणसाच्या प्रत्येक सुख दु:खाच्या प्रसंगी समरस होऊन मदत करेल.
मग इथे एक प्रश्न पडतो की ज्या मित्राला आपण जिवलगा म्हणतो तो कशा अर्थाने चांगला किंवा खरोखरच जिव्हाळ्याचा आहे. त्यासाठी आपल्याला आपत्कालीन परिस्थितीचा विचार करावा लागेल. असा विचार करताना आपल्याला असे जाणवेल की जेव्हा माणसाला कुठल्यातरी अडचणीचा सामना करावा लागतो तेव्हा त्या माणसाचा जिवलगा त्याला सोप्या भाषेत उपाय सांगून अडचणीतून बाहेर पडण्यास मदत करतो. जेव्हा एखादी चूक माणसाकडून घडते, तेव्हा त्याचा जिवलगा त्याची चूक समजून घेऊन त्या व्यक्तीस मार्गदर्शन करतो. त्याचप्रमाणे माणूस त्याच्या आयुष्यात चांगले काम करून यशस्वी झाला की त्याचा जिवलगा त्याचे अभिनंदन तर करतोच पण त्यास एक चांगली व्यक्ती बनण्यासाठी दरवेळेस प्रोत्साहनसुद्धा देत असतो. म्हणूनच जिवलग झालेली मैत्री प्रत्येक माणसाच्या जीवनात मोठी मदत करू शकते. हे खरे आहे की माणसे त्यांच्या आयुष्यात विविध लोकांशी संपर्कात येत असतात. त्यात समान दृष्टीकोन आणि अभिरुची असलेली माणसे एकत्र येऊन एकमेकांच्या सहवासात जास्त वेळ घालवू लागतात. हळूहळू, त्यांच्यात एक प्रकारचे बंधन उदयास येऊ लागते आणि मग त्यांची मैत्री आयुष्यभर टिकून राहते. मग ही जिवलग झालेली माणसे आपल्या कुटुंबाचा एक भाग बनतात.
देवाने या पृथ्वीवर सर्वात मौल्यवान गोष्ट निर्माण केली ती म्हणजे मैत्री. जर माणसाला त्याच्यावर विश्वास ठेवणारा , त्याला मदत करणारा मित्र सोबत म्हणून मिळाला तर त्यासारखे सुख दुसरे काहीच नाही. कारण मित्राच्या भक्ती आणि प्रामाणिकपणाशी इतर कुणीही जुळवू शकत नाही. मित्र हा माणसाच्या आयुष्यातील नुसती महत्वाची आणि जवळची व्यक्ती नसून त्याच्या सारखा दुसरा अमूल्य ठेवा माणसाच्या जीवनात दुसरा कुणीही नाही. म्हणून माणूस स्वतःच्या आयुष्यातील महत्वाचे पैलू आपल्या मित्राकडे नेहमी शेअर करीत असतो. असे म्हणतात की सर्वोत्कृष्ट मित्र एकमेकांचे आधार होतात आणि जिवलग होऊन जातात. जसजशी माणसे मोठी होत जातात तसतसे त्यांचे जिवलग अधिक जवळ येऊ लागतात कारण त्यांच्या गतआयुष्याच्या चांगल्या आठवणींशी ते बांधले गेलेले असतात. त्यासाठी एकत्र प्रवास करणे किंवा सहलीला जाणे अथवा जेवणासाठी एकत्र येणे फार महत्वाचे आहे. असे एकत्र येणे प्रत्येक माणसाला आपल्या जिवलग मित्राच्या जीवनाशी कसे जागरूक आहोत याची जाणीव करून देते. याचाच अर्थ असा आहे की आपण ज्याला जिवलगा म्हणतो ती अशी व्यक्ती असते जिच्यासोबत प्रत्येक माणूस बंध आणि परस्पर समाज सामायिक करत असतात. एखाद्या व्यक्तीला त्याच्या समाजातील प्रतिष्ठेमुळे अनेक मित्र मिळत असतील पण प्रत्येक माणूस त्याच्या समविचारी मतांबाबत असलेल्या लोकांच्या अधिक जवळ जातो. म्हणून अनेक मानसशास्त्रज्ञ असे मानतात की लोक एकमेकांना मदत करण्यासाठी एकत्र राहतात. माणूस हा सामाजिक प्राणी असल्याने तो आपल्या जिवलगाच्या सहवासामुळे भरपूर प्रगती करू शकतो. याला कारण म्हणजे प्रत्येक माणसांचा आपल्या जिवलगावर असलेला विश्वास. म्हणून प्रत्येक मानवी जीवनात जिवलगाला फार महत्वाचे स्थान आहे.
हा लेख लिहित असताना एक गोष्ट सारखी जाणवत असते ती म्हणजे आज खरोखरच माणसे एकमेकांच्या जवळ आली आहेत का? त्यांच्या जवळ असलेल्या व्यक्तीला आपण जिवलगा हा शब्द वापरू शकू का? असे प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे आजच्या सारखा माणूस कधीही आत्मकेंद्रित झाला नव्हता. वर म्हटल्याप्रमाणे माणसाची जवळीक जाणून घेण्यासाठी माणसाला आपत्कालीन परिस्थितीचा विचार करणे जरुरीचे आहे. कारण माणूस जेव्हा अडचणीत असतो तेव्हा त्याचा किंवा तिचा जिवलगा त्या माणसाला मदत करण्यासाठी एका हाकेवर धावत येतो. अशी परिस्थिती आज क्वचितच आपल्याला बघायला मिळते. वरती एका परिच्छेदात म्हटले होते की माणसाने एकदा तरी एकत्र येऊन सहलीला किंवा जेवायला भेटणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे अनेकदा माणसे एकत्र भेटतात पण त्याचा उपयोग माणसाचे दु:ख कमी करण्यासाठी किती होतो असा प्रश्न पडल्याशिवाय होत नाही. असे मांडण्याचे कारण असे की आज माणसाचे जिवलग मित्र किंवा नातेवाईक Get together जरूर करीत असतात परंतु त्यात आपलेपणापेक्षा दिखाऊपणा अधिक असतो. अशा कार्यक्रमात माणसे एकत्र येतात ती केवळ स्वतःच्या आर्थिक यशाचे प्रदर्शन करण्याच्या हेतूने पण त्यात कुणीही स्वतःचे दु: ख किंवा अपयश एकमेकांना सांगत नाही आणि ते कुणीही ऐकण्याच्या परिस्थितीत असत नाही. मग कार्यक्रम झाल्यानंतर ज्याने कार्यक्रम आयोजित केलेला होता त्याची टिंगल टवाळी करणे हाच तिकडे आलेल्या मित्रांचा किंवा नातेवाईकांचा उद्योग असतो. तेव्हा अशा माणसांना जिवलगा तरी कसे म्हणावे हे समजत नाही. एकमेकांचे यश अपयश समजून घेऊन त्यांची मागून कुठलीही टिंगलटवाळी न करता त्या माणसाच्या यशासाठी त्यांचे कौतुक तर करावेच पण अडचणीच्या वेळी त्याच्या पाठीमागे उभे राहून त्याला संकटातून मुक्त करण्यासाठी कमीपणा वाटू नये तरच आपण त्या व्यक्तीला एक चांगला जिवलगा म्हणू शकतो.
खरा मित्र हा जिवलगा असतो तसाच तो मोठा खजिना असतो. माणसाला त्याच्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अनेक मित्र मैत्रिणी भेटतात. त्यातले काही मित्र मैत्रिणी हे बालपणापासून मिळालेले असतात. बालपणापासून मिळालेले मित्र मैत्रिणी यांना आपल्या मित्र मैत्रिणींचे स्वभाव, त्यांची आवड, अभिरुची वगैरे माहीत असतात म्हणून त्यांची मैत्री ही जिवाभावाची होऊन आयुष्याच्या अखेर पर्यंत टिकून राहते. त्यात मतभेद किंवा वादविवाद होत असतात पण दुरावा कधीच निर्माण होत नाही. ते एकमेकांना व्यवस्थितपणे ओळखत असतात. जरी त्यांच्यामध्ये बराच काळ फोनसुद्धा झाला नाही तरी त्यांना त्याबद्दल काहीही वाटत नाही. अशा मित्रांशी गप्पा मारताना कोणताही विषय चालू शकतो. त्यात त्यांना कसलाही फरक पडत नाही. ते सहसा भेटत नसतील तरी त्यांच्यात दुरावा निर्माण होत नाही. या मिळालेल्या मैत्रीच्या प्रेमामुळे माणूस एक सुखाचे जीवन सहजपणे जगू शकतो. मग अशावेळेस तिथे मैत्रीच्या भावनांची खरी खोली व्यक्त करायलासुद्धा शब्द कमी पडतात. म्हणूनच जिवलग मित्र मिळणे हे सुद्धा आयुष्यात फार महत्वाची गोष्ट आहे. फक्त व्यवहारी दृष्टीकोन ठेवून मैत्री करणारा माणूस कधीच जिवलगा होऊ शकत नाही. संयोगाने झालेली भेट , एकमेकांचे जुळलेले स्वभाव, विचार, आवड , अभिरुची दोन माणसांना एकत्र आणते आणि त्यांच्यात जिवलग मैत्री होऊन ते एकमेकांचे जिवलगा होऊन जातात.
धन्यवाद
योगेश गोगवेकर
Comments
Post a Comment