१४ एप्रिल २०२३ , डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३२व्य जयंतीच्या निमित्ताने
महात्मा गांधी , गुरुदेव रवींद्रनाथ टागोर , पंडित जवाहरलाल नेहरू , नेताजी सुभाषचंद्र बोस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरीत्रांबद्दल मला नेहमीच आकर्षण वाटत आले आहे, त्यामुळे त्यांच्यावर कितीही वाचले गेले असले तरी त्यांना समजून घेताना किंवा त्यांनी केलेल्या कामाचे आकलन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे वाचन सारखे करीत राहणे जरुरीचे वाटत राहते. या सर्वांमध्ये डॉ. आंबेडकरांचे जीवन समजून घ्यायचे असेल तर त्यांच्या विचारांच्या आणि कृतींचा अर्थ लावताना परस्पर विरोधी प्रेरणा लक्षात घ्याव्या लागतात. एका बाजूला त्यांना सामाजिक विषमता संपवून टाकण्यासाठी संघर्ष करावयाचा होता. त्यामुळे त्यांचा हिंदू समाजावर राग होता पण दुसरीकडे त्यांचे मन भारतीय होते आणि त्यांना भारतीय म्हणूनच राहायचे होते. सायमन कमिशन पुढील साक्ष असो किंवा गोलमेज परिषदेतील भाषण असो; अर्थातच अनुसूचित जातीच्या प्रतिनिधित्वाचा प्रश्न वगळता त्यांच्यातील प्रखर राष्ट्रवाद नेहमीच दिसून येतो. १९३८ मध्ये केलेल्या एका भाषणात ते म्हणतात ,” काही लोक म्हणतात की आपण प्रथम भारतीय आहोत, आणि नंतर हिंदू किंवा मुस्लीम आहोत. मला हे पसंत नाही. हे पुरेसे वाटत नाही .धर्म, संस्कृती आणि भाषा वगैरेतून निर्माण होणाऱ्या कोणत्याही स्पर्धक निष्ठेमुळे आपली भारतीय म्हणून असलेली निष्ठा धोक्यात येता कामा नये. लोकांनी भारतीय आणि फक्त भारतीय राहावे, असे मला वाटते. त्याखेरीज अन्य काही असू नये”. डॉ. आंबेडकरांच्या अंत:करणाच्या गाभाऱ्यातून हे बोल उमटले होते. कोणताही राष्ट्रवादी त्याची बरोबरी करू शकणार नाही.
डॉ. आंबेडकर यांचे आधुनिक भारताच्या इतिहासात मानाचे स्थान निर्विवाद आहे. ते एक ज्ञानमार्गी बंडखोर होते. त्यांनी निर्माण केलेली ग्रंथसंपदा वाचल्यानंतर एक गोष्ट सातत्याने जाणवते की त्यांच्या इतका विद्वान विचावंत भारतात जन्माला यासाठी परमेश्वराचे आभार मानले पाहिजे. अशा या महापुरुषाला त्यांच्या जयंतीच्या दिवशी त्रिवार सलाम.
आम्ही आमच्या आयुष्याच्या शेवट पर्यंत तुमचे ऋणी राहू. कारण तुम्हीच आम्हाला संविधान तर दिलेच पण संकुचित बुद्धीचा त्याग करून शिक्षणा मार्फत शाश्वत विकास कसा करता येईल याचे ज्ञान दिले.
धन्यवाद
योगेश गोग्वेकर
Comments
Post a Comment