रंग लेखणीचे परिवार
आठवडा क्रमांक : २११
विषय क्रमांक : ४
विषय : नाण्याच्या दोन बाजू
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
सुप्रसिद्ध तत्ववेत्ता विल्यम डेव्हिड रॉस यांच्या म्हणण्यानुसार तत्वज्ञान आणि शिक्षण हे सुद्धा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. याचे विश्लेषण करताना रॉस लिहितात की तत्वज्ञान हा चिंतनशील भाग आहे आणि शिक्षण हा त्या नंतर येणारा सक्रिय भाग आहे. जर आपण बघायला गेलं तर एक गोष्ट जाणवेल की तत्वज्ञान आणि शिक्षण यांचा काहीच संबंध नाही. कारण तत्वज्ञान ही एक कला आहे आणि शिक्षण एक स्वतंत्र गोष्ट आहे. तरीसुद्धा त्यांचा संबंध खूप खोल आहे. तत्वज्ञान हे जीवनाचे सर्वोच्च उद्दिष्ट शोधण्याचा एक मार्ग आहे. तत्वज्ञान मानवाला आपले शिक्षण वैज्ञानिक दृष्टीकोन लक्षात घेऊन करण्यासाठी काही मूल्यांची निर्मिती करते. म्हणून तत्वज्ञान हा शिक्षणाचा प्रमुख विषय आहे आणि त्याच्यात घनिष्ट संबंध आहे. शिक्षण नेहमी विद्यार्थ्यांना आपल्या मूळ वर्तनात बदल करायला शिकविते आणि चांगल्या मार्गांवर जाण्यासाठी प्रयत्न करीत असते. त्यासाठी काही मूल्यांची गरज असते. ही मूल्ये आपल्याला तत्त्वज्ञानातून मिळू शकतात. कारण मुलांच्या वर्तनात सुधारणा करण्यासाठी शिक्षकाने कोणत्या पद्धतीचा अवलंब करावा ही गोष्ट तत्वज्ञान शिकविते. शिक्षण ही एक प्रयोग शाळा आहे की ज्यात तात्विक अनुमान आणि सिद्धांत तपासले जातात. याचाच अर्थ तत्वज्ञान हा शिक्षण संस्थेकडे जाणारा मार्ग आहे. तत्वज्ञान ही एक सत्याचा शोध घेणारी कला आहे. विश्वाचे आणि माणसाचे वास्तविक स्वरूपाचे विश्लेषण तत्वज्ञान करीत असते. मग त्या विश्लेषणाचे रूपांतर कल्पनांमध्ये करून त्या लिखित स्वरूपात मांडल्या जातात. मग पुढे वादविवादातून आव्हान दिले जाते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून समुदायामध्ये एकमत झाल्यानंतर ते व्यापकपणे स्वीकारले जाते. म्हणूनच तत्वज्ञान हा प्रथम चिंतनाचा भाग आहे तर शिक्षण त्यानंतरचा सक्रिय भाग आहे. सुप्रसिद्ध तत्ववेत्ता जॉन ऍडम यांनी एक सुंदर विचार मांडताना म्हटले आहे की शिक्षण ही तत्वज्ञानाची गतिशील बाजू आहे. ती तत्वज्ञान आणि शिक्षण यांच्यातील संबंधाना सुंदरपणे समाविष्ट करते. म्हणूनच सर्व महान तत्वज्ञानी हे स्वतः शिक्षक होते. सॉक्रेटिस आणि प्लेटोपासून अनेक महान तत्ववेते तर होतेच पण महान शिक्षकसुद्धा होते. त्यांनी शैक्षणिक योजनांवर त्यांचा तात्विक दृष्टीकोनही प्रतिबिंबित केला आहे. म्हणून शैक्षणिक चळवळीचे मूळ तत्वज्ञानी विचारसरणीच्या शाळांकडे आहे. यावरून असा निष्कर्ष निघतो की शिक्षण हा तत्वज्ञानाचा एक विस्तारीत भाग असून ज्ञान आणि वस्तुस्थितीचा सकारात्मक प्रसार करून जनमाणसात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करण्याचे काम करीत असते. थोडक्यात असे म्हणता येईल की तत्वज्ञान जीवनाचे ध्येय निश्चित करते तर शिक्षण ते ध्येय साध्य करण्याचे साधन आहे. म्हणून विल्यम डेव्हीड रॉस म्हणतात की तत्वज्ञान आणि शिक्षण एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
यानंतर आपण आस्तिक आणि नास्तिक या दोन गोष्टींकडे वळूया. आस्तिक हा देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतो आणि त्याला या जगाचा निर्माता आणि शासक मानतो. नास्तिक असे मानतो की या जगात देव कुठल्याही रूपात अस्तित्वात नाही आणि विश्वाची निर्मिती मानवानेच केलेली आहे. नास्तिकाचे म्हणणे असे आहे की माणूस हा उत्क्रांतीतून निर्माण झालेला प्राणी आहे. इथे माणसाला स्वतःची ओळख होणे फार जरुरीचे आहे. कारण मनुष्याचे सर्व वाद-विवाद, दुःख, चिंता भय त्याने स्वतःबद्दल मांडलेल्या कल्पनेवर आधारित आहेत. जेव्हा आपण या दोन्ही गोष्टींकडे बारकाईने पाहिले तर आपल्याला जाणवेल ही नकारात्मक प्रणाली सुद्धा एक विश्वास प्रणाली आहे. आस्तिक आणि नास्तिक यांच्या सर्व विचारकरण्यांच्या विश्वास प्रणाली मेंदूपासून उगवतात आणि त्यांच्या मनात ते विचार घट्ट बसून राहतात. म्हणून ही समस्या वैज्ञानिक दृष्टीकोनातून सोडविणे कठीण होत जाते. जीवन आणि प्रत्येक गोष्टीचे अस्तित्व स्पष्ट करण्याच्या शक्यता अनंत आहेत. ते देवासारखे काळे किंवा पांढरे असू शकत नाही. लाकडाच्या अग्नीने उजळलेल्या गुहेच्या भिंतीवरील माणसाच्या सावली प्रमाणे सर्व भौतिक स्वरूपातील जीवनाचे केवळ अंदाज बांधता येतील. पण ते सत्य आहेत की नाही याचे कुठलेही ज्ञान आपल्याला मिळू शकणार नाही. म्हणून देवासारख्या मोठ्या गोष्टींची उपस्थिती किंवा अनुपस्थितीचा पुरावा कधीही वैज्ञानिक मार्गाने एकमत होऊन मिळेल याची कुठलीही शक्यता आजतरी वाटत नाही. मानव स्वतःची निर्मिती कधीच पाहू शकत नाही. त्यावर तो फक्त विचारांचे लेबल लावू शकतो पण ते करताना तो काही नियम तयार करतो आणि त्या नियमाद्वारे तो विश्वासाने जीवन जगत जातो. हे नियम नास्तिक आणि आस्तिक यांना सारखेच असतात. जसे मानव स्वतःची निर्मिती पाहू शकत नाही तसेच तो स्वतःचा चेहरा प्रतिबिंबाच्या पद्धतीशिवाय पाहू शकत नाही. त्यामुळे आपण बऱ्याच गोष्टी खऱ्या असल्याच्या समजतो पण त्या खरेपणाची खात्री आपण पूर्णपणे देऊ शकत नाही. प्रत्येक गोष्टीच्या अस्तित्वाची उत्पती ही शब्दश: असंख्य पर्याय आणि शक्यतांसह नेहमीच एक प्रश्न बनून राहणार आहे आणि त्याची उत्तरे वैज्ञानिक दृष्टीकोनाचा उपयोग करून मानवी विचारातूनच होऊ शकेल. म्हणूनच नास्तिकता आणि आस्तिकता एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि त्यांचे दोन्ही समर्थक एकाच संगीतावर नाच करून एकमेकांना पटवून देण्याचा प्रयत्न करतात की ते ऐकत असलेले संगीत इतरांपेक्षा अधिक वास्तविक आहे.
सुख आणि शांती या सुद्धा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मानवी जीवनात सुख आणि शांती असेलच असे नाही. याला कारण आहे एका मानवाला दुसऱ्या मानावापासून भीती आणि भय वाटत असते. त्यामुळे तो त्या मानव समूहाचा सतत द्वेष करीत राहतो आणि आसपासचे सलोख्याचे वातावरण बिघडवून टाकतो. अशी माणसे आपणच फक्त हुशार आणि सर्वकाही स्वतःला शक्य आहे असे वातावरण तयार करून जीवन जगण्याचा मार्ग त्रासदायी करून टाकतात. अशा अशांत वातावरणाकडे पाहिले तर एक गोष्ट लक्षात येईल की मानावाचे मन अशांत होण्यास त्याच्या मनामध्ये विकृत विकार कारणीभूत आहे. असे विकार विकृत होण्याचे मूळ कारण म्हणजे माणसाच्या मनाविरुद्ध घडणाऱ्या घटना किंवा मनाविरुद्ध करावे लागलेले काम. या गोष्टीतून माणूस कधीच मुक्त होणार नाही कारण अशा अप्रिय गोष्टी घडत राहणारच. त्यासाठी माणसाने त्याचे मन त्याच्या आवडत्या गोष्टीमध्ये गुंतत ठेवणे फार जरुरीचे आहे. नाहीतर माणसाच्या मनात निर्माण झालेला विकार माणसाची विवेकबुद्धी नष्ट करून टाकेल. या गोष्टीचा परिणाम मानवाच्या शरीरावर होत जाईल. कारण मानवी शरीर आणि मन यांचेसुद्धा परस्पर संबंध असून ते सुद्धा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जर आपल्याला सर्व विकारांवर मात करायची असेल तर सत्याला सामोरे जाणे किंवा सत्य समजून घेणे जरुरीचे आहे. तरच जीवन जगण्याची कला आपण आत्मसात करू शकतो. तेव्हाच मानवी शरीराला आणि मनाला सुख आणि शांती मिळू शकते. असाच प्रकार आपल्याला विनोद आणि शोकांतिका याबाबतीत सुद्धा म्हणता येईल. कारण विनोद ही शोकांतिका आणि वेळ आहे. विनोदी माणूस एखाद्या विषयावर विनोद करतो तेव्हा प्रेक्षक घेत असलेला श्वास हा शोकांतिकेचा प्रतीक असतो. सुप्रसिद्ध इंग्लिश कादंबरिकार आणि कवी थॉमस हार्डि यांचे एक सुंदर वाक्य आहे. ते म्हणजे, " All Comedy is tragedy, if you look deep enough into it". हेच मराठीत म्हणायचे असल्यास असे म्हणता येईल " जर बारकाईने विचार केला तर असे जाणवेल की सर्व प्रकारचे विनोद शोकांतिका असते". म्हणून शोकांतिका आणि विनोद एकमेकांशी परस्पर संबंधित आहे. यासाठी सुप्रसिद्ध विनोदी कलाकार जॅक डी म्हणतात, "Comedy and tragedy are two sides of same coin. A talent in one area might also lead to a predisposition in the other". याचा अर्थ विनोद आणि शोकांतिका एकाच नाण्याच्या दोन बाजू असून एका क्षेत्रातील प्रतिभा दुसऱ्या क्षेत्रातील पूर्वस्थिती असू शकते.
नाण्याला दोन बाजू असतात ही गोष्ट समजून घेण्यासाठी अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे अगतिकता आणि लवचिकता. जेव्हा आपण लवचिकता म्हणतो तेव्हा त्यात अशी कल्पना असते की प्रतिकूल परिस्थितीत माणसाला पुढे जाण्यासाठी काहीं संरक्षणात्मकता कार्यरत असते. अगतिकता अगदी याच्या विरुद्ध असते. जरी लवचिकता शक्ती म्हणून समजली गेली तर अगतिकता अनेक ठिकाणी कमकुवत समजली गेली आहे. याचा अर्थ असा होतो की माणूस जीवनात कशाप्रकारे काम करतो यावर अगतिकता आणि लवचिकता अवलंबून असते. असे म्हणतात की मनुष्य जीवनाची वाटचाल करताना तो अधिक अगतिक बनतो तेव्हाच तो जास्त लवचिक बनत जातो. हे वाक्य जरा गोंधळात टाकणारे आहे. त्यासाठी माझ्या वाचनात आलेला एक संदर्भ आठवतो. तो संदर्भ असा आहे की कोणत्याही गोष्टीचा अतीरेक शून्यापासून होण्यासाठी चांगला आहे. कारण त्यात असुरक्षितता समाविष्ट असते. त्यामुळे आपण त्या गोष्टीशी जुळवून घेतो आणि पुढे जाण्याचा मार्ग मोकळा करतो. म्हणून अगतिकता आणि लवचिकता या दोन गोष्टी एकमेकांच्या विरोधात असून एकमेकांशी परस्पर संबंधित आहे. अगतिक असणे, बदल घडवून आणण्यासाठी तयार असणे आणि प्रतिकूलतेला लवचिक असणे या गोष्टी मुळामध्ये समानच आहे. कारण ते आपल्याला कोणत्याही परिस्थितीत शक्यतेशी जुळवून घेण्यास मदत करते आणि आपल्याला सक्षम बनविते. म्हणून तुम्ही जितके अगतिक असाल तितक्या जास्त संधी तुम्हाला जीवनात वावरत असताना दिसतात, तेव्हाच तुम्ही जास्त लवचिक बनत जातात. कारण तुमच्या समोर येणाऱ्या परिस्थितीमध्ये अगतिकता आणि लवचिकता असण्याची दाट शक्यता असते. म्हणून अगतिकता आणि लवचिकता एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे म्हटल्यास गैर ठरू नये.
एकाच नाण्याच्या दोन बाजू या अभिव्यक्तीमध्ये भिन्न असणाऱ्या पण प्रत्यक्ष संबंधित असलेल्या गोष्टींचा संदर्भ नीटपणे समजवून सांगण्याचा प्रयत्न वर केला आहे.
धन्यवाद
Comments
Post a Comment