Skip to main content

Udyache Dadapan Yete उद्याचे दडपण येते

 रंग लेखणीचे परिवार

आठवडा क्रमांक : २०७
विषय क्रमांक : ४
विषय : उद्याचे दडपण येते
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई

चार्ल्स डार्विनने माणसाच्या निर्मिती बद्दल लिहिताना म्हटले आहे की माणसाला कोणीही निर्माण केले नसून, तो निसर्गातून उत्क्रांत झाला आहे. तो स्वतःच स्वतःचा निर्माता असल्यामुळे त्याने केलेल्या प्रत्येक निर्मितीसाठी तोच जबाबदार असल्याचे सांगत डार्विन यांनी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला आहे. वास्तविकपणे पाहिले तर असे दिसून येईल की माणूस हा प्राणीसृष्टीचा एक महत्वाचा भाग आहे. पुढे त्याने प्राणीसृष्टीतून  बाहेर येऊन स्वतःची अशी मानवी सृष्टी निर्माण केली. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत आणि लेखक रावसाहेब कसबे आपल्या 'धर्मग्रंथ आणि मानवी जीवन प्रवाह' या पुस्तकात म्हणतात, "निसर्गातील प्राणिसृष्टी पूर्णपणे तिला लाभलेल्या सहज प्रेरणांप्रमाणे निसर्गाशी संतुलित असे जीवन जगत असते. प्राण्यांचे संपूर्ण जीवन भूक, तहान, कामवासना आणि सुरक्षितता या सहजप्रेरणांनी नियंत्रित केलेले असते. परंतु माणूस त्यापेक्षा वेगळा असतो. तो प्राणीच होता हे खरे ; परंतु माणसाचा जन्म त्याच्या विकासक्रमात अशा एका बिंदूवर झाला, जिथे माणसाला त्याच्या सहज किंवा नैसर्गिक प्रेरणांवर मात करण्याची शक्ती लाभली. ही शक्ती प्राणीसृष्टीत फक्त एकाच माणसाने कमावली. त्याने या नैसर्गिक प्रेरणांना स्वतःच्या ताब्यात ठेवण्यासाठी आणि त्यांचा स्वतःवरील प्रभाव क्रमाने कमीत कमी करण्यासाठी आपल्या बुद्धीचा विकास केला. तो जेव्हापासून सहज प्रेरणांच्या ऐवजी आपल्या विवेकाच्या साहाय्याने जीवन जगण्याचे शिकला, तेव्हापासून तो खऱ्या अर्थाने माणूस झाला. त्याने आपल्या विवेकाच्या आधारानेच प्राथमिक स्वरूपाची हत्यारे निर्माण केली आणि आपल्या कल्पनाशक्तीच्या साहाय्याने अंधाऱ्या गुहेत चित्रे रेखाटली. त्याने केलेल्या दोन कृती म्हणजेच आजच्या प्रगत विज्ञानाचा आणि संस्कृतीचा त्यांनी साजरा केलेला जन्मोत्सव होता ". इथे प्राध्यापक कसबे अगदी बरोबरच सांगत आहेत. कारण मानवाने स्वतःच्या बुद्धीवर अनेक निर्मिती केली आहे हे निर्विवाद सत्य आहे. मग असा मानव एकविसाव्या शतकाच्या दोन दशका नंतर एकाकी, असहाय, अस्वस्थ आणि भयभीत  बनत चालल्याचे दिसत आहे. याचे कारण सांगताना कसबे म्हणतात," माणसाने त्याच्या विकासाच्या प्रक्रियेतील टप्प्यावर कल्पिलेली सुरक्षाकवच कालौघात हळूहळू गळून पडत आहेत ".  याचाच अर्थ आज माणूस त्यानेच निर्माण केलेल्या गोष्टींशी संघर्ष करताना खूपच भयभीत होत चालला आहे. कारण त्याची निर्मिती उद्यासाठी काय नवीन भीती निर्माण करेल याचा शोध घेण्यास तो असमर्थ ठरत आहे म्हणून त्याला उद्याचे दडपण येते आहे.

आजच्या एकविसाव्या शतकात माणसाने निर्माण केलेल्या तंत्रज्ञानाची काही वैशिष्ट्ये आहेत. या शतकाने संगणक, इंटरनेट, उपग्रह आणि मोबाईल सारख्या साधनांची निर्मिती करून देशादेशातील सीमा पुसट करण्याचे कामही चांगल्या पद्धतीने केले आहे. त्यामुळे जागतिक व्यापारास एक नवीन दिशा मिळून त्यास चांगलीच गती मिळाली. पण त्याचा उपयोग मानव जातीचा विकास होण्यापेक्षा मानवी जीवनात खूप प्रमाणात विषमता वाढू लागल्याचे दिसू लागले. विज्ञानाने नवीन शोध लावले जरूर पण त्याचा उपयोग समाजातील तळागाळ्यातील माणसांना होण्यापेक्षा फक्त श्रीमंत वर्गाला होऊ लागल्याचे जाणवत आहे. आज सेवाक्षेत्र महत्वाचे बनले आहे. समाजातील प्रत्येक व्यक्ती सेवाक्षेत्रात काम करून श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहत आहेत. ती त्यांनी जरूर पाहावी, त्यासाठी कुणी नाही म्हणत नाही. पण ते होत असताना मूल्यांपेक्षा किंमत मोठी ठरू लागली तर भावनेपेक्षा भौतिक सुख मोठे वाटू लागले आहे. पूर्वी व्यवहार यापेक्षा माणुसकीला महत्व असायचे त्यामुळे नाती जपली जायची. आता व्यवहार मोठा मानला जातो. जर एखाद्या व्यक्तीस अचानकपणे काही मदत हवी असेल तर ती देण्यापेक्षा हल्ली माणूस व्यावहारिक दृष्टीकोन उच्च मानून तो करू शकत असलेली मदत नाकारत असतो. इथे माणूस खोट्या भौतिक सुखाच्या मागे जात असल्याचे दिसून येत आहे. याचाच अर्थ तो कमालीचा आत्मकेंद्रित झालेला वाटतो. मग तो समूहात न राहता फक्त व्यक्ती पूजक झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कुठल्याही विचारांपेक्षा कृती महत्वाची असे विचार सर्वत्र पसरू लागतात. कुठलीही कृती करण्या अगोदर त्यामागे एखादा विचार असावा लागतो पण तो विचार एका माणसाला बरोबर वाटला तसा तो दुसऱ्या माणसाला बरोबर वाटणार नाही. कारण प्रत्येक माणसातील संवेदना त्या माणसाला बरोबर वाटलेल्या विचारांमुळे सुखावलेल्या असतील असे म्हणता येणार नाही. त्यासाठी प्रत्येक विचार कृतीत आणताना माणसा माणसांमध्ये  संवाद असावयास हवा. असा संवाद आज आपल्याला हरवलेला दिसत आहे. त्यामुळे उद्या होणारी एखादी कृती जर कुठल्याही विचारांवर आधारलेली नसेल तर त्याचे दुष्परिणाम प्रत्येक माणसाला भोगावे लागतील याची जाणीव प्रत्येक मानवी समाजाला होत आहे. म्हणूनच माणसाला उद्याचे दडपण येत आहे.

एकविसाव्या शतकामध्ये प्रत्येक मानवाला  विकास करायचा असेल तर त्याला शिक्षण हे महत्वाचे साधन वाटले पाहिजे. तसे बघावयास गेले तर शिक्षणाची गरज एकोणिसाव्या शतकापासून सतत भासत होती. महात्मा ज्योतीराव फुले यांनी शिक्षण फार गरजेचे आहे असे सांगून ते म्हणतात, " जर विद्या ग्रहण केली तर आपल्याला असलेल्या सर्व कष्टांचे निवारण करण्याचे मार्ग आपल्याला लाभतील". पुढे ते म्हणतात, " शिक्षण हा जीवनाचा आधार आहे. शिक्षण ही जीवन जगण्याची गुरुकिल्ली आहे. जीवन कसे जगावे, जीवन का जगावे, जीवनाची सार्थकता कशात आहे, जीवन पूर्ण कसे कसे करावे या सर्वांची उत्तरे शिक्षणात आहे. म्हणून शिक्षण हे घेतलेच पाहिजे ". किती दूरदृष्टी महात्मा फुलेंच्या विचारांमध्ये आहे याची जाणीव त्यांचे चरित्र वाचताना होते. सर्व जमातीतील मुलांना ( खास करून पीडित समाजातील मुलांना) तसेच सर्व समाजातील स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम पाहता थक्क व्हायला होते. म्हणूनच आज सर्व समाजातील मुले आणि मुली शिक्षण घेतात तेव्हा त्यांचे उपकार आपण कधीच विसरू शकत नाही. आज आपल्याला सर्वांना शिक्षण देताना तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा आणि गुणवत्तेस प्राधान्य देणे या दोन गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी विद्यार्थी आणि त्यांना शिक्षण देणारे शिक्षक यांच्यामध्ये बंध-अनुबंध चैतन्यपूर्ण स्वरूपाचे असायला हवे. कारण शिक्षक हा मुलांवर सुसंस्कार घडवीत असतो. ते करताना मुलांना नितीमूल्यांच्या गोष्टी सांगत त्यांना सकारात्मक जीवनदृष्टी देत असतो. त्यामुळे ही मुले उद्याचे आदर्श नागरिक बनून देशाचे भवितव्य ठरणार आहेत. प्रत्येक विध्यार्थी हा स्वतंत्र तेज, बुद्धी आणि वृत्ती जपणारा असतो. त्याला समजून घेऊन शिक्षकाने त्याचे अवगुण दूर तर केले पाहिजे आणि त्याचे सुप्त गुण लक्षात घेऊन त्याच्या व्यक्तिमत्त्वाला  आकार दिला पाहिजे. जर काही विद्यार्थी अभ्यासात योग्य प्रगती दाखवत नाही तर प्रत्येक शिक्षकाने स्वतः आत्मपरीक्षण करून त्या विद्यार्थ्यांच्या समस्यांचा मुळापासून अभ्यास जरून त्यांना चांगले विद्यार्थी बनविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणावरील जबाबदारी फार मोठी आहे. मुलांना शिक्षण देत असताना आपली कुठलीही वैयक्तिक मते मुलांवरती लादली जाणार नाही याची काळजी शिक्षकांनी घेतली पाहिजे. म्हणूनच साने गुरुजी म्हणतात की खरा शिक्षक असा असतो जो मुलांना पावसात भिजायला शिकवतो, आकाशाची दोस्ती करायला शिकवतो. पण आजची शिक्षणाची परिस्थिती वेगळीच आहे. इथे शिक्षक मुलांना गणिताची सूत्रे शिकवीतात, त्यांना कविता शिकवीतात, विज्ञानाचे प्रयोग करून दाखवतात पण गणिताची सूत्रे शिकताना मुले त्यामागची तर्कसंगती लक्षात घेत नाही. कविता शिकताना त्यातील सौदर्य त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. विज्ञान शिकतात पण विज्ञाननिष्ठा त्यांच्यात रुजत नाही. त्यामुळे कुठलीही पदवी ही पैशे किंवा नोकरी मिळविण्याचे साधन आहे असे आजचे विद्यार्थी मानतात. जीवन हे एक साध्य आहे, ज्ञान हे कौशल्य आहे असे ते समजत नाही. त्यासाठी ते पाठांतर महत्वाचे मानतात. हल्ली मुलांना खेळण्यासाठी सुद्धा त्यांचे पालक परवानगी देत नाही. बऱ्याच पालकांना खेळ खेळणे म्हणजे वेळ फुकट घालविणे असे वाटत असते. खेळ मुले लवकर शिकतात आणि खेळामुळे त्यांना पुढील आयुष्यात ताण तणाव सहन करण्याची शक्ती येते असे पालकांना समजवून सांगितले तरी कळत नाही. त्यामुळे परीक्षेत जास्त मार्क मिळविले म्हणजे ही मुले हुशार आहेत असाच समज सगळीकडे पसरत चालला आहे. ते पाहून असे वाटते की अशाने उद्या चांगले विद्यार्थी घडू शकणार की नाही म्हणून उद्याचे दडपण येणे साहजिक आहे.

आजच्या वर्तमान काळातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे समाजकारणाची जागा राजकारणाने घेतली आहे. देश जेव्हा पारतंत्र्यात होता तेव्हा पंचशील, लोकशाही राज्यपद्धती, समाजवाद, सत्य आणि अहिंसा या तत्वांचा प्रत्येक ठिकाणी जय जयकार होत होता. आजही तो होत आहे पण त्यात धैर्य नाही, उत्साह नाही. फक्त अहोरात्र शूद्र स्वार्थावार दृष्टी लागली असल्यामुळे आपल्या विचारांचा आणि आचारांचा भावी पिढीवर काय परिणाम होईल याचा विचार कुणीही फारसा करत असलेला दिसत नाही. इथे मला गोपाळ गणेश आगरकरांचे एक लेखन आठवते. ते म्हणतात, " कोणी किती व कसले अन्न खावे, कोणत्या घरात राहावे, कोणते कपडे घालावे, कोणता धंदा करावा, दानधर्म किती करावा, कोणते खेळ खेळावे, कशा प्रकारचा व्यायाम करावा वगैरे गोष्टींचा लोकांशी म्हणण्यासारखा संबंध नाही. अशा गोष्टीत ज्याचे त्याला पूर्ण स्वातंत्र्य असले पाहिजे. याच्या उलट कोणत्याही मनुष्याशी केलेले करार पाळणे, कोणासही निष्कारण त्रास न देणे, खरे बोलणे, शक्तीनुसार परोपकार करणे, कायदे पाळणे, कर देणे वगैरे गोष्टीत लोकांशी संबंध येतो म्हणून त्या रूढ राजकीय व सामाजिक नियमास अनुसरून कार्य करावे जरुरीचे आहे". किती छानपणे आगरकरांनी हे विचार मांडले आहे. आज महाराष्ट्रातील राजकीय प्रकार पहिला तर असे वाटू लागते की येथील विचावंताचे मनसुद्धा अंधाराने भरून राहिले आहे. त्यामुळे असे वाटते की धैर्य, कणखरपणा व झुंजार वृत्ती महाराष्ट्रातील राजकारण्यांमधून  नाहीशी झालेली दिसते.  प्रत्येक गोष्टीला अधिकारशाहीचा उपयोग होताना दिसत आहे. तेव्हा उद्याचे दडपण आल्याशिवाय राहत नाही. कारण अधिकारशाही प्रत्येक माणसांचे विचारस्वातंत्र्य नाहीसे करते. असा प्रकार फक्त राजकारणात आहे असे समजू नये. हल्ली हा प्रकार सर्वच प्रकारच्या सामाजिक बाबी मध्ये सुद्धा दिसून येत आहे. त्याचे प्रतिसाद आजचे सण साजरे करताना सुद्धा दिसत आहे. याचे उत्तम उदाहरण द्यायचे झाल्यास दरवर्षी साजरे होणारे तीन महत्वाचे सण. दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्र. हे सण जरूर साजरे झाले पाहिजे यात जरासुद्धा शंका नाही. त्यातून समाजात प्रबोधन होण्यास मदत झाली पाहिजे आणि सर्व समाज एकत्र आला पाहिजे. जेव्हा आपण सार्वजनिक उत्सव साजरे करतो तेव्हा हे उत्सव समूहजीवनाचे वस्तुपाठ बनायला पाहिजे. पण ज्या प्रकारे या सणांचे ध्रुवीकरण झालेले दिसत आहे, त्यातून नागरी जीवनाची शिस्त हरविल्यासारखी वाटत आहे. असे सण साजरे करणारे जी मंडळे आहेत त्यांनी आपली नोंदणी केली पाहिजे, आपला जमाखर्च सामान्य जनतेला उपलब्ध करून दिला पाहिजे. पण हे फारसे होताना दिसत नाही. वर्गणी खंडणी स्वरूपात होताना दिसत आहे. अशा गोष्टी भविष्य काळासाठी चांगल्या नाहीत. म्हणून उद्याचे दडपण आल्याशिवाय राहत नाही.

जागतिकीकरण, उदारीकरण आणि खासगीकरण यामुळे समता दृष्टीत समाज रचना उद्ध्वस्त होताना दिसत आहे. शेतकऱ्यांचे, कामगारांचे, स्त्रियांचे त्याचप्रमाणे दलित, आदिवासी समाजाचे प्रश्न वेगळे रूप धारण करताना दिसत आहे. प्रेमाने कुठलीही गोष्ट सांगण्यांऐवजी द्वे्षाचा वापर करून समाजाचे ध्रुवीकरण होताना दिसत आहे. हे सर्व त्वरित थांबले पाहिजे. केंद्रात आज कार्यक्षम  सरकार आहे. ते यातून नक्की मार्ग काढतील अशी अपेक्षा आणि आशा आहे. नाहीतर त्यांचे परिणाम पुढील पिढीवर होत राहिले तर उद्याचे दडपण आल्याशिवाय राहणार नाही. जर भविष्यात दडपणा शिवाय जगायचे असेल तर महात्मा गांधींचा उपदेश महत्वाचा आहे. ते नेहमी सांगत असत, " Hate the sin and not the sinner' is percept which, through easy enough to understand, is rarely practiced, and that is why the poison of hatred spreads in the world". मराठीत याचा अर्थ असा होईल की पाप करणाऱ्या व्यक्तीपेक्षा त्या पापाचा तिरस्कार करा. हा उपदेश समजण्यास सोपा असला तरी आचरणात क्वचित आणला जातो आणि त्यामुळेच जगात द्वे्षाचे विष पसरले जाते.

तेव्हा द्वेष सोडून प्रेमाची भावना समाजात निर्माण करा म्हणजे उद्याचे दडपण येणार नाही.

धन्यवाद 

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...