रंग लेखणीचे परिवार
आठवडा क्रमांक : २०८
विषय क्रमांक : ४
विषय : खरंच आपण जगतो का?
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
संकेत स्थळ :
मानवी जीवन कितीही स्वतंत्र असले तरीही प्रत्येक व्यक्तीची जीवन जगण्यासाठी वेगवेगळी कारणे असतात. कोणी श्रीमंत होण्यासाठी जगतात तर कोणी आपल्या जबाबदारीची पूर्तता करण्यासाठी जगत असतात. जीवन मूल्यांच्या सर्वोच्च शिखरांवर गेलेलं मन कसं असतं आणि अध:पाताच्या दिशेने ऱ्हास पावणारं मन कसं असतं याविषयी महाराष्ट्रातील थोर विचारवंत आणि लेखक अण्णाभाऊ साळुंखे आपल्या एका पुस्तकात म्हणजे 'मित्रांना शत्रू करू नका' मध्ये दोन सुंदर अनुभव कथन केले आहेत. एका अनुभवात ते सांगतात की मध्यप्रदेशातील भोपाळ या शहरातून विदिशाकडे जात असताना एक म्हातारी व्यक्ती मक्याची कणसं भाजून विकत असताना दिसली. त्या म्हाताऱ्या व्यक्तीबरोबर अजून तीन-चार विक्रेते सुद्धा मक्याची कणसं भाजून विकत होती. अण्णाभाऊ साळुंखेना मक्याची कणसे लहानपणापासून आवडत होती म्हणून त्यांनी गाडी बाजूला उभी करून त्या म्हाताऱ्या विक्रेत्याकडेच कणसं घेण्यासाठी गेले. त्यांनी त्या म्हाताऱ्या गृहस्थाकडे मक्याच्या कणसांचे दर विचारले. तेव्हा त्या विक्रेत्याने सहा रुपयाला तीन कणसं असे सांगितले. तेव्हा त्यांनी घासाघीस करून ती पाच रुपयांना तीन अशी मिळविली. याचा अनुभव सांगताना लेखक म्हणतात की कणसं खाताना त्यांना केलेली घासाघीस अनुचित वाटली आणि त्यांचे मन बैचैन झाले. त्यासाठी त्यांनी ही चूक सुधारण्याचे ठरविले. कणसं खाऊन झाल्यावर त्यांनी त्या म्हाताऱ्या कणसं विक्रेताला सहा रुपये घेण्यास सांगितले पण त्या विक्रेत्याने तसे करण्यास नकार दिला आणि पाचच रुपये घेतले. दुसरा अनुभव सुद्धा भोपाळ रेल्वे स्थानकावरचा आहे. ते सांगतात की चहा पिण्यासाठी ते एका हॉटेलसमोर टाकलेल्या खुर्चीत बसले होते. तिथे सुशिक्षित उत्तम कपडे घातलेले कोणीतरी दोन अधिकारी आले. त्यांनी दोन ग्लास चहा प्याल्यानंतर ते पैसे देऊ लागले, तेव्हा हॉटेल मालकाने आठ रुपये सांगितले आणि त्या दोन अधिकाऱ्यांनी भांडायला सुरुवात केली. वाद घालताना ते म्हणू लागले की आधीच्या दोघांकडून चार रुपये घेतल्याचे आम्ही पाहिले आहे. तेव्हा हॉटेल मालकांनी त्यांना सांगितली की आधीची माणसे गरीब होती. त्यांनी हाफ ग्लासच चहा घेतला होता आणि तुम्ही फुल ग्लास चहा घेतला आहे. तरीसुद्धा शिव्या घालत त्यांनी त्या हॉटेलचे बिल भरले. या दोन गोष्टींचा उल्लेख करून अण्णाभाऊ साळुंखे सांगतात की वृद्ध गृहस्थांसारखे लोक जवळपास काही नसून ही परिपूर्ण आणि तृप्त असतात! त्यामुळेच ते दरिद्री असतात असं कोणीही म्हणतील. ते म्हणणे खरंही असू शकेल. परंतु त्यांना या दरिद्री परिस्थितीतून बाहेर काढण्याची जबाबदारी ही आपलीच असते हे आपण विसरून जातो. म्हणूनच ही जबाबदारी पार पाडण्याची वाट त्या दोन अधिकारांच्या पाठीमागून मात्र जात नाही. ती वाट आपल्याला सापडेल त्या वृद्ध गृहस्थांच्या रक्तातून वाहणाऱ्या जीवननिष्ठेच्या प्रवाहातच! असे सांगून अण्णासाहेब साळुंखे मानवी जीवन जवळपास काही नसूनही ते परिपूर्ण असते याची जाणीव आपणास करून देतात. म्हणूनच आपण मनसोक्तपणे जीवन जगताना स्वतः प्रामाणिक राहणे गरजेचे आहे. मग हे वाचून झाल्यावर आपल्याला असे जाणवीते की आपण आपले जीवन खरोखरच मनासारखे जगताना सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे.
आपण जे जीवन जगतो याचा खरा अर्थ काय? असा प्रश्न जेव्हा आपणास पडतो तेव्हा आपले मन अस्वस्थ होते. त्याला कारणही बाहेरचे वातावरणसुद्धा असते. स्वस्त वातावरणात काही पुस्तके हळुवारपणे मनाला फुंकर घालून नवीन जीवन जगण्याची ऊर्जा निर्माण करत असतात. मग ती पुस्तके कुठल्याही भाषेतील असो. असेच एक विल डुरंट यांनी लिहिलेले इंग्रजी पुस्तक माझ्या वाचण्यात आले त्या पुस्तकाचे नाव आहे, 'On the meaning of Life '. या पुस्तकात लेखकाने जीवनाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. इ.स. १९३२ मध्ये प्रकाशित झालेले हे पुस्तक आजच्या ही पिढीला फारच उपयुक्त असे आहे. विल डुरंट एक तत्वज्ञानी आणि इतिहासकार आहेत. १९३० च्या सुमारास चांगले कपडे घातलेला अनोळखी माणूस विल डुरंट यांच्या न्यूयॉर्क येथील घरासमोर आला. त्याने डुरंट यांच्याजवळ जीवन जगण्याचा अर्थ काय? असा प्रश्न केला. जीवन जगण्यासाठी काही तात्विक कारणे आहेत का? अशी सुद्धा विचारणी केली. जर त्याला तात्विक कारणे मिळाली नाही तर तो आपले आयुष्य संपवून टाकणार असे त्याने विल डुरंट यांना सांगितले. डुरंट यांनी अनेक कारणे त्याला देऊन त्याला आत्महत्येपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. मग तो मनुष्य तिथून निघून गेला आणि डुरंट यांना तो परत कधीच दिसला नाही. एका अनोळखी माणसाला आत्महत्येच्या विचारापासून दूर करणे आणि त्याला जीवनाचे महत्त्व समजून सांगणे विल डुरंट यांना कठीण झाले होते. या कोंडीने अनेक प्रश्न निर्माण केले होते. जीवनाचा सोपा अर्थ आनंद होईल. तरीपण तो व्यापक पद्धतीने शोधाण्यासाठी विल डुरंट यांनी अनेक विचारवंतांना अर्थ समजून सांगण्यासाठी एका पत्राद्वारे आव्हान केले. हे पत्र त्यांनी कलाकार, लेखक, शास्त्रज्ञ, शिक्षक, राजकीय व धार्मिक नेते, खेळाडू, तत्वज्ञानी आणि कैद्यांनासुद्धा लिहिले. त्यात त्यांनी त्यांच्या जीवन जगण्याचा काय अर्थ आहे, तुम्ही कसे जगत आहात आणि तुम्हाला आयुष्याची कशी मदत होते. त्याचप्रमाणे तुम्ही काम करीत असलेल्या कामाचा तुम्हाला आनंद कसा मिळतो आणि त्यात तुम्ही कसे समाधानी आहात. याबद्दल नीट समजावून सांगण्याचे आव्हान केले. त्यांनी हे पत्र जगातील शंभर व्यक्तींना पाठविले. त्यात महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, बेट्रँड रसेल, जॉन एरिस्कीन, जॉर्ज बर्नोड शॉ सारख्या व्यक्ती होत्या. यातील बऱ्याच जणांनी उत्तरे पाठवली आणि जीवनाचा आनंद कसा घेतला हे सुद्धा लिहिले आहे. या आलेल्या उत्तरातून विल डुरंट यांनी खूप चांगला निष्कर्ष काढला आहे. त्यांचा निष्कर्ष असा आहे की त्यांना जाणीवपूर्वक जगण्याची इच्छा आहे, ज्यांना कार्यें जाणून घेण्याची आणि सर्वोत्कृष्ट निर्मिती करण्याची इच्छा आहे, त्यांनी शंकास्पद वागण्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. अस्वस्थ वातावरणामुळे आपण निराशावादी बनली नाही पाहिजे. आपली घरे किंवा संपत्ती रिक्त झालेली नसून आपली अंतःकरणे रिक्त झाली आहे. त्यासाठी मानवाच्या महानतेवर विश्वास ठेवून आपण माणसाला आत्महत्येपासून परावृत्त करू शकतो आणि जीवनाचा आनंद घेऊ शकतो. विल डुरंट शेवटी असेही सांगतात की ज्ञानप्राप्तीच्या सर्व गोष्टी विज्ञानात आहे आणि विज्ञान सर्व प्रकारच्या रिमिक्स साठी मुक्त आहे. विज्ञानाचा उपयोग सर्व मानव जातीसाठी करून मानवाला सुखी करता येऊ शकते. त्यासाठी तत्त्वज्ञानाची सुद्धा मदत होऊ शकते. म्हणूनच विद्यापीठे या आमच्या महान संस्था आहेत. त्या आम्हाला नवीन कल्पना, नवीन शोध लावण्यास मदत करते आणि आमची आशावादी दृष्टी विकसित करण्यासाठी मदत करीत असतात. म्हणूनच 'On the Meaning of Life' हे पुस्तक जीवनाचा अर्थ समजून घेण्यासाठी फार उपयुक्त आहे आणि ते वाचून झाल्यावर वाटत राहते की खरोखरच आपण जीवन जगतो का?
बऱ्याच वेळा माणसे एक प्रश्न विचारीत असतात की बाहेर आज निराशेचे वातावरण असताना आपण कशासाठी जगायचे. असे प्रश्न मला नेहमी कोत्या मनाचे वाटतात. शंभर वर्षाचे आयुष्यसुद्धा कमी पडावे अशी ब्यवस्था परमेश्वराने निर्माण केली आहे. तरी सुद्धा असे प्रश्न का पडावेत याचे आश्चर्य वाटत असते. एखादा महात्मा जेव्हा लोकांचे अश्रू पुसत त्यांच्या मुठीमध्ये अहिंसेचे तत्वज्ञान भरून त्यांना बलाढ्य साम्राज्याविरुद्ध लढण्यासाठी तयार करतो तर एक डॉक्टर बाबासाहेब बनून वर्षानुवर्षे पिडीत राहिलेल्या समाजाला शिक्षण आणि नवीन कार्यें देऊन भारतीय समाजाला आधुनिक बनविण्याचे प्रयत्न करतो. ज्या धर्मात कुठलाही बदल होणे शक्य नसताना आपल्या धर्माच्या भगिनींना न्याय मिळावा म्हणून हमीद दलवाई सारखा माणूस उभा राहतो. तेव्हा कशासाठी जगतो आहोत? असा प्रश्न का पडावा हे समजत नाही. आजही भारतीय समाजातील वातावरण निराशाजनक झाले असले तरी अशावेळीस आपल्याला जगण्यासाठी म्हणून कुणी गात असत, कुणी लिहीत असत, कुणी नवीन तत्वज्ञानाचा शोध लावीत असत. मग तेव्हा वाटत की जगण्यात खूपच आनंद आहे. जेव्हा मी झाकीर हुसेन यांच्या तबला वादनाचा कार्यक्रम ऐकत असताना त्यांनी अशा काही अनवत मात्रा घेतल्या तेव्हा झालेला आनंद मी शब्दात व्यक्त करूच शकत नव्हतो. अशावेळीस मी त्या उस्तादाने निर्माण केलेल्या गोष्टीला दाद देत परमेश्वराचे आभार मानत असतो कारण त्या परमेश्वराने मला तो आनंद घेण्यासाठी जीवन दिलेले आहे असे मी समजत असतो. असाच प्रकार मला बेगम अख्तर यांची गजल ऐकताना होतो. त्याचप्रमाणे कुमार गंधर्व, लता मंगेशकर यांचे गायन ऐकताना झालेला आनंद व्यावहारिक पातळीवर मोजूच शकणार नाही. क्रिकेट या खेळाने जीवन कसे जगावे याचे सुंदर विवेचन जगाला दिले आहे. कारण हा खेळ मानवी जीवनाच्या प्रत्येक अंगाने व्यक्त होत आहे. नुसती हार आणि जीत पाहणे म्हणजे क्रिकेट नव्हे. त्यापेक्षाही तो मोठा खेळ आहे. म्हणूनच सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, कपिल देव, अनिल कुंबळे, विव्ह रिचर्ड्स, इयान बोथम, वगैरे सारख्या खेळाडूंचा खेळ पाहताना आनंद द्विगुणित करून गेला आहे. या सर्व गोष्टीनीसुद्धा दिलेला आनंद सुद्धा आपले जीवन आनंदायी केलेले आहे याची जाणीव करून देत असतं.
सुप्रसिद्ध विचारवंत आणि लेखक अण्णासाहेब साळुंखे आपल्या लेखात एके ठिकाणी म्हणतात की, "अंधाराची आणि प्रकाशाची लढाई तशी फार जुनी आहे. मानवी जीवनातही ती फार काळापासून चालू आहे. अज्ञान, द्वेष, मत्सर, हिंसा, दुसऱ्यावर वर्चस्व गाजविण्याची वृत्ती, निष्क्रियता असा किती तरी प्रकारचा अंधार आहे. ज्ञान, प्रेम, अहिंसा, इतरांच्या स्वातंत्र्याचा आदर, उपक्रमशीलता अशा स्वरूपातील प्रकाशाचं त्या अंधाराबरोबर सतत युद्ध सूरू आहे. या युद्धात अंधाराचा पाडावं व्हावा आणि प्रकाशाचा विजयाने अवघे मानवी जीवन उजळून निघावे, यासाठी ही सगळी धडपड आहे". किती छानपणे त्यांनी जीवनाचा आनंद घेत जगण्यासाठी हा उपदेश केला आहे. जीवनाचे मोल जाणून माणसाने प्रत्येक क्षण मनापासून अनुभवावा म्हणून त्यांनी वरील वाक्ये शब्दबद्ध करत जीवनाचे सरळ साधं तत्वज्ञान ते आपल्या पर्यंत पोहचवत आहेत. अनेक वेळेस असे जाणवू लागले आहे की माणूस जीवनाचा अर्थच नीटपणे समजून घेत नाही. कुठल्याही कलेत जर आपल्याला पारंगत व्हायचे असेल तर त्याला जाणीवपूर्वक स्वतःला घडवावे लागेल. जर कुणी असे जगत असेल तर त्याचे कौतुक आपण केले पाहिजे. म्हणूनच अण्णासाहेब साळुंके आपल्या,' चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये, म्हणून! या पुस्तकात म्हणतात," जीवनाच्या प्रवासात मला आलेले छोटे- छोटे अनुभव मी इथे नोंदवले आहे. पण वरवर पाहता छोट्या वाटाणाऱ्या अनुभवांमध्ये बरेचं काही महत्वाचे साठवलेलं आहे". असे सांगून ते म्हणतात, " जीवनाच्या वाटचालीत कमी महत्वाच्या गोष्टीमागे धावता धावता जीवन जगण्याचा खराखुरा आनंद मिळावायचा विसरून जातो ". याचा अर्थ समजवतांना ते सांगतात की शक्य तितके पैलू लक्षात घेऊन स्वतःची मते बनविली पाहिजेत, नावाच्या नात्यापेक्षा हृदयाचे नाते जपणे फार महत्वाचे आहे, पानगळ झालेली झाडेसुद्धा आपल्यामध्ये चैतन्य निर्माण करू शकतात आणि आपली फुलण्याची क्षमता वाढविण्यास मदत करतात. त्यामुळेच कितीही फुललो तरी फुलण्यास वाव मिळतो". ते पुढे एका ठिकाणी म्हणतात, "जीवनाच्या प्रवासात जे संघर्ष करायचे असेल तर ते जरूर केले पाहिजे. अन्यायाचा प्रतिकार केला पाहिजे. शोषणातून मुक्त होणासाठी धडपडले पाहिजे. फक्त हे करताना आपला विवेक जागा असला पाहिजे". किती छान पणे अण्णासाहेब साळुंखे यांनी सांगितले आहे. मानवी जीवन हे सहा ऋतूत बहरले पाहिजे. आनंदाने आणि उत्साहाने फुलून आले पाहिजे. या सहा ऋ्तूंचे अनुभव मानवी जीवनात प्रतिबिंबित झाले पाहिजे. तेव्हाच आपल्या निराश झालेल्या मनला नवीन पालवी फुटून नवीन जीवन जगण्याची प्रेरणा मिळेल. इथे मला कवी मंगेश पडगावकर यांनी लिहिलेली कविता आठवते. ती कविता खालील प्रमाणे आहे.
रंगांचा उघडूनिया पंखा, सांज कुणीही केली
काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली
सहा ऋ्तूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे.
या सर्व गोष्टीचे विश्लेषण केल्यावर सुद्धा आजचे मानवी जीवन बघितल्यावर असा प्रश्न पडतो की खरचं आपण जगतो का? तेव्हा जीवन आनंदाने जगण्यासाठी या मिळालेल्या जन्मावर शतदा प्रेम करूया आणि जीवन आनंदी करूया.
धन्यवाद
Comments
Post a Comment