रंग लेखणीचे परिवार
आठवडा क्रमांक : १९५
विषय क्रमांक : ४
विषय : जीवन हे जीवन की वणवण
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
आपले जीवन जगण्यासाठी सर्व जीव प्रत्येक गोष्टीसाठी वणवण फिरत असतात. मग तो मनुष्य असो किंवा वन्यजीव असो. आपल्या अन्न आणि पाण्याची सोय करण्यासाठी त्याला वणवण फिरावेच लागते. या सृष्टीतील अनेक भागात पाणी आणि अन्नाची खूप कमतरता असते. प्रत्येक ठिकाणी खळखळणारे नदीनाले, पाण्याने भरलेले डोह किंवा झुळझुळ वाहणारे पाण्यांचे प्रवाह असेलच असे नाही. काही ठिकाणी अन्न निर्माण करण्यासाठी सुपीक जमीन असते तर काही ठिकाणी नापिक जमीन असते. अशावेळीस या सृष्टीतील प्रत्येक जीव इकडे तिकडे अन्न किंवा पाणी मिळविण्याठी वणवण करणारच. यात मानवी जीवन हे खूपच वेगळे आहे. त्याचे स्वरूप, विविध अंगाने बनलेले त्याच्या चिंतानाचे स्वरूप आणि वर्णन यांचे अनोळखे दर्शन आपणास जाणवत असते. जन्माला आल्यापासून माणूस मरेपर्यंत प्रपंच म्हणून, संसार म्हणून घाण्याला जुंपलेल्या बैलाप्रमाणे चाके फिरवत राहतो. ते करत असताना तो दमतो, थकतो आणि शेवटी थकून हे जीवन सोडून जातो. हे सर्व करताना त्याने स्वतःचा आणि मानवजातीचा विकाससुद्धा केलेला आहे हे विसरून चालणार नाही. त्यासाठी पाणी हा त्याच्या आयुष्याचा महत्वाचा घटक बनला आहे. त्याचे शरीर बऱ्याच अंशी पाण्याने बनले आहे. माणूस एक वेळ अन्नाशिवाय राहू शकेल पण पाण्याशिवाय नाही. त्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी त्याला वणवण करावी लागत आहे. पाणी हे माणसासाठी जीवन आहे. त्याला पाण्यासाठी करावी लागणारी वणवण थांबवायची असेल तर पाण्याचा मुबलक साठा तयार करण्यासाठी अनेक वैज्ञानिक प्रकल्प तयार करावे लागतील जेणेकरून त्याला पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही.
'जगाच्या पाठीवर' नावाचा एक मराठी चित्रपट चाळीस वर्षांपूर्वी येऊन गेला होता. त्यात एक गाणे होते. एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे | जरतारी हे वस्त्र मानवा, तुझिया आयुष्याचे|| खरोखरच या गाण्यात कवी ग. दि. माडगूळकारांनी मानवी जीवनाचे खरे स्वरूप सांगितले आहे. एखाद्या गोष्टीसाठी माणूस सुखाच्या भ्रामक कल्पनेच्या मागे धावत असतो. अशावेळी त्यातील सुखाचे आणि दुःखाचे प्रमाण किती व्यस्त असते हे तो अनुभवत असतो. हे तत्वज्ञान सर्व मानवाला व्यवस्थितपणे लागू पडते. मग तो दिवसभर अंग मेहनत करणारा मजूर असो किंवा लक्षावधी रुपयांची उलाढाल करणारा श्रीमंत मनुष्य असो. असे कितीतरी प्रश्न मानवी जीवनाशी वेढून असतात. कधी त्याची उत्तरे सापडतात तर कधी नाही. कधी तडजोड करावी लागते तर कधी गुंता सुटत नाही म्हणून दोरच कापावे लागतात. मग हेच तुटलेले दोर वेगळ्या प्रकारे जीवनात परत नावीन्य निर्माण करीत येत असतात. कुणाचे जीवन कधी कुणाला काय शिकवून जाईल तर कुणाला त्यातून काहीच बोध होणार नाही. क्षणभर असे समजुया की आयुष्य नुसते गोड गोड असते किंवा संकटे, अडचणी दुःख या सर्व गोष्टी आयुष्यापासून दूर आहेत. मग प्रश्न पडतो की असे आयुष्य जगण्यात चव आहे का? हे खरे आहे की कधी दुःख लांबते तर कधी नैराश्य पण कधीतरी ते संपणारच. सुख जसे कायम नसते तसे दुःख सुद्धा नसते. उलट सुखापेक्षा दुःख अधिक डोळस वृत्ती तयार करते आणि जीवन समृद्ध करीत असते. म्हणून मानवी जीवनामध्ये एकच धागा सुखाचा असतो तर शंभर धागे दुःखाचे असले तरी वस्त्र जरतारी हे एक महावस्त्र आहे. ते कसे विणायचे हे माणसालाच शिकायचे आहे. त्यासाठी त्याला जीवनात वणवण करणे जरुरीचे आहे.
सत्तरच्या दशकात आनंद नावाचा एक हिंदी चित्रपट येऊन गेला होता. त्यात मानवी जीवनाचे खूप छान तत्वज्ञान सांगितले गेले आहे. राजेश खन्ना या हिंदी चित्रपट कलाकाराने आनंदची व्यक्तिरेखा आपल्या अफाट अभिनयाने खूप सुंदर बनविली. मृत्यू समोर दिसत असतानासुद्धा आनंद या व्यक्तिमत्वाचा ढंग एकाचवेळी हसवणारा आणि रडवणारा होता. जिंदगी बडी होनी चाहिए लंबी नही | हे वाक्य छोटसं आयुष्य सुद्धा छानपणे जगता येत हे सूचित करून जातं. खरोखरच आनंद म्हणतो त्याप्रमाणे जीवन एक सुंदर रंगभूमी आहे. त्यात दोन घडीचा डाव आहे. संघर्ष आहे. त्यात चढउतार हे जरूर असतात. सतत सुख किंवा सतत दुःख असे आढळणार नाही. कुठल्याही क्षेत्रात गेलात तर कोणी मागे तरी असेल तर कोणीतरी फारच पुढे गेलेला असेल. त्यासाठी आपल्याला जीवनात नेहमी गतिमान राहून प्रगतीपथावर जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. जरी जीवनाच्या व्याख्या अनेक थोर पुरुषांनी केल्या असल्या तरी स्वतःचे जीवन जगण्याचा अनुभव अधिक महत्वाचा असतो. त्यासाठी मानवी जीवनात प्रेमाला फार महत्व आहे. द्वेष, तिरस्कार माणसांचे जीवन घडवीत नसतात तर ते त्याचे जीवन संपवीत असतात. द्वेष केल्याने माणूस सुखी न होता फार दुःखी कष्टी होतो. त्यासाठीच मानवी जीवनात प्रेम या शब्दाचे अतूट नाते आहे. म्हणून आनंद या चित्रपटात मृत्यू आपल्या समोर दिसत असूनसुद्धा त्यातील नायक उरलेले आयुष्य हसत खेळत जगतो आणि आयुष्य सुंदर करून मृत्यूला जवळ करतो. आयुष्यातील नुसते दुःख गोंजारण्यापेक्षा आजूबाजूला दिसणाऱ्या सुंदर गोष्टी पाहून त्यात आनंदी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. सतत खळखळणारे लहान मुलांचे हसणे, पहाटेच्या प्रहरी कोणीतरी बासरीतून घातलेली साद, आभाळात मनसोक्त फिरणारे पक्ष्यांचे थवे, कोणीतरी सुंदर लिहिलेली कविता वाचताना होणारा आनंद, अचानकपणे आपल्या जुन्या प्रिय व्यक्तीशी झालेली भेट, रंगलेला एक सुंदर क्रिकेटचा खेळ अशा कितीतरी गोष्टी आपले जीवन सुंदर करीत असतात. असे आयुष्य जगण्याचा माणसाने प्रयत्न जरूर केला पाहिजे, मग त्यासाठी कितीही वणवण करावी लागली तरी ती केली पाहिजे. कारण कितीही अडचणी आल्या तरी मेहनतीने जे फळ मिळते त्याने ते जीवन खूपच सुंदर वाटू लागते.
मराठीतील सुप्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर जीवनावर भाष्य करताना आपल्या कवितेत जीवनावर समरसून प्रेम कसे करायचं, कसे जगायचं याचे विश्लेषण करतात. म्हणूनच एका कवितेत ते म्हणतात,
"या जन्मावर, या जगण्यावर,शतदा प्रेम करावे
रंगाचा उघडूनिया पंखा, सांज कुणीही केली
काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली
सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे.
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे ".
खरोखरच जीवन सुंदर आहे आणि ते अधिक सुंदर करण्यासाठी वणवण आवश्यक आहे.
धन्यवाद
Comments
Post a Comment