रंग लेखणीचे परिवार
आठवडा क्रमांक : १७५
विषय क्रमांक : ५
विषय : तडजोड ( लेख )
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
संकेत स्थळ :
तडजोड ही एक मूलभूत वाटाघाटीची प्रक्रिया आहे. त्यात दोन्ही पक्ष त्यांना हवे असलेले काहीतरी सोडून देतात. त्यासाठी दोन्ही पक्षांच्या लोकांनी दुसऱ्या पक्षातील लोकांचा दृष्टीकोन समजून घ्यायला हवा. यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःचा अहंकार बाजूला ठेवावा लागतो. कारण अहंकार आपल्याला इतरांच्या चांगल्या गोष्टी पाहण्यास प्रतिबंध करतो. बऱ्याच वेळा प्रबळ इच्छाशक्ती असलेले लोक दुसऱ्यांचा दृष्टिकोन समजून घेण्यास तयार नसतात. त्यामुळे संघर्ष होतो आणि त्यात सर्वांचे नुकसान होत जाते. त्यासाठी सतत संवाद करून दोन्ही पक्षांनी एकत्र बसून मार्ग काढले पाहिजे. इथे मला भगवान श्रीकृष्णाचे चरित्र आठवते. श्रीकृष्णाने बऱ्याच वेळा तडजोडी करून सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न केले आहेत हे त्याचे चरित्र वाचताना जाणवते. महाभारतात युद्ध टाळण्यासाठी श्रीकृष्ण शांतिदूत बनून जातो आणि तडजोड करताना पांडवासाठी फक्त पाच गावे मागतो. हे सर्व करताना तो युद्ध टाळण्याचा प्रयत्न करून सर्व मानवजातीला होणाऱ्या हानीपासून वाचवू पाहत असतो. पण प्रबळ इच्छाशक्ती असलेला अहंकारी दुर्योधन ही तडजोड नाकारतो आणि युद्धाला सामोरे जातो. त्यात सर्वात जास्त नुकसान कौरव सेनेचे होते. म्हणूनच आपला अहंकार बाजूला ठेवून दुसऱ्याना समजून घेतले पाहिजे. इथे अजून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तडजोड करणे म्हणजे कमीपणा घेणे नाही किंवा माफी मागणे सुद्धा नाही. इथे भगवान श्रीकृष्ण तडजोड करायला जातात पण आपला स्वाभिमान कुठेही हरवून बसत नाहीत. म्हणून श्रीकृष्णाचे चरित्र वाचताना एक गोष्ट नक्कीच समजते ती म्हणजे तडजोड ही जीवनशैली आहे आणि आपला अधिकार कुठे वापरावा आणि कुठे वापरू नये एवढे समजल्यावर तडजोडही कशी करावी हे समजून येते.
बऱ्याच वेळा आपण असेही पाहत असतो की तडजोड जरी जीवनशैली असली तरी काही बाबतीत तडजोड होणे शक्य नसते. याला कारण आहे माणसाच्या भौतिक आणि अभौतिक गरजा. अन्न, निवारा, पाणी, सुरक्षेची भावना, ओळख, आपलेपणा आणि स्वातंत्र्य यावर जेव्हा आवश्यकतेनुसार विवाद होतो तेव्हा कोणीही सहसा तडजोड करीत नाही जेव्हा एखाद्या व्यक्तीला किंवा संघटनेला असे वाटते की तडजोड झाल्याने दुसऱ्या व्यक्तींचा किंवा दुसऱ्या संघटनेचा स्वतःच्या भवितव्यावर नियंत्रण राहील तेव्हा अशा व्यक्ती किंवा संघटना तडजोड करण्यास तयार होणार नाही. यासाठी उत्तम उदाहरण आहे अमेरिकेतील काळ्या लोकांचा संघर्ष. त्यांनी स्वतःला गुलामगिरीतून सोडविण्यासाठी लढा दिला आणि त्यासाठी कायदेशीर नियंत्रण आणले आणि स्वतःसाठी कायदे केले तेव्हा ही माणसे हे कायाद्याचे नियंत्रण सोडण्यास तयार होणार नाही. यासाठी दुसरे उदाहरण बघायचे झाल्यास भारताचे देता येईल. भारतीय संविधानात दिलेल्या सवलतीवर तडजोड करण्यास दलित समाज तयार होणार नाही. जर कुठल्याही भारतीय सरकारने यात काही बदल करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या समाजाला परत एकदा गुलामगिरीत राहावे लागेल अशी त्यांची भावना असते. इथे नियंत्रण आणि ओळख त्यांच्यासाठी मूलभूत गरजा आहेत त्यामुळे तडजोड होणे शक्य नाही. काही तज्ञांच्या मते संघर्षाच्या निराकरणासाठी तडजोड करताना वाटेल तशा सवलती देऊ नये. अशावेळीस तडजोड करताना वास्तविक गरजा लक्षात घेऊनच तडजोड करावी आणि खराब झालेले नातेसंबंध परत सुधारण्यासाठी प्रयत्न करावे.
वाटाघाटी आणि मध्यस्थी प्रकियेतील मतभेद सोडविण्यासाठी तडजोडीचा वापर हा सामान्य उपाय आहे. पण तडजोड नेहमीच माणसांचे वैयक्तिक किंवा संस्थात्मक संघर्ष असलेल्या समस्यांचे निराकरण करत नाही. याचे कारण म्हणजे तडजोड हे वारंवार एखाद्या समस्येचे उत्तर झाले आहे पण ते सर्व लोकांसाठी समाधानकारक असेल असे सांगता येत नाही. तडजोड प्रक्रिया कार्यात्मक किंवा भौतिक समाधान निर्माण करू शकेल परंतु मतभेदांशी संबंधीत भावनिक समस्यांचे निराकरण करू शकत नाही. त्यामुळे दोन्ही पक्षातील वाईट भावना आणि वाद हे कायम असंतोषाचे कारण राहतील आणि एकमेकांशी संपर्क ठेवल्यास ते पुन्हा प्रकट होत राहतील. कारण तडजोड करताना दोन्ही पक्षांना त्यांना हवे असलेले काही मिळते सर्व नाही. बहुतेक विवाद स्पर्धात्मक रणनीतीपासून सूरू होतात जेथे दोन्ही बाजूसाठी सर्वोत्तम संभाव्य परिणाम हेच ध्येय असते. त्यासाठी वेळेची आवशकता, आर्थिक खर्च, प्रभावाचा वापर आणि व्यावहारिक बाबी सारखे अनेक घटक या समीकरणात येतात. तेव्हा तडजोडी सारखा प्रकार इथे उपयोगी पडेल असे वाटत नाही. संघर्ष आणि मतभेद व्यवस्थापित करण्यासाठी तडजोड ही प्रभावी पद्धत आहे परंतु ती सर्वोत्तम आहे असे मात्र म्हणता येणार नाही. काही मुद्यांवर असहमतीसाठी सहमती असण्याची शक्यता असू शकते. विवाद असह्य होतो आणि पूर्णपणे सहमत होऊ शकत नाही तेव्हा तडजोडीचा प्रकार उपयोगी नसतो. जेव्हा एखादा संघर्ष होतो आणि तो टाळण्यासाठी तडजोड करण्याचा प्रयत्न केला तर एवढेच लक्षात ठेवले पाहिजे की तडजोड करताना महत्वाच्या समस्या किंवा महत्वाच्या गरजा गमावल्या जाणार नाही. कधी कधी सर्जनशील उपायांची आवश्यकता असते. सर्व मतभेद आणि मतभेदांवर वाटाघाटी करण्याची गरज नसते. जेव्हा समस्या सोडविण्यासाठी तडजोड किती आवश्यक आहे याची जाणीव करून घेण्यासाठी दोन्हीबाजूचा दृष्टीकोन समजून घेतला पाहिजे. म्हणून तडजोड ही विवादांचे निराकरण करण्यासाठी आदर्श प्रतिक्रिया नसते. यात कोणताही पक्ष समाधानी असू शकत नाही. त्यामुळे समस्या कायम राहू शकते. तडजोड ही एक प्रभावी पद्धत असू शकते जेव्हा इतर दृष्टीकोन कार्यक्षम नसतात किंवा परिस्थितीला या पद्धतीचा फायदा होऊ शकतो.
तडजोड केल्याने आपले संबंध आपल्या नातेवाईकांबरोबर किंवा मित्रांबरोबर चांगले राहतात. तेव्हा आपल्या कुठल्या भूमिकेवर तडजोड करावी किंवा कोणत्या लढाया लढण्यास योग्य आहे हे जाणून घेणे जरुरीचे आहे. त्यासाठी काही गोष्टी लक्षात घेणे जरुरीचे आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आपण आपला अहंकार सोडून द्यायला पाहिजे. आपण एकटे अनेक गोष्टी करू शकतो किंवा मला कुणाचीही गरज नाही ही भावना आपल्या मनातून काढून टाकायला हवी. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीने भूतकाळात केलेल्या चुका विसरून जाणे आणि त्या गोष्टीला कायमची तिलांजली देणे. आपल्या अपेक्षांचा पुनर्विचार करणे. यासाठी जेव्हा चर्चा होतात आणि वाद होतात तेव्हा तिथे शांत राहणे जरुरीचे आहे त्यामुळे आपण भांडणापासून दूर राहू शकू. सर्वात शेवटचे म्हणजे आपण बदलण्यासाठी तयार व्हावे. तडजोड प्रक्रियेमध्ये हा सर्वात महत्वाचा भाग आहे. जेव्हा तुम्ही तडजोडीस तयार होता तेव्हा सर्वांना जाणवेल की तुम्ही पूर्णपणे तडजोड करण्यास तयार असून फक्त भांडण संपविण्यासाठी खोटी आश्वासने देत नाही आहात. एवढ्या चार गोष्टी जरी आत्मसात केल्या तर तडजोडीने तुमचे कोणतेही नाते सुधारू शकेल.
धन्यवाद
Comments
Post a Comment