रंग लेखणीचे परिवार
आठवडा क्रमांक : १७४
विषय क्रमांक : ४
विषय : मी व्यस्त
शब्दांकन : योगेश गोगवेक
रंग लेखणीचे परिवार
आठवडा क्रमांक : १७४
विषय क्रमांक : ४
विषय :मी व्यस्त
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
मी व्यस्त आहे हे फक्त तीन शब्द असे असतात की आपल्याला कुठलेही आमंत्रण नाकारण्याचा एक भाग म्हणून उच्चारत असतो. जेव्हा आपण एखाद्याला असे उत्तर देतो तेव्हा आपण त्यास सांगू इच्छितो की आपण जे महत्वाचे काम करीत आहोत ते काम इतर कुठल्याही कामापेक्षा फार महत्वाचे आहे. अशावेळी मला एक इंग्रजीत लिहिलेले वाक्य आठवते. ते वाक्य असे आहे, " When we describe ourselves as busy, it takes away the intention behind our priorities ".( याचा अर्थ मराठीत असा आहे की जेव्हा आपण स्वतःला व्यस्त असल्याचे सांगतो तेव्हा त्यामागे आपण कशाला प्राधान्य देत आहोत हे सांगत असतो). जेव्हा मी हे वाक्य वाचतो तेव्हा या वाक्यात किती खोलवर अर्थ दडला आहे याची जाणीव असते. आपण एखाद्याचे आमंत्रण जेव्हा नाकरतो तेव्हा ते नाकारण्याचे कारण आपण व्यवस्थितपणे एखाद्याला सांगणे जरुरीचे आहे. जर आपण तसे केले नाही तर आपले संबंध बिघडण्यास कारण होऊ शकते. म्हणून नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की आपण जे काही काम करीत आहोत ते आपण दुसऱ्या कुणाचेही नसून स्वतःचेच महत्वाचे काम करीत असतो. यासाठीच स्वतःचे आपल्या वेळापत्रकावर नियंत्रण असायला तर हवेच आणि आपण व्यस्त असण्याचे कारणही अर्थपूर्ण असायला हवे आहे.
मी व्यस्त आहे हे एक आमंत्रण नाकारण्याचे उत्तम प्रकार आहे. हार्वर्ड बिझनेस स्कुलमधील एका संशोधकांच्या गटाने अलीकडेच आपण सामाजिक किंवा व्यावसायिक आमंत्रणे नाकारण्या मागील कारण काय आणि त्याचा आपल्या धारणा किंवा वर्तनावर काय परिणाम होतो याचा शोध घेण्याचा प्रयोग करण्यात आला होता. त्यात त्यांनी तीनशे कार्यरत असलेल्या लोकांना विचारले की जर तुम्ही तुमच्या मित्राला तुमच्याकडे जेवणाचे आमंत्रण दिले आणि त्याने नकार दिला तर त्या नकारा मागील कारण कोणते असेल? याचे उत्तर त्यांनी नकारामागील व्यवस्थित परिस्थिती लक्षात घेऊन उत्तर द्यावे असे सांगितले. त्यात दहा बारा व्यक्तींनी त्यांच्या मित्रांचे आर्थिक प्रश्न असल्याचे सांगितले तर बाकी सर्वांनी त्यांचे मित्र कुठल्यातरी कामात व्यस्त आहे म्हणून त्यांनी त्यांचे आमंत्रण नाकारले असे सांगितले. तेव्हा या संशोधनातून एक निष्कर्ष काढण्यात आला की आर्थिक कारणापेक्षा व्यस्त असलेले कारण अधिक परिणाम करणारे वाटले. त्यामुळे आमंत्रण नाकारणाऱ्याचे नातेसंबंध बिघडत नाही आणि व्यस्त कारण त्या नातेसंबंधना व्यवस्थित संरक्षण देत असते. या संशोधनात असे पाहण्यात आले की जरी आपण आमंत्रण नाकारताना असे सांगितले की मी व्यस्त आहे तेव्हा आपण कशासाठी व्यस्त आहे हे नीटपणे व प्रामाणिकपणाने समजून सांगितले पाहिजे. तेव्हा असेही म्हटले पाहिजे की मी एका प्रकल्पावर काम करीत आहे आणि ते काम दहा दिवसात संपेल. ते संपल्यानंतर आपण भेटू असे सांगून समोरच्याचे आभार मानले तर नात्यात अधिक घट्टपणा येऊन त्या व्यक्तींची आपल्याला मदत होऊ शकते. मगच मी व्यस्त आहे हा एक प्रभावी पर्याय आहे असे आम्ही म्हणू शकतो.
पारंपरिक शहाणपण सांगते की जगाची भरभराट होण्यासाठी व्यस्तता आवश्यक आहे. पण ही व्यस्तता नियंत्रणाबाहेर जाता कामा नये. कधीकधी ही व्यस्तता आपल्या जीवनातील अनेक पैलू दूर करेल. हे इतके सूक्ष्मपणे घडते की त्यामुळे आपल्या नातेसंबंध न कळत दूर होत जातात. मग आरोग्याच्या भीतीने आपण चिंताग्रस्त होत जातो. त्यासाठी व्यस्तता नियंत्रणात असायला हवी. यासाठी काही गोष्टी आपण केल्या पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या नातेवाईकांबरोबर त्यांच्या कार्यक्रमात सामील होण्यास तयार झाले पाहिजे. त्यांच्या अपेक्षापूर्ण करण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत उपस्थित राहण्याची आपली क्षमता व्यस्ततेमुळे हिरावून घेतली गेली नाही पाहिजे. कुठलीही व्यस्तता आपली ऊर्जा कमी करू शकते त्यामुळे आपल्याला थकवा जाणवू शकतो, प्रचंड निराश व्हायला होते आणि मनाची चिडचिड होते. त्यासाठी आपल्या कामाशी असलेला संबंध थोडा वेळ थांबवून व्यवस्थित झोप घेणे जरुरीचे आहे. चांगले वाचन किंवा सतत लेखन करणे, चित्रपट किंवा नाटक पाहणे, गाण्याचे कार्यक्रमांना उपस्थित राहून गाणे ऐकणे, वगैरे गोष्टी आपल्याला ऊर्जा देऊ शकतात आणि आपण करीत असलेले काम मार्गी लागू शकते. त्याचप्रमाणे कामाला आराम देऊन थोडे दिवस सुट्टी घेऊन कुटुंबासमवेत बाहेगावी फिरायला जावे. त्यामुळे आपली कार्यशक्ती वाढण्यास खूपच मदत होईल. म्हणून व्यस्तता जशी गरजेची आहे त्याचप्रमाणे तिच्यावर नियंत्रण असणे जरुरीचे आहे.
बऱ्याच वेळेला आपण पाहतो की बरेचजण व्यस्त असल्याचा दावा करीत असतात आणि त्यात त्यांना सन्मान वाटत असतो. कधी कधी हा प्रकार सन्मानाचा न राहता तुमच्या क्षमतेचा राहील. अशावेळीस तुमचे सहकारी किंवा मित्र तुमच्याबद्दल काहीतरी वेगळेच बोलत असतात. याला बरीच कारणे असतात त्यातील एक कारण म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या मीटिंगमध्ये असता तेव्हा तुमचा मोबाईल किंवा लॅपटॉप तपासता हे उचित असेल का? तुम्ही एकापेक्षा अधिक कामावर लक्ष केंद्रित केले असेल तर ते सामान्य आहे की खरोखरच उपयुक्त आहे याचा विचार करून त्या कामाची प्राथमिक गरज जाणून घेतली आहे का? असे प्रश्न तयार होतात. तुमच्याकडे खूप काम आहे ही भावना बरोबर वाटत नाही. त्यामुळे तुमचे करियर आणि सहकार्यांबरोबरचे संबंध खराब होऊ शकतात. यातून सकारात्मक छाप पाडण्याऐवजी तुम्हाला अकार्यक्षम म्हणून ठरवीले जाऊ शकते. त्यामुळे व्यस्त असणे हा जरी मौल्यवान विचार असला तरी तो अविचारी बनला नाही पाहिजे याची काळजी घेण्याची गरज आहे. यासाठी तुमचा व्यस्तपणा तुम्ही किती उत्पादक आहात यावरून ठरविला जाऊ शकतो. नाहीतर एक चुकीचा संदेश सर्वकडे पसरू शकतो. तो संदेश असा आहे की तुम्ही वेळेला प्राधान्य देत नाही आणि व्यस्तता ही सामाजिक स्टेटस म्हणून तुम्ही वापरत आहात असे वाटू लागते.
मी बऱ्याचवेळा कामात मग्न असताना अनेक लोकांनी अशी प्रतिक्रिया दिली होती, "व्वा, तु खूप व्यस्त आहेस. हे फार चांगले आहे. त्यामुळे तु कामात सतत कार्यरत असतो ". इथे मला असे वाटते की जरी माझी महत्त्वकांक्षा मोठी असली आणि मी खूप व्यस्त असलो तरी मला ती एक प्रकारची अपराधीक भावना वाटत राहते. मला वाटते की मी व्यस्त असलेली भावना मला माझ्या अनेक आवडत्या गोष्टींपासून दूर ठेवते. रोजचे ई-मेल पाहणे आणि त्यावर प्रतिक्रिया देणे हा माझ्या कार्याचा एक भाग होऊ शकतो पण त्यातच गुंतून राहणे मला बरोबर वाटत नाही. जेव्हा माझा व्यस्तपणा हेतूपरस्पर असतो तेव्हा मला तो व्यस्तपणा जाणवत नाही. उदाहरण म्हणजे मी नवीन लेख लिहिण्यासाठी काढलेला वेळ किंवा आवडत्या विषयावर वाचन करण्यासाठी दिलेला वेळ. अशावेळेस मला कधीच व्यस्तपणा जाणवत नाही. याचाच अर्थ जेव्हा आपण म्हणतो की मी व्यस्त आहे तेव्हा त्या कामामध्ये असलेला फोकस आपल्या व्यस्तपणाला नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. जर एखाद्या व्यक्तीला आपण विचारले की तुम्ही खूप व्यस्त आहात का? तर त्या व्यक्तीचे उत्तर हो असेच असेल आणि ती व्यक्ती खूप महत्वाची असल्याचेही सांगेल. हे सगळे वरकरणी विसंगतीचे वाटत असले तरी ते एक सामाजिक गरजेचे आहे आणि त्यात एक महत्वाची गोष्ट दडलेली असते. म्हणून व्यस्तपणा ही एक सामाजिक गरज आहे. त्यासाठी अर्थशास्त्रज्ञ डॅन एरिली यांनी एक उत्तम उदाहरण दिले आहे. त्यांनी एका कुलूपवाल्याची गोष्ट सांगितली आहे. त्यात ते सांगतात की, " व्यवसायाच्या सुरुवातीला कुलूपवाल्याला फारशी गती नव्हती. तेव्हा दरवाजा उघडायला बराच वेळ लागत होता. अनेकदा त्याला कुलूपं तोडावी लागत होती. तरीही लोक त्याला पैशे देत होते आणि वर टिपही देत असे. कालांतराने तो कुलूपवाला कामात बाकबगार होऊ लागला आणि कामे पटापट करू लागला. तेव्हा लोक त्याच्या कामावर संशय व्यक्त करून त्याला पैशे देण्यास कुरकुर करू लागले आणि टिपही देणे बंद केले". याचाच अर्थ जर काम करण्यास अधिक वेळ लागला तर लोक त्या व्यक्तीस किती व्यस्त आहे आणि खूप कष्ट करतो म्हणून पैसे देतात, त्या व्यक्तीची स्तुती करतात. त्यासाठी काम पूर्ण होण्यासाठी लोकांची जास्त वेळ वाट पाहण्याची तयारी असते. याचाच अर्थ मी व्यस्त म्हणण्यात लोकांना मजा येत आहे.
धन्यवाद
✍🏻 योगेश गोगवेकर
Comments
Post a Comment