रंग लेखणीचे परिवार
आठवडा क्रमांक : १६९
विषय क्रमांक : १
विषय : काजवा (कथा)
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
संकेत स्थळ :.
उद्याच्या वर्तमानपत्रासाठी लेख पूर्ण करून शेखर साळुंकेने तो परत एकदा वाचून काढला आणि तो लेख आपल्या वर्तमानपत्राच्या संपादकीय कार्यालयात मेलद्वारे पाठवून दिला. या लेखात त्याने एका मोठया राजकीय सामाजिक अशा नेत्यावर टीकात्मक लेखन केले होते. लेख प्रसिद्ध झाल्यावर त्याच्यावर नको ती संकटे येण्याची शक्यता होती. तसे बघायला गेलं तर अशा प्रकारची संकटे त्याने बऱ्याचवेळा अजमावली आहे. पण यावेळी परिस्थिती वेगळी होती. दर वेळी जेव्हा संकटे आली तेव्हा त्याचे मित्रमंडळ, त्यांच्याबरोबर काम करणारी इतर पत्रकार आणि वृत्तपत्राचे संपादक अशी सर्व मंडळी त्याच्याबरोबर होती. या वेळीस इतर कोणीही त्याच्या बरोबर असण्याची शक्यता नव्हती. कारण त्याने आज अशा व्यक्तीबद्दल लिहिले होते जी व्यक्ती त्या सर्वांची खूप आदरणीय होती. तेव्हा अशा व्यक्ती बद्दल लिहिणे त्याला महागात पडू शकत होते. त्याची उपसंपादक पदाची नोकरीसुद्धा जाऊ शकत होती. पण शेखरला अशा आदरणीय व्यक्तीचा त्रास होत होता. कारण ती व्यक्ती समाजासाठी कितीही आदरणीय असली तरी ती एक अहंकारी आणि घमेंडी व्यक्ती होती. ती व्यक्ती स्वतःच्या अहंकारापोटी सर्व समाजाचे ध्रुवीकरण करत सर्वांचे नुकसान करीत होती. याबद्दल कोणतेही वृत्तपत्र बोलत नव्हते. त्यामुळे बहुतांशी समाज हा अंधारात होता. त्यामुळे या आदरणीय व्यक्तीबद्दल सर्व समाजाला माहिती देण्याचा निर्णय शेखरने केला होता. त्यासाठी गेले काही महिने तो त्या व्यक्तीची पूर्णपणे माहिती घेत होता आणि त्या माहितीचा अभ्यास करताना त्याला अशी अनेक उदाहरणे सापडली की त्यामुळे सर्व समाजाचे नुकसान होत होते. त्या आदरणीय व्यक्तीचे नाव होते विश्वजित रामचंद्र आचल आणि सर्व समाज त्यांना आबासाहेब म्हणून ओळखत होता. लेख मेलद्वारे पाठवून झाल्यावर शेखरने सिगरेट शिलगावली आणि सिगरेटचा धूर सोडीत तो विचार करू लागला. उद्याच्या अंकात आपला लेख छापला जाईल का? संपादक काहीही करून हा लेख मागे घेण्यास लावेल का? जर छापला गेला तर समाजाची, त्या राजकीय पक्षाची आणि खुद्द आबासाहेबांची प्रतिक्रिया काय असेल? त्याचा परिणाम वृत्तपत्रावर काय होईल? या वृत्तपत्राला मिळणाऱ्या सुविधेवर गदा येणार का? या लेखामुळे अनेक मित्रपरिवार दूर होईल का? असे अनेक प्रश्न त्यास पडले होते. त्याला एकवेळ वाटले की हा लेख न छापला तर बर होईल पण त्याचे मन त्याला असे करण्यास नकार देत होते. आजपर्यंत त्याने निर्भय पत्रकारिता केली होती. आताही तो तेच करणार होता. लेख कुठल्याही परिस्थितीत तो छापला जावा असेच त्याला वाटत होते. जरी त्याचे कुणीही ऐकले नाही तरी त्याने सर्वांना सत्य सांगितले याची जाणीव त्याला सतत आनंद देत राहणार होती.
असा विचार करताना शेखरला त्याच्या शालेय जीवनात घडलेला एक किस्सा आठवला की त्यामुळे भीती नावाचा शब्द त्याच्या आयुष्यातून कुठल्या कुठे निघून गेला होता. एकदा शाळेत असताना शेखर आणि त्याचा जिवलग मित्र अविनाश करंडे काही कारणामुळे शाळा सुटल्यावर शाळेत खेळत बसले होते. शाळा नेहमीप्रमाणे संध्याकाळी चार वाजता सुटली होती. पण थोडावेळ मजेत खेळून मग घरी जाऊ असा विचार करून ते शाळेतल्या आवारात खेळत राहिले आणि त्यांना वेळेचे भान राहिले नाही. दररोज ते शाळा सुटल्यावर घरी चालत जात असत आणि अंधार पडण्याच्या आत ते घरी पोचत असत. कारण त्यावेळी गावाकडे जाण्याच्या रस्त्यावर विजेवर चालणारे दिवे लागलेले नव्हते. शाळा आणि घर यामधील या दोन मित्रांच्या घरांचे अंतर तासभर तरी होते. त्यांच्या शाळेतल्या एका शिपायाने त्यांना शाळेच्या आवारात खेळताना पाहिले आणि त्यांना दम देऊन घरी जाण्यास सांगितले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आता सहा वाजून गेले होते आणि हळु हळु अंधार पडू लागला होता. पण घरी तर जावेच लागणार होते आणि त्यासाठी एक तास लागणार होता. खरेतर दोघेही घाबरून गेले होते. शेवटी मनाची तयारी करून आणि देवाचे नाव घेत दोघेही चालू लागले. भीती जावी म्हणून शाळेत शिकविलेल्या कविता मोठमोठ्याने म्हणत चालले होते. हळु हळु अंधार दाटायला लागला आणि समोर फक्त काळोखच दिसत होता. कोठेही कसलाही उजेड किंवा कुठल्याही माणसांची हालचाल दिसत नव्हती. बरेच अंतर पुढे गेल्यावर त्यांना एक चमकणारा किडा दिसला. शेखरने तो किडा उचलला. तो किडा म्हणजेच रात्री चमकणारा काजवा होता. हा काजवा घेऊन दोघे मित्र गप्पा मारत हसत खेळत पुढे चालू लागले आणि अखेरीस ते आपल्या घराकडे आले. या काजव्यामुळे त्यांची अंधाराची भीती निघून गेली होती आणि आपल्या घरापर्यंत पोचण्यास मदत झाली होती. जेव्हा हे दोन मित्र घरी आले तेव्हा शेखरच्या आईचा जीव भांड्यात पडला होता. पण शेखर स्वतःबरोबर तो काजवापण घरी घेऊन येऊ लागला तेव्हा त्याच्या आईने त्याला बाहेर सोडण्यास सांगितले. तेव्हा शेखरने आईस सांगितले की जेव्हा सर्वत्र अंधार होता. समोर कोणीही मदत करायला नव्हते तेव्हा या काजव्याने आम्हाला रस्ता दाखविला आणि त्याच्या चमकणाऱ्या प्रकाशाकडे पाहत आम्ही न घाबरता घरी आलो. यामुळे एक गोष्ट कायमची लक्षात आली की कुठल्याही कठीण प्रसंगी जर कुणाची साथ नसेल तर छोटा काजवा सुद्धा आपल्यासाठी एक मार्ग दाखवणारा दिवा ठरतो.
आज हा प्रसंग त्याला पुन्हा एकदा आठवू लागला होता. तसे बघायला गेलं तर शेखरचे आयुष्य फारच खडतरच होते. तो लहान असतानाच त्याचे वडील एका अपघातात गेले होते. त्याच्या आईने मेहनत करून त्याला शिक्षण दिले होते. शाळेमध्ये शेखर आणि त्याचा मित्र अविनाश दोघेही हुशार विद्यार्थी होते. शालेय शिक्षण संपल्यानंतर दोघांनीही वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. पुढे वाणिज्य शाखेची पदवी मिळाल्यावर त्याच्या मित्राने म्हणजे अविनाशने चार्टर्ड अकाउंटन्स होऊन कायद्याचा अभ्यास केला आणि मग एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये उच्च पदाच्या नोकरीवर रुजू झाला. शेखरने मॅनेजमेंट म्हणजे MBA करून कायद्याची पदवी घेतली. पण त्याच्या मनात पत्रकारितेबद्दल खूप आस्था होती आणि त्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी त्याने लंडन गाठले. त्यासाठी भरपूर मेहनत करून पत्रकारितेची पदवी घेऊन तो परत मुंबईत आला आणि एका मोठया वृत्तपत्रात नोकरी करण्यासाठी रुजू झाला. मिळालेल्या कामात त्याला आनंद मिळू लागला आणि हळु हळु मेहनत करून, दिवस रात्र एक करून व्यवस्थित बातमी देण्यासाठी तो प्रयत्न करू लागला. प्रत्येक बातमीचे विश्लेषण करीत तो ती छापू लागला आणि त्याला त्यात भरपूर यश मिळू लागले आणि तो उपसंपादक पदापर्यंत पोचला. शेखरने दिलेली बातमी म्हणजे अभ्यासपूर्ण बातमी असणार याची जाणीव त्याच्या वृत्तपत्रातील कार्यालयात करणाऱ्या सर्व सहकार्यांना माहित झाले होते. त्याचप्रमाणे बहुतेक सर्व समाजातील माणसे त्याच्या नुसत्या बातमीची नव्हे तर त्याच्या आठवड्याच्या लेखाचीसुद्धा आवर्जून वाट बघत असत. आपल्या लेखणीने त्याने समाजातील प्रत्येक माणसाच्या मनात एक आदराचे स्थान निर्माण केले होते. पण आज त्याचे मन अस्वस्थ होते. त्याला समजत नव्हते की उद्या हा लेख छापल्यावर लोकांच्या मनातील हे आदराचे स्थान कमी होणार की वाढणार ! कारण आबासाहेबांचे सुद्धा नाव खूप मोठे होते. त्यांच्याबद्दल जनमानसात फार मोठा आदर होता. पण त्यांची अहंकारी आणि घमंडी वृत्ती समाजाचे नुकसान करीत होती. त्यामुळे कोणतेही काम व्यवस्थितपणे होत नव्हते. तेव्हा त्यांच्या या अहंकाराला आव्हान देण्याचे काम शेखरने करायचे ठरविले होते आणि त्यासाठी पूर्ण अभ्यास करून त्यांच्यावर कडक टीका असलेला लेख पूर्ण पुराव्यानुसार लिहिला होता. त्याचे काय परिणाम होईल याची त्याला पूर्ण खात्री होती आणि त्याला सामोरे जाण्याची त्याने पूर्ण तयारी केली होती. त्याला एक खात्री जरूर होती की काहीही झाले तरी त्याला कुठेतरी लुकलुकणारा काजवा दिसणार होता. या सगळ्यांचा विचार करीत असताना त्याला झोप लागली.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आपल्या वृत्तपत्र कार्यालयात जाताना शेखरच्या मनात परत नवीन विचार सूरू झाले. त्याला वाटू लागले की जर संपादकीय विभागाने हा लेख छापण्यास मना केले तर काय करायचे असे विचार त्याच्या मनात येऊ लागले होते. जेव्हा तो आपल्या कार्यालयात पोहचला तेव्हा संपादकीय विभागात काम करणाऱ्या सहकाऱ्याने त्याच्या या आठवड्याच्या लेखाबद्दल विचारपूस केली तेव्हा त्याने नुसते हो म्हटले आणि स्वतःच्या केबिन मध्ये जाऊन वृत्तपत्रात आलेल्या बातम्या वाचू लागला. पण त्याचे लक्ष मात्र आपल्याला संपादक कधी बोलवणार याकडे होते. अखेरीस संपादक उमाकांत बुडगे यांचे बोलावणे आले. कोणत्याही क्षणाची वाट न बघता तो त्यांच्या केबिनमध्ये गेला. संपादकांनी त्याला बसण्यास सांगितले आणि त्याच्या लेखावर चर्चा करण्यास सुरुवात केली. संपादक बुडगे म्हणाले की लेख खुप छान झाला आहे पण तो कसा छापवा यात त्यांचा गोंधळ होत आहे. त्यामुळे त्यांनी तो लेख वृत्तपत्राच्या प्रशासकीय व्यवस्थापनाकडे पाठवून दिला आहे. कारण या लेखामुळे मोठी गडबड होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम वृत्तपत्रातील जाहिरातीवर होणार होता आणि नको असलेल्या संकटाना तोंड द्यावे लागणार होते. थोड्या वेळाने वृत्तपत्राच्या प्रशासकीय व्यवस्थापनाने मीटिंग बोलविली. त्यात संपादक आणि सर्व उपसंपादक यांना हजर राहण्यास सांगितले. मीटिंगमध्ये शेखरला सांगण्यात आले की हा लेख त्याने शक्यतो छापू नये आणि छापायचाच असेल तर त्यात बरेच बदल करून सौम्य टीका असणारा लेख छापावा. शेखरला हे ऐकून धक्का बसला. आजपर्यंत केलेल्या मेहेनीतीचे महत्व या लोकांना माहीत नाही असे नाही पण मिळणाऱ्या जाहिराती त्यांना खूप महत्वाच्या वाटत होत्या. एका माणसामुळे होणारे देशाचे समाजाचे नुकसान त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे नव्हते. अशावेळी त्याला काय करावे हेच सुचेनासे झाले. त्याने खूप विनंती करून पहिली पण सारे प्रयत्न व्यर्थ होते. शेवटी व्यवस्थापनाने त्याला सांगितले की लेख मागे घे. जर मागे घ्यायचा नसेल त्याने तो दुसऱ्या वृत्तपत्रातून छापावा पण त्यापूर्वी या वृत्तपत्रातील नोकरी सोडावी. हे ऐकून तर शेखरला धक्का बसला. आजपर्यंत अनेकदा जोखीम पत्करून अनेक बातम्या आणल्या होत्या, त्यात भरपूर मेहनत होती. आज त्याचा काहीच उपयोग होणार नव्हता. एक तर लेख न छापता त्या वृत्तपत्रात काम करत राहणे किंवा नोकरी सोडून दुसऱ्या वर्तमानपत्रात नोकरी बघणे. हाच पर्याय त्याच्या पुढे होता. कुठेही गेला तर तीच परिस्थिती राहणार होती. नोकरी सोडल्यावर त्याच्या आईच्या औषध पाण्यावर होणारा खर्च खूप मोठा होता. लग्न जरी झाले नसले तरी इतर बरेच खर्च होते. तेव्हा शेखरचे मन परत एकदा अस्वस्थ झाले. आपला अंतिम निर्णय सांगण्याच्या अगोदर एक दिवस विचार करायला वेळ द्या असे सांगून तो त्या वृत्तपत्राच्या कार्यालयातून बाहेर पडला.
आपल्या कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर तो विचारात मग्न होऊन चालत एका इराणी हॉटेलमध्ये गेला आणि तिथे चहा मागवला. चहा येई पर्यंत त्याने सिगारेट पेटवली आणि विचार करू लागला. त्याच्या मनाने ठरविले होते की या वृत्तपत्रात आता काम नाही करायचे पण कुठेही गेले तर पळसाला पाने तीनच. त्याला परत एकदा शाळेत असताना घडलेली गोष्ट आठवली. त्याला मिळालेल्या काजव्याने त्याला घरी पोचण्यास मदत केली होती. परत असा काजवा आपल्याला मानवरूपी मिळेल का? अशा विचारात असताना त्याला कुणीतरी हाक मारत असल्याचे जाणवले. त्या दिशेकडे बघितल्यावर त्याला आश्चर्याचा धक्का बसला. त्याचा बालपणीचा मित्र अविनाश करंडे त्याला हाका मारत होता. बऱ्याच दिवसांनी ते दोघे भेटत होते. सर्व खुशाली समजल्यावर शेखरने अविनाशला आपण सध्या काम करत असलेल्या वृत्तपत्रातील नोकरी सोडत असल्याचे कारणासहित सांगितले. त्यावर अविनाश म्हणाला, "ही नोकरी तु सोडून दे. जरी तु तिथे राहिला तरी तुझे मन त्यात रमणार नाही". असे सांगून तो म्हणाला की माझे सासरेसुद्धा पत्रकार आहे. त्यांचे स्वतःचे दैनिक आहे. त्यांच्या वयामुळे त्यांना आता हवातसा वेळ द्यायला मिळत नाही. त्यांना एका तरुण संपादकाची जरुरी आहे. जर तुझी इच्छा असेल तर मी त्यांच्याशी बोलून पाहतो. शेखरने त्याला होकार दिला. अविनाशने लगेच आपल्या सासऱ्यांना म्हणजे रामचंद्र मसुरकर यांना फोन करून शेखर बद्दल सांगितले आणि त्यास त्वरित तिथे जाण्यास सांगितले. तेथे गेल्यानंतर शेखरने त्यांना आपली पूर्ण माहिती दिली आणि ती नोकरी का सोडत असल्याची कारण सांगितले आणि ज्या लेखामुळे हे रामायण घडले तो लेख त्यांना वाचायला दिला. रामचंद्र मसुरकरना शेखर बद्दल चांगली माहिती होती. त्यांनी तो लेख वाचला आणि लेख चांगला असल्याची पावती पण दिली आणि आपल्या वृत्तपत्रात छापण्याची तयारी दाखविली आणि संपादक म्हणून दैनिक वृत्तपत्राची जबाबदारी लगेच घ्यावी असे सांगितले. शेखरने सरळ होकार देऊन संपादकाची नवीन भूमिका आणि पूर्वीच्या नोकरीतून राजीनामा दिला. दैनिक वृत्तपत्रात संपादक भूमिका स्वीकारल्यावर काही दिवसातच शेखरने आपला लिहिलेला लेख छापला. त्यामुळे सर्व समाजात खळबळ उडाली. दैनिक वृत्तपत्राला कोर्टाची नोटीस पाठवण्यात आली. शेखरला जीवे मारण्याची धमकी येऊ लागली. पण तो कुठेही डगमगला नाही. हळु हळु परिस्थिती बदलू लागली. सर्वकाही शांत होऊ लागले आणि दैनिक वृत्तपत्राचा खप खूपच वाढू लागला आणि दैनिक वृत्तपत्र म्हणजे शेखर असे समीकरण होऊन गेले. जेव्हा त्याने मोठया वृत्तपत्रातील नोकरी सोडली तेव्हा त्याला मार्ग दाखवणारा त्याचा मित्र अविनाश त्याचा मानवरूपी काजवा ठरला होता. असे अनेक काजवे प्रत्येकाला त्याचा आधार म्हणून मिळत असतात.
धन्यवाद
Comments
Post a Comment