रंग लेखणीचे परिवार
आठवडा क्रमांक : १४१
विषय क्रमांक : १
विषय : जन्मांतरण
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
जन्मांतरण म्हणजे माणसाचे प्राण मृत्यूनंतर एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाणे. जन्मांतरण ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्यामध्ये असे म्हटले जाते की माणसाचा आत्मा अमर असून तो मृत्युनंतर फक्त एक शरीर सोडून पुन्हा जगण्यासाठी नवीन शरीरा धारण करीत असतो. याचाच अर्थ मानवाचा एक पैलू त्याच्या मृत्यूनंतर अस्तित्वात राहतो आणि हा पैलू त्याच्या अस्तित्वाच्या जोडल्या गेलेल्या चक्रात स्थानांतरीत होत असतो. जन्मांतरण एक धार्मिक संकल्पना असून त्याची श्रद्धा वेगवेगळ्या संस्कृतीप्रमाणे ठरविली जाते. भारतात ही कल्पना हिंदू, बौद्ध जैन आणि शीख या धर्मात आधळते आणि त्यावर अनेक ठिकाणी वैकल्पिक चर्चासुद्धा केलेल्या आहेत. भारतीय परंपरेनुसार ही एक न संपणारी प्रक्रिया असून जोपर्यंत मानवाला अंतदृष्टी प्राप्त होत नाही तो पर्यंत त्याची या प्रक्रियेतून मुक्ती होत नाही.
जन्मांतरणची कल्पना हिंदू धर्मातील प्राचीन वेद ग्रंथात आढळून येत नाही पण उपनिषदांमध्ये आढळून येते. असे म्हटले जाते की ही कल्पना बुद्ध आणि महावीर यांच्याकडून ती उपनिषदांमध्ये घेतली गेली आहे. या गोष्टीला काही पुरावा असल्याचा दिसत नाही. याचे कारण असे की गंगेच्या खोऱ्यात किंवा दक्षिण भारतातील द्रविड आदिवासी समाजात जन्मांतरणवर विश्वास असल्याचे अनेक लेख आढळतात. यासाठी अजून एक उदाहरण देता येईल ते म्हणजे भगवतगीतेचे. भगवतगीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनास उपदेश करताना प्रत्येकाचे अस्तित्व अनेक जन्मी असल्याचे सांगतात. ते अर्जुनास सांगतात की मी आणि तू अनेक जन्म घेतले असून मला ते आठवतात पण तुला ते आठवत नाही. जरी प्राचीन वेदामध्ये जन्मांतरणचा उल्लेख नसला तरी त्याचे विश्लेषण उपनिषादांमध्ये असून जन्मांतरणाच्या कल्पना विकसित होण्यास मदत झाली असे अनेक तत्ववैज्ञानिक सांगतात. ही उपनिषदे बुद्ध आणि महावीर यांच्या अगोदरचीच असली पाहिजे असे अनेक पुरावे आपणास आढळून येतात. हिच गोष्ट भगवतगीतेलासुद्धा लागू होईल.
बौध्द धर्मात जन्मांतरणाबद्दल सांगताना सहसाराची (Samsara) शिकवण सांगितली आहे. या शिकवणीनुसार माणसाचे अस्तित्व आरंभ किंवा शेवट असे न करता जीवन, मृत्यू आणि परत एकदा नव्याने जन्म असे सांगून या चक्रास भावचक्र असे म्हटले आहे. या भावचक्रातून सुटका करून घेणे म्हणजे निर्वाण. निर्वाण हा बौध्द धर्माचा महत्वाचा भाग असल्याचे बौध्द ग्रंथात नमूद केले आहे. अनेक बौध्द धर्मग्रंथ असे सुद्धा सांगतात की एकाग्रतेने ध्यान करून उच्च पातळीवर प्राप्त झालेल्या ज्ञानामुळे प्रबुद्ध व्यक्तीला त्याचे मागील प्रत्येक जन्म माहित असतात. Tibetan Book Of Dead या ग्रंथात यावर व्यवस्थित चर्चा केलेल्या आहेत.आजही अनेक बौध्द धर्मातील लोक आपले जन्मांतरण व्यवस्थित व चांगले होण्यासाठी चांगल्या कर्मावर आणि गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करतात. जैन धर्मानुसार कोणतेही शारीरिक स्वरूप कायमचे नसून प्रत्येक मनुष्य जन्म झाल्यानंतर मरणारच आणि परत जन्म घेणारच. याचाच अर्थ असा की आत्मा हा चिरंतन असून तो स्थानांतरण करत जन्मांतरणाच्या चक्रातून जात आहे आणि मृत्यूनंतर प्रत्येक आत्मा नवीन शरीरात प्रवेश करतच आहे.
जन्मांतरण ही जशी भारतीय कल्पना आहे तशीच परदेशीय धर्माच्या लोकांमध्ये सुद्धा ही कल्पना आढळते. यहुदी किंवा ज्यु लोकांमध्ये विविध पैलूवर जन्मांतरणाचा विश्वास आढळतो. त्याचप्रमाणे अमेरिकेतील किंवा ऑस्ट्रेलिया मधील काही आदिवासी समाज यांच्या मध्ये सुद्धा जन्मांतरणाची प्रक्रिया मानली जाते. त्याचप्रमाणे ग्रीक तत्वज्ञानी पायथागोरास, सॉक्रेटिस, प्लेटो या लोकांनी सुद्धा आधुनिक पद्धतीने जन्मांतरणावर विश्वास ठेवला होता, हे त्यांच्या लिखाणावरून सिद्ध होते. ख्रिस्ती आणि इस्लाममध्ये बहुतकरून जन्मांतरणावर विश्वास असल्याचे दिसत नाही. तरीसुद्धा या दोन्ही धर्मातील लोक Neoplatonism, Orphism, Hermeticism आणि रोमन काळातील ज्ञान रचनावाद लक्षात ठेवून जन्मांतरणावर संशोधन करीत असतात आणि एकापेक्षा जास्त वेळा जगणे या कल्पनेने पाश्चात जगात बरीच लोकप्रियता मिळालेली असून जन्मांतरणावर भारतीय लोकांपेक्षा जास्त चित्रपट सुद्धा काढले गेल्याचे दाखले मिळतात.
जन्मांतरणाचे मूळ तत्व आत्मा चिरंतन आहे असे आहे. मानवजाती म्हणजे आत्मिक ऊर्जा असलेले द्वैत प्राणी आहे. प्रत्येक आत्मा त्याला मिळालेल्या शरीरातून शारीरिक जीवनाचा प्रवास करत असतो. एखाद्या भौतिक शरीराचा अंत झाल्यानंतर आत्मा दुसऱ्या भौतिक शरीरात प्रवेश करतो आणि त्याचा जीव एका मागून एक जीवनातून जिवंत होत असतो. प्रत्येक जीवन नवीन अनुभव व शिकण्यासाठी नवीन धडे देत असते. त्यामुळे भौतिक इच्छा यांचे निर्मूलन होऊन अखेरीस अंतिम ध्येय प्राप्त होऊन अध्यात्मिक बुद्धीची प्राप्ती होत असते. जन्मांतरणामुळे जीवनाबद्दल एक नवीन दृष्टीकोन तयार होऊन समाजाला मदत करण्याच्या अनेक संधी उपलब्ध होत असतात. स्वतःला सुधारून विश्व परिपूर्ण करण्याचा उत्तम मार्ग म्हणून जन्मांतरणाकडे पहिले पाहिजे. म्हणूनच ज्यु लोकांचा धर्मग्रंथ सांगतो की जिथून मानव अस्तित्वात आले आहेत त्या आत्म्यांनी परिपूर्णपणे परत नवीन शरीरात प्रवेश केला पाहिजे. म्हणूनच बायबलमध्ये जुन्या करारामधील एक उतारा आपणास सांगतो की जगाच्या स्थापनेच्या अगोदर त्याने आम्हांस यासाठी निवडले आहे की आम्ही पवित्र आणि देवाच्या दृष्टीने निष्कलंक असले पाहिजे. बायबल मध्ये येशू सांगतो आत्मा पृथ्वीच्या निर्मितीपूर्वी अस्तित्वात होते. मी तुम्हाला खरे सांगतो, मी अब्राहमच्या जन्मापूर्वी सुद्धा अस्तित्वात होतो. भगवतगीतेमध्ये श्रीकृष्ण सुद्धा हेच सांगत असतो.
लोकांचे मागच्या जन्माचे रहस्य शोधण्यासाठी संमोहन (Hypnosis) पद्धतीचा वापर केला जातो. त्यामुळे मानवाच्या गत आयुष्यातील ओळख आणि घटना समजण्यास मदत होते असे सांगितले जाते. त्यासाठी कुदरत या हिंदी चित्रपटातील काही दृशे आठवा. त्यात डॉक्टर आपल्या पेशंटवर संमोहन पद्धतीने गत जीवन जाणण्याचा प्रयत्न करतो. ही पद्धत बरोबर नाही असे शास्त्रज्ञ सांगत असतात कारण त्यांच्या म्हणण्यानुसार बऱ्याच माणसांचे मेंदू आपल्याशी खोटे बोलत असतात व आठवणी म्हणजे सत्य असे सांगू शकत नाही. त्यामुळे मिळालेली माहिती चुकीची सुद्धा असू शकते. त्यामुळे जन्मांतरणबद्दल कोणतेही विश्लेषण विज्ञानच्या दृष्टीकोनातून स्वीकारणे शक्य होत नाही. पण विज्ञान सुद्धा अंतिम सत्य सांगू शकत नाही. त्यामुळे जन्मांतरण होते की नाही हा प्रकार अनुभवातूनच समजू शकतो. मला एवढी खात्री आहे की एक दिवस विज्ञानच याचा शोध लावेल.
धन्यवाद
सखोल लेख अप्रतिम 👌👌👌👌
ReplyDelete