रंग लेखणीचे परिवार
आठवडा क्रमांक : १३७
विषय क्रमांक : ३
विषय : जागतिक पर्यावरण दिन (लेख )
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
५ जून हा जागतिक पर्यावरण दिवस म्हणून सर्व जगभर साजरा केला जातो. आज माणसाला पर्यावरणचा समतोल राखणे फार जरुरीचे आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी मनुष्य आपल्या कृतीने पर्यावरणाचा समतोल बिघडून टाकत आहे. विकासाच्या नावाखाली वृक्षतोड करणे, नद्याचे आणि समुद्राचे पाणी प्रदूषित करणे असे प्रकार आपल्या रोज पाहण्यात येत आहे. त्यामुळे वातावरणात कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढून ऑक्सीजनचे प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे. त्यामुळे भविष्यात माणसाला गंभीर परिणामास तोंड द्यावे लागणार आहे. औद्योगिक क्रांती कितीही माणसाला उपकारक ठरली असली तरी त्याचे बरेच दुष्परिणामसुद्धा दिसू लागले आहेत. दोन महायुद्धामधून निर्माण झालेली आण्विक शस्त्रे निसर्गावरील एक प्रकारचे आघात असून पर्यावरण बिघडवण्यास कारणीभूत ठरत आहे. जर माणसाने आवश्यक अशी कृती करून पर्यावरण सुरक्षित व सुदृढ केले नाही तर निसर्गाकडून माणसाला मिळणारे अन्न, पाणी आणि श्वास घ्यायला मिळणारी हवा बंद होऊन ही सर्व सृष्टी निर्जीव होऊन जाईल आणि मानवी जीवन निरर्थक होण्यास वेळ लागणार नाही. त्यासाठी पर्यावरण विज्ञान विकसित होण्याची गरज मानवाला वाटू लागली आणि पर्यावरणशास्त्र हा विषय जगातल्या अनेक विद्यापीठात अभ्यासासाठी लागू करण्यात आला. तसेच पर्यावरणाबद्दल जागृती निर्माण करून त्यामधून मिळणारे फायदे समजून देऊन पर्यावरणाची गुणवत्ता वाढवून पोषक वातावरणाची निर्मिती करण्यासाठी ५ जुन १९७२ रोजी स्टॉकहोम मध्ये संयुक्तराष्ट्र संघाने म्हणजे युनोने एक आंतरराष्ट्रीय परिषद घेऊन पर्यावरणशास्त्र हा शैक्षणिक कार्यक्रम अमलात आणला आणि ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणून घोषित करण्यात आला. त्यांनी पर्यावरणविषयक कार्यक्रम असा आखाला की त्या कार्यक्रमातून पर्यावरण संवर्धनासाठी व संरक्षणासाठी समाज्यातल्या सर्व प्रकारच्या नागरिकांकडून सहकार्य मिळण्यास मदत होईल आणि कार्यक्रमाचे उद्दिष्ट पूर्ण होण्यास मदत होईल. पहिला पर्यावरण दिवस ५ जून १९७४ रोजी साजरा करण्यात आला आणि त्यात १४३ देशांनी भाग घेतला आणि विषय होता, "Only One Earth".
संयुक्तराष्ट्र संघाने दिलेल्या आव्हानाला शंभरपेक्षा जास्त देशाने प्रतिसाद दिला आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी सहभागी झालेल्या देशांनी आपल्या देशात निरनिराळे प्रकल्प राबविलेले आहेत. अजूनही असे प्रकल्प राबविले जात आहेत. त्यातील काही प्रकल्प फार महत्वाचे असून त्यामध्ये पर्यावरण शास्त्रज्ञ , पर्यावरण अभ्यासक, सरकार, राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते आणि देशातील नागरिक यांनी एकत्र येऊन एक समान कार्यक्रम ठरवत आहेत. पण हा कार्यक्रम असा असला पाहिजे की नैसर्गिक संसाधनांचा समतोल वापर करून सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर करून समाजाचा सर्वांगीण विकास करता आला पाहिजे. त्यासाठी माणसांच्या अविचारी कृतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक असे कायदे राज्य करत असलेल्या सरकारांकडून करून घेण्यात आले पाहिजे. हे सर्व करताना एकच गोष्ट लक्ष्यात ठेवली पाहिजे ती म्हणजे पर्यावरणाचे कोणतेही कार्यक्रम फक्त एका राष्ट्रापुरते मर्यादित ठेवता कामा नये. त्यासाठी काही उद्दिष्टे लक्ष्यात घ्यायला हवी. सर्वात महत्वाचे म्हणजे पर्यावरणाविषयी सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे फार जरुरीचे आहे आणि मानवी जीवनाच्या निगडित समस्या कार्यक्रमाच्या केंद्रास्थानी असल्या पाहिजे. दुसरे उद्दिष्ट म्हणजे पर्यावरण शिक्षण ही आयुष्यभर चालणारी शिक्षण प्रणाली समजून ती विद्यालयातून किंवा महाविद्यालयातून शिकवण्याची सोय केली गेली पाहिजे आणि त्यासाठी सामाजिक तंत्रज्ञानाचा वापर करता आला पाहिजे. प्रमुख पर्यावरणीय प्रश्नांची उत्तरे स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरून शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी पर्यावरणातील निरनिराळ्या घटकांचे संशोधन करून मानवाला प्रदूषणाच्या परिणामांपासून वाचविण्याचे प्रयत्न झाले पाहिजे. सर्वात महत्वाचे म्हणजे ऊर्जा संसाधनांसह इतर संसाधनांचा अतिवापर टाळण्यासाठी नवीन कार्यक्षम तंत्रज्ञानाचा वापर करण्यास मानवाला तयार करण्यासाठी कार्यक्रम आखला गेला पाहिजे.
पर्यावरण दिवस भारतातसुद्धा महत्वाचा मानला जातो. गेली दोन तीन वर्षे या दिवशी मला भारताच्या माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही कारण त्या जबरदस्त निसर्गप्रेमी नेत्या होत्या. बऱ्याच वेळेला त्यांच्या कारभारावर आणि धोरणांवर टीका करणारेच साहित्य उपलब्ध आहेत पण त्यांनी केलेल्या काही चांगल्या कामांची नोंद अभावाने आढळते. युपिए काळातील माजी पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी लिहिलेल्या इंदिरा गांधी : अ लाईफ इन नेचर या पुस्तकात इंदिरा गांधी यांची बहुतेक लोकांना माहित नसलेली निसर्गप्रेमी म्हणून ओळख करून दिली आहे. निसर्गप्रेमी म्हणून त्या कश्या होत्या आणि भारतातील पर्यावरण धोरणांचा पाया घालणाऱ्या त्या पहिल्या नेत्या होत्या. निसर्गप्रेमीचा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरुंकडून मिळालेला असावा कारण पंडित नेहरूंनी त्यांना लिहिलेल्या पत्रात अनेक पर्यावरणाच्या पुस्तकांचा उल्लेख आढळतो. पंडित नेहरुंबरोबर त्यांना अनेक ठिकाणी फिरण्याची संधी मिळाली. त्यामुळे त्यांना पर्यावरण या विषयाची गांभीर्याने ओळख झाली. तेव्हा त्यांनी एक गोष्ट लक्ष्यात ठेवली ती म्हणजे विकासाची किंमत पर्यावरणाचा नाश ही नसावी. पुढे देशाच्या पंतप्रधान झाल्यावर त्यांनी वन्यजीव संरक्षण कायदा, वन संरक्षण कायदा, जल प्रदूषण नियंत्रण कायदा आणि वायू प्रदूषण नियंत्रण कायदा असे चार कायदे करून वैयक्तिकरित्या त्यांची अंमलबजावणी केली. पर्यावरण आणि वन्यजीवन या विषयांवर त्यांनी केलेली भाषणे, त्यासाठी केलेला पत्रव्यवहार आणि त्यांनी आपल्या वडिलांबरोबर व विचारवंताबरोबर केलेला संवाद वगैरे तपशील वाचून थक्क व्हायला होते आणि त्यांच्या निसर्गप्रेमी व्यक्तिमत्वाबद्दल आदर वाटू लागतो. त्यांची जवळची मैत्रीण पुपुल जयकर ह्यांना पत्र लिहिताना त्या लिहितात, " I always loved trees, trees more than flowers. And animals. I have always had animals. Even as a child I looked upon a tree as a life giving thing. I also look upon it as a refuge. I liked climbing the trees. I liked it as an exercise but also because I could hide there. I have always regarding myself as friend of tree and have experience a sense of companionships with them-the-easy-to-climb ones to dear to all active children seeking occasional heaven from the adult world; the spreading which gives the protection from glare and hit of Indian sun; the flowering ones. Bursting into colourful bloom; the gnarled old ones, mute witness of history ". या पत्रात लिहिलेल्या मजकूरावरून त्यांचे निसर्गप्रेम सहजपणे दिसून येते. सुंदरलाल बहुगुणा यांचे चिपको आंदोलन असो किंवा भरतपूर येथील पक्षी अभयारण्याचे संरक्षण असो त्यांनी नेहमीच संवेदनशील भूमिका घेतली. म्हणूनच जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो तेव्हा या भारताच्या निसर्गप्रेमी पंतप्रधानाची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
२०२१ मधील जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यासाठी यजमानपद पाकिस्तान या देशाला मिळाले असून त्यासाठी थिम आहे इकोसिस्टीम रिस्टोरेशन म्हणजे परिसंस्थेची हानी थांबवत तिचे संतुलन भरून काढणे. याचाच अर्थ जगभरातील सर्व जंगले नष्ट होत असून ती वाचवण्यासाठी प्रयत्न करणे आणि आतापर्यंत झालेले नुकसान भरून काढण्यासाठी ही थीम देण्यात आली आहे. भारताला याचे यजमानपद २०१८ मध्ये मिळाले होते आणि तेव्हाची थीम होती प्लास्टिक प्रदूषणाच्या संकटाचे निवारण करणे. या कार्यक्रमाचा समारोप करताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की पर्यावरणाचा ऱ्हास हा सर्वात गरीब आणि कमकुवत वर्गाला अधिक होतो. त्यामुळे आपल्या राहणीमानामुळे समाजातल्या कुठल्याही घटकाला त्रास होणार नाही याची दक्षता घेणे आपल्यापैकी प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्याचे पालन सर्वांनी केले पाहिजे. ते पुढे म्हणतात की या संपूर्ण जगाची शाश्वत प्रगती व्हावी यासाठी भारत कटिबद्ध राहील याची ग्वाही आम्ही देतो. आज आपण जे चांगले करणार आहोत, त्याचा संयुक्त परिणाम भविष्यात अनुभवास मिळणार आहे. समाजात जागृती निर्माण करून, आधुनिक तंत्राचा वापर करून आणि खऱ्या अर्थाने जागतिक सहकार्य करून आपण आपले चांगले पर्याय निवडू शकू. त्यानंतर भारतामध्ये प्लास्टिक वस्तू व पिशव्या वापरण्यास बंदी घालण्यात आली. जेव्हा यजमानपद सहभागी देशाला मिळत असते आणि ज्याला ते मिळते त्या देशात अधिकृतपणे अनेक कार्यक्रम पार पडत असतात. त्यासाठी जगातील विविध व्यक्ती, संस्था उद्योग अनेक कार्यक्रमाबरोबर वेगवेगळे उपक्रम पण राबवित असतात.
मानव आणि निसर्ग यांचे अतूट नातं आहे.
निसर्गाशिवाय मनुष्य जीवन शक्य नाही. तरीसुद्धा माणूस निसर्गाला हानी पोचवत
असतो.अजूनही तो वृक्षतोड तर करतोच आहे आणि समुद्र नद्या यांचे पाणीसुद्धा दूषित
करत आहे. आरे कॉलनी मधील वृक्ष तोड आपणास काय सांगत आहे, मुंबईतील मिठी नदीची परिस्थिती काय आहे, त्यासाठी कोणती उपाय योजना आखली गेली
आहे. या बद्दल कुणीही बोलत नाही. पर्यावरण दिवसाच्या दिवशी फक्त चार माणसे जमून
वृक्षारोपण करतात. मग लावलेले झाड जिवंत आहे का ते सुद्धा पाहणार नाही. २०१८ साली
घातलेली प्लास्टिक बॅग वरील बंदीचा काय उपयोग आहे का? असे अनेक प्रश्न आहेत. माझ्या लहानपणी मी राहतो त्या भागात अनेक नारळांची
झाडे होती आता एकाद दुसरे झाड दिसते,
हे कश्याचे लक्षण आहे. एखाद्याची नवीन
गाडी येते आहे आणि त्यासाठी एका झाडाची अडचण येते आहे म्हणून ते जिवंत झाड चक्क
कपून टाकले जाते. अशा कृत्याला आपण काय म्हणावे हेच समजत नाही. जेव्हा पर्यावरणाचा
समतोल बिघडेल तेव्हा माणसांची परिस्थिती खूप बिकट होईल. त्यातून मार्ग काढण्यासाठी
प्रत्येक नागरिकांने पर्यावरणाची जवाबदारी घेतली पाहिजे. त्यासाठी प्रत्येक
नागरिकांनी प्लास्टिक बॅगेचा वापर शक्यतो करू नये किंवा कुठलीही वस्तू फेकण्या
अगोदर ती कश्या प्रकारे परत वापरता येईल याचा विचार केला पाहिजे. तसेच रस्त्यावरून जाताना
कुठेही थुंकू नये ही गोष्ट नेमाने पाळली पाहिजे आणि नव्या पिढीला निसर्ग, पर्यावरण, पाणी,
वृक्ष यांचे महत्व समजावून सांगितले पाहिजे.
जेव्हा प्रत्येक नागरिक या सर्व जवाबदाऱ्या सांभाळेल तेव्हाच खऱ्या अर्थाने
पर्यावरण दिवस साजरा केल्यासारखे होईल. कारण पर्यावरण म्हणजे परमेश्वराने निर्माण
केलेली अशी अदभूत गोष्ट आहे की ती सर्व सजीव जीवनावर परिणाम करणारी आहे.
धन्यवाद
Comments
Post a Comment