*रंग लेखणीचे परिवार*
*आठवडा क्रमांक : 128*
*विषय क्रमांक : 4*
*विषय : पूर्णविराम📝*
*दिनांक :02/04/2021*
*शब्दांकन : योगेश गोगवेकर*
कुठल्याही भाषेत एखादे वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी आपण वाक्याच्या शेवटी एका विरामचिन्ह वापरतो, त्यास आपण पूर्णविराम असे संभवतो. आजचा इंग्लंडबरोबरचा एकदिवसीय क्रिकेटचा सामना भारताने जिंकला किंवा संत साहित्याला काळाचे बंधन नाही. अशी काही उदाहरणे आपण पाहू शकतो. पूर्णविराम जरी प्रत्येक भाषेतील वाक्य पूर्ण झाल्याचे दर्शवत असला तरी त्याचा उल्लेख मानवी जीवनाशी करायला जात असताना त्या शब्दाचा अर्थ वेगळ्यावेगळ्या प्रकारात बघायला मिळतो. कारण मानवी जीवनामध्ये अनेक पूर्णविराम माणसाच्या हातात नसून नियतीच्या हातात असतात आणि नकळत नियती मानवाला कुठल्याही गोष्टीची पूर्व कल्पना न देता त्याच्या आयुष्यात पूर्णविराम एखाद्या वाक्यामध्ये आणून ठेवते. कधी कधी माणसाच्या आयुष्याचे वाक्य पूर्ण तरी होते अथवा अर्धवट तरी राहते. तरी माणूस आपले अर्धवट राहिलेले वाक्य सोडून देऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करतो कारण त्यास माहित असते की पूर्णविरामा पुढेही आयुष्य बरेच असते आणि आधी आलेल्या पूर्णविरामचा थोडासा विसावा घेऊन पुढच्या पूर्णविरामासाठी पुढे जात असते.
मानवी जीवन नेहमी विकसित होत असते. आपल्या कल्पनेच्या आधारावर माणसाने अनेक शोध लावले, अनेक स्मारके बनवली, नवीन यंत्रे आणली आणि मानवी जीवन अधिक फुलवले. तरी सुद्धा मानवाला पूर्णविरामाची गरज असते. जर पूर्णविराम नसेल तर त्याचे जीवन कधीहि आनंदी होणार नाही आणि आपल्या आयुष्यातील शांतता व सुसंस्कृतपणा तो हरवून बसेल. पूर्णविराम जसा आपलं वाक्य विभक्त करून नवीन वाक्य तयार करण्यास मदत करतो त्याचप्रमाणे मानवी आयुष्यातील पूर्णविराम मानवाला नवी निर्मितीकडे नेण्यास मदत करते. पण घाना येथे राहणारे सुप्रसिद्ध प्रेरणादायक लेखक Israelmore Ayivor पूर्णविराम बद्दल सांगताना म्हणतात, " Leave no "full stop" in between the sentences that make up your life story. If anything, let "commas" show that when you were brought down by challenges, you rose up with passion and moved on again". ते जरी अस सांगत असले तरी मला वाटते की मानवी आयुष्यात आलेल्या पूर्णविरामला अल्पविराम मानून प्रत्येक मानवाला पुढे जावे लागेल.म्हणूनच सुप्रसिद्ध डच पाकिस्तानी पत्रकार, विचावंत आणि कवी Ehsan Sehgal म्हणतात, "पूर्णविराम म्हणजे नवीन अध्यायचा पर्याय" (Full Stop means the option of a new chapter).
एकदोन वर्षापूर्वी माझ्या वाचनात डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि प्रा. प. रा.आर्डे लिखित अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम हे पुस्तक आले होते. हे दोघेही महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन समितेचे आरंभपासूनचे कार्यकर्ते होते. हे पुस्तक लिहिण्याचे कारण देताना ते सांगतात की अलीकडच्या काळात अंधश्रद्धा निर्मूलणासाठी कोणतेही विचारमंथन झाले नाही. नेहमी त्यांच्या व्याख्यानानंतर किंवा चर्चेनंतर अनेक प्रश्न विचारले जात असत. ते प्रश्न व्यवस्थितपणे मांडून त्याची वैज्ञानिक दृष्टीकोनातून उत्तरे देऊन अंधश्रधेला पूर्णविराम द्यायचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. प्रश्नांची निवड करताना त्यांनी सर्व प्रकारची उत्तरे त्यात येतील अशी काळजी घेतली आहे आणि त्यात विचारमंथनाला चालना मिळेल असा प्रयत्न केला आहे. तरीसुद्धा दिलेल्या उत्तरातून अजून काही प्रश्न निर्माण होतात आणि अंधश्रधेला पूर्णविराम मिळत नसल्याचे जाणवते. ह्याचे कारण म्हणजे विज्ञान म्हणजे नक्की काय, वैज्ञानिक संशोधन आणि त्याचे फलित याची चर्चा करून अंधश्रधेला पूर्णविराम दिला असता तर ती चर्चा अधिक रंगली असती असे वाटते. प्रत्येक समाज अपेक्षित आणि मान्यताप्राप्त वागण्याच्या चौकटी बांधला जातो. जेव्हा माणसाचे वागणे ह्या चौकटी बाहेर होऊ लागले की समाज भयभीत बनतो. त्यात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता असते. त्यासाठी मानवाची मानसिक अवस्था लक्ष्यात घेऊन त्याची दखल व्यावहारिक आणि तात्विक पातळीवर घेणे जरुरीचे आहे. असे मला वाटते. हे पुस्तक फक्त अंधश्रधेला प्रवृत्त करणाऱ्या मानसिकतेबद्दल लिहिले असून अंधश्रधेला पूर्णविराम दिला गेला नाही असेच जाणवत राहते.
प्रत्येक मानवी आयुष्यात माणसाच्या भावना विलक्षण रूप धारण करतात. या भावना मानवी जीवनात येतात कश्या आणि त्याचा मानवाच्या जीवनावर कसा प्रभाव पडतो हे समजत नसते. त्यासाठी शिक्षण आणि मानसिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रेरणादायक लेखिका व्हेनेसा आयटकेन ह्यांचे विचार समजून घेऊ. त्या सांगतात की मानवी जीवनात जे विचार येतात जेव्हा माणूस चिंताग्रस्त होतो आणि त्या चिंताग्रस्त विचारातून भावनिक चिंता निर्माण होत असते.त्यासाठी त्या एक उदाहरण देतात. त्या म्हणतात की बहुतेक माणसे, "मला बरेच काही करायचे आहे " असा विचार मांडतात. वास्तविक बघायला गेलं तर हा काही मोठा विचार नाही. पण मानव ह्या विचाराचा अनुसरण करतो आणि मग मला हे करायला जमत नाही कारण मला पुरेसा वेळ नाही असे सांगत ते काम टाळत जातो. इथे व्हेनेसा आयटकेन सांगतात ह्या सर्व विचारांना पूर्णविराम फार आवश्यक आहे. जर आपण पूर्णविराम दिला नाही तर आपण आयुष्यातील अनेक चांगल्या संधी घालवून बसू. सर्व प्रथम माझ्याकडे वेळ नाही ह्या विचारांना पूर्णविराम द्या.
पूर्णविराम जसा प्रत्येक भाषेतील सुंदरता वाढवतो तसाच तो मानवी जीवन सुसंस्कृत करण्यास मदतसुद्धा करतो. त्यामुळे माणूस आपले विचार शक्तिशाली बनवू शकतो.
Comments
Post a Comment