*रंग लेखणीचे परिवार 📝*
*आठवडा क्रमांक : 126*
*विषय क्रमांक : 1*
*विषय : हल्ली लिहायलाच काही सुचत नाही (वैचारिक लेख )*
*दिनांक :21/03/2021*
*शब्दांकन : योगेश गोगवेकर*
आज सोशल मीडिया आपल्या आयुष्याचा एक भाग झाला आहे. त्यावर बरीच माणसे स्वतःची मते लिहीत असतात आणि त्यास बऱ्याच लोकांकडून प्रतिसाद सुद्धा मिळतो. जेव्हा त्यांची मते मी वाचायचो तेव्हा मला वाटत असे की या लोकांपेक्षा मला खूपच माहिती आहे आणि अनेक विषयांचे ज्ञान पण आहे. मग मी का लिहू नये. पण जेव्हा लिहायला बसलो की काहीच आठवत नसायचे.विषय कुठला घ्यावा हे सुद्धा समजायचे नाही. कधी वाटायचे मराठीत लिहू तर कधी वाटायचे इंग्रजीत लिहू. पण दोन्ही भाषेत ना विषय सुचायचा किंवा विषय सुचला तरी शब्द आठवयाचे नाहीत. मग लिहिताना वाटायचे की लोकांना आपले लिखाण आवडेल का? नाही आवडले तर ते त्या लेखाची थट्टा तर करणार नाही ना? अशा अनेक शंका येत असत आणि तेव्हा वाटायचे, " हल्ली लिहायलाच काही सुचत नाही ".
अश्या परिस्थितीत मला थॉमस मान ह्या जर्मन कादंबरिकाराचे एक वाक्य आठवले. तो म्हणतो," लेखक एक अशी व्यक्ती आहे की त्यांचे लिखाण हे इतर लोकांपेक्षा कठीण असते".(A writer is a person for whom
writing is more difficult than it is for other people). तेव्हा मनाची तयारी करून विषय पक्का केला आणि लिहिण्यास बसलो. मी माझा पहिला लेख इंग्रजी भाषेत लिहिला आणि तो सुद्धा एका क्रिकेट खेळाडूबद्दल. लिहीत असताना अनेकदा शब्द सुचत नव्हते किंवा वाक्याची रचना बरोबर होत नव्हती. त्यामुळे लिखाण थांबवले आणि पुस्तक उघडून त्या खेळाडूबद्दल वाचू लागलो आणि परत एकदा व्यवस्थित माहिती जाणून घेतली. पुस्तक वाचून झाल्यावर थोड्याश्या विश्रांती नंतर परत लिहू लागलो आणि सहजपणे शब्द सुचू लागले आणि वाक्यरचना व्यवस्थित लिहिता येऊ लागली. म्हणून मी माझ्या मित्राकडून ब्लॉग करून घेतला आणि दर शनिवारी मी इंग्रजी मधून माझे लिखाण ब्लॉगवर लिहू लागलो. मी इंग्रजी आणि मराठी मधून शंभराच्यावर लिखाण केले असेल पण दर आठवड्याला कोणता विषय घेऊन लिखाण करावे हे सुचत नाही. मग हल्ली लिहायलाच काही सुचत नाही म्हणून काही न लिहिता शनिवारचा लेख लिहीत नाही आणि शांतपणे वाचन करीत बसतो.
ब्लॉग लिहिताना मी नेहमी वेगवेगळ्या विषयावर लिहीत असतो. कधी सिनेमा तर कधी नाटक, कधी संगीतकार तर कधी गायक, कधी क्रिकेट तर कधी अनेक क्षेत्रातील विस्मृतीत गेलेली व्यक्तिमत्वे, तर कधी वाचलेल्या पुस्तकांचे परीक्षण. असे असून सुद्धा बऱ्याच वेळेस आपण शून्यात गेल्यासारखे वाटते. इथे मला असा प्रश्न पडतो की एवढा अभ्यासपूर्ण आणि प्रामाणिकपणे मेहनत घेऊन व्यक्त केलेले माझे विचार लोकांना आवडणार का? कारण आजच्या सोशल मीडियावर येणारे चुकीचे लिखाण लोकांना खरे वाटते आणि जेव्हा आपण सत्य सांगायला गेलो तर लोकांना आवडेल का? जर आवडले नाही तर परत आपली थट्टा उडवली जाईल अशी भीती वाटते. असाच एक प्रकार माझ्या बाबतीत घडला आहे. माझ्या एका मित्राने व्हाट्सअप युनिव्हर्सिटी मधील विचार कसे बरोबर आहे आणि माझे चुकीचे आहे म्हणून माझ्या एका लेखाची थट्टा उडवली होती. अश्या वेळेस मला 'हल्ली लिहायलाच काही सुचत नाही".
सुप्रसिद्ध अमेरिकन कादंबरीकार Ernest
Hemingway म्हणतो, "There is no rule on how to
write. Sometimes it comes easily and perfectly : sometimes it is like drilling
rock and then blasting it out with charges". इथे हेमिंगवे बरोबर सांगतो कारण कोणतेही लिखाण हे कोणतेही नियम न पाळता सहजतेने आणि उत्तम प्रकारे येते. जेव्हा मी लिहितो कारण लिहिल्या शिवाय आपल्या मनातले विचार लोकांपुढे मांडले जाणार नाही आणि ते लिहिताना मी कोणतेही नियम पाळत नाही. तरीसुद्धा मला प्रश्न पडतो की माझे लिखाण खरोखरच चांगले आहे का निरर्थक आहे!. त्यावेळेस मला एवढेच वाटते की हल्ली लिहायला काही सुचत नाही.
हो आजच्या काळात घडत असलेल्या अनेक अप्रिय घटनामुळे काय लिहायला घ्यावे, आपण काय लिहावे आणि कशावर लिहावे हा प्रश्न पडतो. अशा वेळेस हल्ली लिहायला काही सुचत नाही म्हणून लिखाण सोडून देण्यात काही अर्थ नाही. तेव्हा आपण लिखाण न करता एकतर पुस्तकतरी वाचावे किंवा कोणत्याही प्रकारचे संगीत ऐकावे अथवा बाहेर मस्तपैकी मित्रांबरोबर फिरायला जावे. मग निवांतपणे लिहायला बसल्यावर आपल्याला सहजपणे चांगले लिखाण सुचेल. आपले विचार दुसऱ्यांना मान्य असो वा नसो, आपण लिहिलेच पाहिजे कारण आपले विचार चांगल्या प्रकारे व्यक्त करण्यासाठी लिखाणच उत्तम माध्यम आहे. तेव्हा असे म्हणू नका, " हल्ली लिहायला काही सुचत नाही ". आणि लिहीत जा.
धन्यवाद
Comments
Post a Comment