*रंग लेखणीचे परिवार*
*आठवडा क्रमांक : 127*
*विषय क्रमांक : 2*
*विषय : आर्तता (लेख)📝*
*दिनांक : 24/03/2021*
*शब्दांकन : योगेश गोगवेकर*
आर्तता या शब्दाचा मराठीतील अर्थ आहे
हृदयातून येणारी तळमळ किंवा कळकळ. त्याचा व्यवस्थित अर्थ आपण उदाहरणासकट पाहू.
जेव्हा आपल्याला आपल्या प्रिय व्यक्तीस भेटायचे असते आणि भेटल्यानंतर त्या
व्यक्तीच्या डोळ्यात आपणास भेटण्याची आर्तता दिसते तेव्हा आपण फारच सुखावून जातो.
किंवा असाच एक निकोप स्वर आपणास ऐकू येतो तेव्हा त्यातील जाणवणारी आर्तता आपल्याला
संगीताचे खरे ध्येय शिकवून जाते. अशी आर्तता आपल्याला आयुष्यातील प्रत्येक ठिकाणी
जाणवत असते. मग ते संगीत असो किंवा काव्य असो, नाटक असो किंवा सिनेमा, एखादे पुस्तक असो किंवा मित्रांबरोबरची एखादी मैफिल असो. त्यातील आर्तता
प्रत्येकवेळी वेगळ्या प्रकारे जाणवत राहते. जेव्हा आपण संत साहित्याचा विचार करतो
तेव्हा त्यांच्या अभंगातील आर्तता आपल्या मनाच्या कोपऱ्यात प्रेमळ अंतःकरणाची कळकळ
निर्माण करते. मी तूला शब्द देतो या वाक्यातील आर्तता समोरच्या व्यक्तिमध्ये शब्द
देणाऱ्या व्यक्तीबद्दल जबरदस्त विश्वास निर्माण करतो.
आर्तता हा शब्द आर्त ह्या शब्दावरून
आलेला वाटतो. आर्त म्हणजे परमेश्वराच्या भेटीसाठी तळमळणारा. ज्ञानेश्वर माऊली
जेव्हा पसायदान सांगतात तेव्हा पसायदानाची आर्तता एवढी भव्य असते की त्यांनी सर्व
विश्वच आपल्या कवेत घेतल्यासारखे वाटते. माणसांच्या मनाचा त्यांनी घेतलेला शोध
खूपच सुंदर आहे. तसा शोध त्यांच्या अगोदर कोणी घेतल्याचे दिसत नाही.पुढे आपल्या
अभंगात ते म्हणतात, "विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले | अवघे ची जालें ब्रह्म
". इथे ज्ञानेश्वर माऊलीने माणसांच्या
जगण्याचे प्रयोजन स्पष्ट करून सांगितले आहे. त्यात त्यांनी माणुसकीचा धर्म सर्वात
मोठा ठरवला आहे. आजही या काव्याची आर्तता आपणास खूप जाणवत असते.
डॉ. रामचंद्र देखणे ह्यांनी भगवत
गीतेच्या भक्तीचे चार प्रकार सांगितले आहेत. ते चार प्रकार म्हणजे आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. त्यांनी आर्त हा प्रकार
तळमळीशी जोडला आहे तर जिज्ञासू ज्ञानप्राप्तीच्या अवस्थेशी, अर्थार्थी विचारांशी आणि ज्ञानी पूर्णनंदाशी जोडले आहेत. आर्त बद्दल
म्हणताना ते म्हणतात आर्त म्हणजे परमेश्वराच्या भेटीसाठी तळमळणारा किंवा
भगवंताच्या प्रेमविरहाने व्याकुळ झालेला. डॉ. देखणे पुढे सांगतात की जसा माणूस
परमेश्वराच्या भेटीसाठी व्याकुळ होतो तो आर्त तर असतोच पण जो मनुष्य जगातील दुःख
पाहून तळमळतो आणि समाजातील अन्याय पाहून दुःखी होतो तो सुद्धा आर्त होय. त्यासाठी
ते नामदेवांच्या अभंगातील उदाहरणे देतात. नामदेव एका अभंगात सांगतात की आर्त ही
ज्ञानाची पहिली पायरी आहे कारण ज्ञान मिळवण्याची तळमळ नसेल तर पुढील पायऱ्या
व्यर्थ आहे.
अश्या अनेक कवितेमधून कवी आपल्याला
कवितेची आर्तता प्रकट करत असतो. पैल तो गे काऊ कोकताहे ह्या काव्यात ज्ञानेश्वर
माऊलीने विरहिणी म्हणजे परमेश्वराच्या भेटीची आर्तता प्रकट केली आहे. कविता म्हणजे
आपल्या सर्जनशील मनाचा आरसा किंवा कवीच्या सर्जनशीलतेचे शब्दरूप. त्यात आपल्याला
जीवनात आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब दिसत असते.भावनेच्या अनामिक बाधेने
पेटलेला वणवा शमविण्याची आर्तता फक्त कवी आपल्या शब्दातून करीत असतो. मग त्या
कविता कुसुमाग्रजांच्या असोत किंवा बोरकरांच्या, पाडगांवकरांच्या असोत किंवा
करंदीकरांच्या, सुरेश भटांच्या असोत किंवा केशवसूतांच्या. त्यांच्या
कवितेतील आर्तता इतकी प्रचंड असते की त्या कविता आपल्या मनाचा ठाव सोडीत नाहीत.
असा प्रकार आपण लेखकांबद्दलहि म्हणू शकतो. नरहर कुरुंदकर, गोविंद तळवळकर, आचार्य अत्रे,
पु. ल. देशपांडे वगैरे लेखकांच्या
विचारांची आर्तता इतकी जबरदस्त आहे की आजही त्या लिखानांचे विचार आपल्याला एक
प्रकारची ऊर्जा देत असतात.
तसेच संगीत क्षेत्राबद्दल म्हणता येईल.
मी जेव्हा बेगम अख्तर बाईंचे,
"ए मोहब्बत तेरे नाम पर रोना आया" ही गजल ऐकतो तेव्हा त्यातील आर्तता माझ्या हृदयाला जाऊन भिडते. त्यावेळीस
गझल शायर की दिलकी आवाज है याचा प्रत्यय येतो. अशी जादू बेगम अख्तरच करू शकत
होत्या. म्हणूनच मला नेहमीच वाटते की जर गायकाला किंवा गायकीला गाण्यातील आर्तता
रसिक श्रोत्यापर्यंत पोचवता येत नाही,
त्यांनी कधीच गाणे सादर करू नये.
त्यासाठी तुम्ही कुमार गंधार्वांची निर्गुणी भजने आणि लोकगीते ऐका. यांचा सुरेख
संगम त्यांनी शात्रीय संगीताशी घातला आहे. त्यांची निर्गुणी भजने ऐकली तर
त्यांच्या रचनेतील आणि सुरातील आर्तता एवढी भव्य आहे की त्यांच्या गायकीतून
निर्माण झालेली सहजता मनाचा ताबा घेतल्या शिवाय राहत नाही. जे निर्गुण आहेत
निराकार आहेत आणि कुमारांनी आपल्या संगीतात इतक्या सुंदरपणे साकारले की त्याची
आर्तता सामान्य श्रोत्यापर्यंत सहजपणे पोचते. म्हणूनच अनपेक्षितपणे एखादा सुंदर
स्वर ऐकू येतो तेव्हा त्यातील आर्तता जाणवत राहतेच.
या लेखाचा शेवट मी एका कवितेने करतो. ती
कविता कोणी लिहिली आहे मला माहित नाही पण ती माझ्या वाचनात आली होती आणि त्याची
आर्तता माझ्यापर्यंत पोचली होती.
*"आतुरलेले मन*
*आणि आसूसलेली धरा*
*भेटीची आर्तता*
*अन अंतराचा दुरावा"*
धन्यवाद
Comments
Post a Comment