*रंग
लेखणीचे परिवार📝*
*आठवडा
क्रमांक : 126*
*विषय
क्रमांक : 2*
*विषय
: अकबराची नवरत्न (माहितीपर लेख)*
*दिनांक
: 17/03/2021*
*शब्दांकन
: योगेश गोगवेकर*
भारतीय
इतिहासात खासकरून वैदिक व प्राचीन संस्कृत साहित्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या
रत्नाचे उल्लेख आढळतात. सामान्यपणे रत्न हे रंगरूपाच्या टिकाऊ आणि दुर्मिळ
असलेल्या खनिजांना म्हटले जाते. अशी बरीच खनिजे असली तरी काही रत्ने महारत्ने
म्हणून ओळखली जातात कारण त्यांच्यात असलेल्या विशेष गुणधर्मामुळे. प्राचीन संस्कृत
साहित्यात अशी महारत्ने नऊ असल्याचा उल्लेख आहे. अशी नवरत्ने वैभवनिदर्शक वस्तू मानली जात आहे. हि
नवरत्ने ओळखण्यासाठी रत्नपारखी नावाचा एक खास वर्ग तयार झाला आणि त्याचे एक
स्वतंत्र शात्र निर्माण झाले. ह्याचा इतिहास फक्त संस्कृत भाषेत नसून इतर भारतीय
भाषेत त्याचा उल्लेख आढळतो. अल्लाउद्दीन खिलजीच्या पदरी असलेल्या ठक्कर फेरू या
अधिकाऱ्याने लिहिलेल्या रत्नपरीक्षा ह्या ग्रंथात नऊरत्नांची नावे दिली आहेत. ती
म्हणजे माणिक, मोती,
पोवळे, पाचू, पुष्कराज,
इंद्रनील, हिरा,गोमेद
व वैदूर्य. अश्या नऊरात्नांचा उपयोग औषध म्हणून सुद्धा होत होता. असाच प्रकार
मानवी प्रकारात आढळून येतो. जुन्या काळात राजे, महाराजे किंवा बादशाह आपल्या दरबारात अनेक गुणी माणसे ठेवीत
असत. अशी माणसे दरबारी रत्ने म्हणून ओळखली जात. सम्राट विक्रमदित्याच्या सभेत जशी
नऊ रत्ने होती तशीच बादशाह अकबराच्या दरबारात नऊ रत्ने होती. हि वेगवेगळी माणसे
आपल्या विषयात जबरदस्त पारंगत होती की त्यांनी स्वतःच्या क्षेत्रात नवी निर्मिती
सुद्धा केली होती.
मोगल
बादशाह अकबर हा भारताच्या मध्ययुगीन इतिहासातील मोगल सम्राट होता. त्याचा जन्म 15 ऑक्टोबर 1542 मध्ये उमरकोट येथे झाला. एका अर्थाने तो सुदैवी आणि दुसऱ्या
अर्थाने तो दुर्दैवी असा सम्राट होता. त्याने 45 वर्षे राज्य केले.त्याचे जन्म नाव बदरुद्दीन होते, ते त्यांनी बदलून जलालउद्दीन म्हणजे
धर्मप्रताप असे ठेवले. तो तेरा वर्षाचा असताना राजा झाला पण त्याचे राज्य अस्थिर
होते. हुमायूनच्या काळापासून प्रत्यक्ष कारभार पाहण्याऱ्या बहरामखान ह्याने त्यास
मदत केली आणि त्याला सत्येवर बसवले. व्यवहारातील टक्केटोमणे खात अकबर राज्यकारभार
चालवू लागला. हेमू बरोबर झालेल्या दुसऱ्या पानिपतच्या युद्धात विजय मिळाल्यामुळे
त्याच्या हाती दिल्लीची सूत्र आली आणि त्याचे राज्य स्थिरावले. पण त्याच्या
स्वतंत्र कारभाराला 1562 पासून
सुरुवात होते. त्याच्या धार्मिक उदारमतवादला सुरवात तेव्हा पासून झाली आणि आपल्या
दरबारात एकापेक्षा एक असे विद्वान आणि सेनापती नेमण्यास सुरुवात केली. त्यात
मुस्लिम तर होतेच पण हिंदू सुद्धा होते. त्यात त्याने अनेक संस्कृत भाषेतील पंडित,
कवी, गायक, वैद्य
यांना प्रवेश दिला. त्याने सर्वधर्मसमभावाचे तत्व स्वीकारून धार्मिक सलोखा निर्माण
करण्याचा प्रयत्न केला.
अकबराने
आपल्या दरबारात
अश्या नऊरत्नांची नियुक्ती केली. ती नवरत्न आपल्या विषयात खूपच पारंगत होती. हि
नवरत्ने कोण आहेत आणि त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत ते आपण पाहू.
*1.राजा
बिरबल*: राजा
बिरबल हा 1563 पासून
अकबराच्या सहवासात आला. हा काल्पी येथे राहणारा एक ब्राह्मण असून त्याचा जन्म 1528
मध्ये झाला. त्याचे मूळ नाव महेशदास
होते. तो मोगल दरबारात विदूषक म्हणून काम करू लागला पण आपल्या गुणांमुळे तो
अकबराचा विश्वासपात्र तर झालाच आणि अकबराच्या निकटच्या सल्लागारापैकी एक झाला.
जनमानसात तो बिरबल या नावाने प्रसिद्ध झाला. तो स्वतः उत्तम कवी, गायक आणि कुशल योद्धासुद्धा होता. 1586
साली स्वातच्या खोऱ्यात अफगाण लोकांनी बंद
केले होते. ते मोडण्यासाठी गेला असताना त्याचा मृत्यू झाला.
*2.राजा
मानसिंग*: राजा मानसिंग ह्याचा जन्म 1550 रोजी झाला. हा एका प्रकारे अकबराचा भाचा होता. तो मोठा
धर्मभिमानी वैष्णव होता. त्याला अकबराने हळदीघाटीच्या युद्धात सेनापती केले आणि
मिर्झा म्हणजे राजघराण्यातील महत्वाची वक्ती अशी पदवी दिली. तो एक कृष्ण भक्त
होता. त्याने अनेक मोहिमांचे नेतृत्व केले. इ. स. 1614 साली तो मरण पावला.
*3.मिया
तानसेन*: ह्याचा जन्म 1500 साली
एका काशीच्या पुजाऱ्याच्या घरी झाला. त्याचे खरे नाव रामतनू पांडेय होते. तो
अकबराच्या दरबारातील प्रसिद्ध गायक होता. त्याने आपले गुरु व मुस्लिम फकीर मुहम्मद
घोंस ह्यांचा उष्ठा घास खाल्याने त्यास पुढे मुस्लिम धर्म स्वीकारावा लागला असे
म्हणतात. तो उच्च दर्जाचा कवी व संगीतज्ञ होता. त्याने सांगितसार आणि रागमाला हे
संगीतावरील दोन ग्रंथ लिहिले आणि नवीन रागाची निर्मिती केली. इ स 1589 मध्ये त्याचा मृत्यू झाला.
*4.राजा
तोडरमल*: ह्याचा जन्म 1500 मध्ये
झाला. सुरवातीला हा शेर सुरीच्या दरबारात मंत्री होता. जेव्हा हुमायून बादशहाचा
शेर सुरीकडून पराभव झाला तेव्हा हुमायूनच्या बायको मुलांची काळजी घेत त्यांना
हुमायूनकडे सुपूर्द केले त्यामुळेच अकबराने त्याला अर्थमंत्री बनवले. तेव्हा
त्याने जमिनीची मोजमाप करून त्यावर महसूल ठरवले. अर्थमंत्री असताना काशी
विश्वेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. तो उत्तम दर्जाचा सेनापती होता. इ. स.1589
साली तो मृत्यू पावला.
*5.फैजी*:
ह्याचा जन्म 1546 साली
झाला असून त्याचे नाव शेख अबू अल-फैज
इब्र मुबारक असे आहे. ह्याचे पूर्वज येमेन मधील असून हा अकबराच्या विश्वासू
लोकांपैकी एक होता. तो एक उत्तम दर्जाचा साहित्यिक होता. त्याला संस्कृत भाषेचे
उत्तम ज्ञान होते आणि त्याने संस्कृत भाषेतील योगवासिष्ठ व लीलावती सारखे ग्रंथ
फारसी भाषेत भाषांतर केले. त्याचा धार्मिक विचारांचा अकबरावर मोठा प्रभाव पडला
होता.
*6.शेख
अबू फझल*: फैजी मुळे शेख अबू फझलहि अकबराच्या सहवासात आला. त्याचा जन्म 1551
मध्ये झाला. तो स्वतंत्र विचारांचा लेखक
होताच पण उत्तम सेनापती पण होता. त्याने ऐने-अकबरी व अकबरनामा हे दोन ग्रंथ
लिहिले. बिरबलानंतर तो अकबराचा प्रमुख सल्लगार झाला. तो फैजीचा धाकटा भाऊ होता. इ. स.1602
साली तो मरण पावला
*7.अब्दुल
रहीम खानखाना*: हा अकबराचा जो पालक होता त्या बहरामखानाचा मुलगा. तो फारशी,
तुर्की, अरबी, संस्कृत
आणि हिंदी भाषेचा विद्वान होता. हिंदी भाषेतील त्याचे दोहे फार प्रसिद्ध आहेत.
त्याने ज्योतिषशास्त्रावर खेटकौतुकम हा ग्रंथ संस्कृतमध्ये लिहिला. त्याचा जन्म 1556
मध्ये असून तो इ. स.1627 मध्ये मरण पावला.
*8.मुल्ला
दोप्याजा*: हा मूळचा अरब होता. त्याचे खरे नाव अबुल हसन असे आहे. त्याला जेवणात
दोन कांदे नेहमीच लागत असे म्हणून त्यास दो प्याजा असे म्हणत. तो अरेबीन भाषेतील
विद्वान होता
*9.हकीम
हुमाम*: ह्याचे नाव फकीर अझीउद्दीन असून त्याचा जन्म 1508 मध्ये झाला. अकबराचा तो राजवैद्य व त्याच्या पाकखान्याचा
प्रमुख होता. इ. स.1572 मध्ये
तो मरण पावला.
अशी
नवरत्ने अकबराच्या दरबारात होती. त्यातले बरेच क्रमाक्रमाने दिवंगत झाले. त्यामुळे
त्याचे अखेरचे दिवस दुःखात गेले आणि त्यामुळे त्याच्या आयुष्यात अनेक विसंगती
निर्माण झाल्या. अखेरीस वयाच्या 63 व्या
वर्षी म्हणजे 1605 मध्ये
अकबराचे निधन झाले.
धन्यवाद
Comments
Post a Comment