*रंग लेखणीचे परिवार*
*आठवडा क्रमांक : 120*
*विषय क्रमांक : 2*
*विषय : उथळ
पाण्याला खळखळाट फार (वैचारिक)📝*
*दिनांक : 02/02/2021*
*शब्दांकन : योगेश
गोगवेकर*
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात माहिती आणि ज्ञान मिळवण्याची सोय एकदम सोपी झाली आहे. पूर्वी एखाद्या गोष्टी बद्दलची माहिती हवी असल्यास ग्रंथालयात जाऊन पुस्तके पाहावी लागत असत. आता ही माहिती इंटरनेटद्वारे सहज उपलब्ध होते. टीव्ही, कॉम्प्युटर आणि मोबाईल फोनमुळे माहितीचा साठा खुला झाला आहे किंवा विस्तारलेला आहे. त्यामुळे आपली क्रयशक्ती वाढण्यास खूपच मदत झाली आहे. तरीसुद्धा एका गोष्टीची उणीव वाटू लागते ती म्हणजे सहज मिळवलेली माहिती बरोबर आहे की चुकीची आहे किंवा मोकळ्या व्यासपीठावरून मांडण्यात आलेले विचार योग्य आहेत की अयोग्य. कारण बऱ्याचदा माहितीद्वारे मांडलेले विचार उथळ असण्याची शक्यता अधिक असते. त्यासाठी सखोल ज्ञानाची गरज आहे. म्हणूनच मिळालेल्या माहितीचे विश्लेषण नीटपणे होण्याची गरज आहे. अन्यथा उथळ पाण्याला खळखळाट फार असेच म्हणावे लागेल.
माहिती आणि ज्ञानामध्ये खूप अंतर आहे. त्यातील फरक जाणून घेण्याची फार गरज आहे. अनेकदा माहितीलाच ज्ञान समजण्याची चूक बहुतेक लोक करत असतात. काही लोक स्वतः उच्च शिक्षण घेतल्यावर स्वतःस ज्ञानी समजू लागतात आणि आपण जी काही माहिती देतो ती पूर्णपणे बरोबर आहे असे समजत असतात. पण आपण दिलेली माहिती ही कशाच्या आधारावर आहे हे ते सांगत नसतात. जगात असे बरेच विद्वान आहेत की त्यांनी शालेय शिक्षणसुद्धा पुरे केलेले नसते तरीही त्यांना ज्ञानी म्हटले जाते. कारण त्यांनी मिळालेल्या माहितीचा वापर आपल्या अनुभवातून करून जगाच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.त्यासाठी दोन उदाहरणे पाहू. एक सर विन्स्टन चर्चील ह्यांचे आहे. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी बजावलेली भूमिका फारच लक्षणीय आहे.चर्चील ह्यांचे शालेय शिक्षण जरी झाले नसले तरी त्यांनी वाचनाचा उपयोग करून माहिती गोळा केली आणि स्वतःचे ज्ञान वाढवून त्या ज्ञानाचा वापर अनेक ठिकाणी करून जगाला हुकूमशाहीच्या विळख्यातून मुक्त केले. दुसरे उदाहरण द्यायचे झाल्यास महात्मा गांधी ह्यांचे देता येईल. एक उच्च शिक्षित सामान्य माणूस मिळालेल्या माहितीचा वापर आपल्या अनुभवातून करून जगाला माणुसकीचे नवीन तत्वज्ञान देऊन महात्मा झाला. त्यामुळे शिक्षित किंवा कमी शिक्षित असलेल्याना माहितीचा वापर त्याचे विश्लेषण करूनच मांडावे लागते. कारण ज्ञानात विचार आणि विवेक असतो. नाहीतर दिलेली माहिती ही उथळ होईल आणि म्हणावे लागेल उथळ पाण्याला खळखळाट फार.
माहिती आणि ज्ञान ह्या मध्ये बरेच अंतर आहे असे सांगताना सुप्रसिद्ध लेखक आणि समाजसेवक कपिल तिवारी म्हणतात की माहिती मानवाला ज्ञानाकडे घेऊन जाण्यास मदत करते. त्यासाठी अक्षरांची जाण असावीच लागते. ते पुढे म्हणतात की आजच्या युगात माहिती तंत्रज्ञानाने ज्ञानाची जागा घेतली आहे.शिक्षण, विज्ञान, शोध, कला, उद्योग व बौद्धिक चर्चाही माहिती प्रसारणाच्या संदर्भात आणल्या जात आहे आणि माहिती भंडार असलेल्या ज्ञानात ते विस्थापित झाले आहे. त्यामुळे ज्ञानाची चुकीची कल्पना केली जाते. हे सर्व सांगताना कपिल तिवारी म्हणतात की ज्ञान आपल्याला बदलण्याचे आव्हान करते. ते आपले अंतस्थ्य, आपली चेतना, आपले विचार सर्व बदलते आणि आपणास अर्धसत्य नाकरण्यास मदत होते. जे सत्याचे अनुकरण करीत नाही, चुकीच्या गोष्टी सांगून अर्धसत्य सांगतात ते सर्व काही उथळ आहे आणि खोट्यापेक्षाही अधिक धोकादायक आहे. म्हणूनच खेदाने म्हणावे लागते उथळ पाण्याला खळखळाट फार.
आज व्हाट्सअप किंवा फेसबुक सारख्या सोशल मीडियावर कुठून तरी काही तरी ऐकलेली किंवा वाचलेली चुकीची माहिती सांगितली जात आहे. त्यावर अनेकजण विश्वास ठेवत आहे. त्यांना मिळालेल्या ह्या अर्धवट ज्ञानातून दूर होण्याची त्यांची तयारी दिसत नाही. जर त्यांना सत्य सांगण्याचा प्रयत्न केला तर तूच काय तो विद्वान अशी विधाने करतात. त्यामुळे आजच्या तरुणांमध्ये चुकीची माहिती पसरून त्यांची दिशाभूल होते आहे. त्यासाठी त्यांना ज्ञान मिळवण्याच्या प्रक्रियेकडे वळवावे लागेल. माहिती आणि ज्ञान ह्यातील फरक त्यांना उलगडून दाखवावा लागेल. त्यासाठी आवश्यक असलेल्या पुस्तकांचे वाचन करण्यास भाग पाडावे लागेल. आपले विचार सकस आणि सकारात्मक बनवायचे असतील तर वाचन गरजेचे आहे. त्यामुळे वैचारिक क्षमता प्रबळ होण्यास मदत होईल. नाहीतर अर्धसत्यामुळे ज्ञान उथळ होईल.
सोशल मीडिया इतका काही वाईट नसून त्याचा वापर आपण कसा करतो आणि तो वापरण्याचा आपला दृष्टीकोन कसा आहे ह्यावर अवलंबून आहे. माहितीचा आधार घेऊन आपल्या कौशल्याने आणि अनुभवाने समस्या सोडवण्याची कला म्हणजे ज्ञान. म्हणून ज्ञान वाढवण्याचा आपणास सराव करावा लागेल. मेहनत घ्यावी लागेल. ज्ञान मिळवण्यासाठी माहितीचा वापर जरूर करावा लागेल. त्यासाठी माहिती नुसती अचूक होऊन भागणार नाही तर त्यावर काम करून अचूक विश्लेषण काढावे लागेल म्हणजे ज्ञान वाढेल आणि अचूक माहितीची निर्मिती होईल. नाहीतर अर्धसत्यावर आधारलेल्या चुकीच्या माहितीवर अनेकजण स्वार होतील आणि खेदाने म्हणावे लागेल उथळ पाण्याला खळखळाट फार, म्हणजे जेथे थोडे असते तेथे गर्जना किंवा गर्व फार.
धन्यवाद
Comments
Post a Comment