*रंग लेखणीचे परिवार *
*आठवडा क्रमांक 117*
* दिनांक : 12/01/2021*
* विषय क्रमांक : 5*
* विषय : पतंग -संक्रांत विशेष (वैचारिक)
*
* शब्दांकन : योगेश गोगवेकर *
संक्रमण म्हणजे क्रमण करून जाणे. एका वर्षात सूर्य आपणास बारा राशींतून जाताना दिसतो. ह्याचाच अर्थ एका वर्षात बारा संक्रमणे होत असतात. पण सूर्याची दोन संक्रमणे महत्वाची मानली जातात. ती म्हणजे मकर आणि कर्क राशींतील संक्रमणे. सूर्य जेव्हा मकर राशी मध्ये संक्रमण करतो तेव्हा सूर्याची गती उत्तरेकडे वळल्याचे दिसून येते कारण दिवस क्रमाक्रमाने वाढत जातो आणि रात्र कमी होत जाते. ह्या संक्रमाणाला उत्तरायण असे संबोधतात. हा प्रकार हिंदू महिन्याच्या पौष महिन्यात घडतो. जेव्हा सूर्य कर्क राशीत संक्रमण करतो तेव्हा त्याची गती दक्षिणेकडे वळल्यामुळे रात्र मोठी होत जाते. ह्या संक्रामणांस दक्षिणायाण असे म्हणतात. हे संक्रमण हिंदू महिन्याच्या आषाढ महिन्यात होते. जेव्हा सूर्याचे संक्रमण मकर राशीत पहिल्यांदा होते, त्या दिवशी मकर संक्रांत हा मोठा सण साजरा केला जातो. भारतीय परंपरेनुसार हा सण प्राचीन सणांपैकी एक मानाला जातो.
मकरसंक्रांत हा सण भारत, नेपाळ आणि श्रीलंकेत प्रामुख्याने पाळला जातो. नेपाळमध्ये त्यास माघे संक्रांती म्हणतात. भारतात तो वेगवेगळ्या प्रदेशात वेगळ्या नावाने ओळखला जातो. उत्तरेत हिंदू आणि शीख त्यास लोहारी म्हणतात तर राजस्थान व मध्यप्रदेशमध्ये त्यास सुकर्त म्हणतात. आसाममध्ये भोगली बिहू तर तामिळनाडू आणि दक्षिण भारतात त्यास पोंगल असे म्हणतात. ह्यास बंगाल मध्ये पौष पार्बन आणि ओरिसात व महाराष्ट्रात मकर संक्रात म्हणतात. प्रत्येक प्रदेशात त्यांच्या पद्धती प्रमाणे त्यांची नावे आढळतात. जरी ह्या सणाची नावे वेगळी असली तरी सगळीकडे हा दिवस सूर्याला समर्पित केला जातो. ठिकठिकाणी शास्त्राच्या नियमाप्रमाणे विधी केले जातात. काही ठिकाणी स्नान, दान करून दिवसा भोजन करतात आणि महादेवास तीळ तांदूळ वाहून तिळाचे दिवे लावतात. दक्षिण भारतात विवाहित मुलीकडून पहिल्या वर्षी तेल, कापूस, मीठ, जिरे वैगरे जिन्नस काही सुवासिनीस देण्याची प्रथा आहे. महाराष्ट्रात तीळगुळ वाटतात आणि सौभाग्यवती स्त्रिया आणि कुमारिका आपल्या मैत्रिणीस भेटून हळदीकुंकू व तीळगुळ देतात. तीळगुळ वाटताना तीळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणतात. दक्षिणेत खीर शिजली का? असे विचारतात. हे सर्व करण्याचे कारण म्हणजे ह्या दिवशी आपले शत्रूत्व विसरून आपापसात प्रेम वाढावे आणि प्रगती होऊन मानावधर्माचे कल्याण व्हावे. त्यासाठी ह्या दिवशी तीळ वापरून गोड प्रदार्थ करतात. तामिळनाडूमध्ये लोक तांदुळाची खीर दूध आणि गूळ वापरून करतात.
वर्षभरातील हिंदुचे सण पाहिले तर त्यांच्या तारखा ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार बदललेल्या असतात पण मकरसंक्रात हाच एक सण असा आहे की त्याची तारीख सहजा बदलत नाही. फक्त दर आठ वर्षांनी तो एक दिवसाने पुढे ढकलला जातो म्हणजे तो 14 जानेवारी ऐवजी 15 जानेवारीस येतो. ह्याचे कारण असे की सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस सौर दिनदर्शिके प्रमाणे एकच असतो आणि तो ग्रेगोरिअन दिनदर्शिके प्रमाणे 14 जानेवारी असतो. जर सूर्याचा प्रवेश मकर राशी मध्ये 14 जानेवारी रोजी संध्याकाळी झाला तर त्याचा पुण्यकाल दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 जानेवारीस मान्य केला जातो. इतर सर्व सण लुनार दिनदर्शिकेवर चंद्राच्या गतीवर अवलंबून असतात. पण चंद्राची गती अनियमित असते. त्यामुळे ग्रेगोरियन दिनदर्शिकेच्या तारखा बदलत असतात.
मकर संक्रातीचा दिवस हा शुभ मानून अनेक जण नवीन रंगबेरंगी कपडे तर घालतातच, पण त्यादिवशी आकाशात रंगबेरंगी पतंग उडवण्याची प्रथा आहे.पतंग हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ उडणारा असा आहे. ह्या दिवशी पतंग उडवणे हा महत्वाचा धार्मिक कार्यक्रम मानला जातो. हि प्रथा रामायणाच्या वेळेपासून असल्याचे म्हटले जाते. श्रीरामाने मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवला होता आणि तो इंद्रलोकमध्ये गेला होता अशाही पौराणिक कथा वाचनात येतात. मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंग उडवणे आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते.कारण ह्या दिवशी वातावरण थंड असते आणि शरीराची हालचाल हि मंदावलेली असते. ह्या दिवशी पतंग उडवल्यामुळे शरीराची हालचाल तर होतेच पण अंगावर सूर्यकिरण पडल्यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते आणि मानसिक तणाव कमी होऊन मन प्रसन्न राहते.
मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याचे धार्मिक व शास्त्रीय महत्व असले तरी पतंगाचा शोध हा प्राचीन आहे. पाहिला पतंग चीन मध्ये विफांग (WEIFANG) ह्या गावी उडवला गेला असे म्हणतात. कारण पतंग तयार करण्यासाठी लागणारे रेशीम कापड, पतंगाला आधार देणारा बांबू आणि मजबूत रेशीम धागा चीन मध्ये उपलब्ध होते. तिथे पतंगाची पूजा करून मगच उडवला जातो. तसे केल्याने सर्व अशुभ गोष्टी दूर होतात आणि सर्व शुभ कार्यात यश मिळत राहते असा समज तिथे आहे. विफांगमध्ये आंतराष्ट्रीय पतंगोत्सवाचे आयोजन केले जाते तेव्हा बहुतेक देश त्यात भाग घेतात .जपानमध्ये पतंगाला ओक्टॉपस म्हणतात आणि तो उडवून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. ह्या देशातील नागसाकी शहरात वर्षाच्या तीसऱ्या महिन्यातील 3,10, 15 व 25 तारखेला पतंग उडविले जातात. ते असे का करतात हे मात्र समजत नाही. कोरिया देशामध्ये पतंगावर आपली इच्छा लिहून उडावीला जातो. तसे केल्याने आपल्या इच्छा पूर्ण होतात अशी समजूत आहे. जगाच्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या कारणाने पतंग उडवले जातात. भारतात पतंग अनेक भागात उडवला जातो आणि त्याचा आनंद सर्व धर्मीय घेताना दिसतात. भारतातील गुजरात राज्यामध्ये पतंगोत्सव मोठया प्रमाणात साजरा केला जातो. ह्यात अहमदाबाद शहर अग्रेसर आहे. परंतु पतंग उडविण्यासाठी लागणारा धागा सुरत आणि नवसारी इथून मागवत असले तरी पतंग आणि मांजा (पतंगाचा धागा ) बनवणारे परंपरागत कारागीर मुंबईत आहेत. त्यांनी आपल्या क्षेत्रात बरीच प्रगती केली आहे.आता मुंबईप्रमाणे आग्रा, मथुरा, वरेली, लखनौ मध्येही पतंग आणि त्यासाठी लागणारे धागे बनविले जातात.
माणूस प्रत्येक गोष्टीतून स्वतःचा फायदा कसा होईल हे नेहमी पाहत असतो. त्यास पतंगसुद्धा अपवाद नाही. पतंगाद्वारे पहिला वैज्ञानिक प्रयोग Alexander Wilson
ह्या वैज्ञानिकाने केला. त्याने पतंगाला थर्मामीटर बांधून वादळाचे हवामान पाहण्याचा प्रयत्न केला. पुढे हा प्रयोग बेंजमीन फ्रँक्लीन ह्याने 1952 मध्ये यशस्वी करून दाखवला. अशा प्रकारे अनेक प्रयोग हवेतील निरनिराळ्या थराचे तापमान मोजण्यासाठी पतंगाचा वापर करण्यात आला. एकोणीसाव्या शतकात भारतात पतंगाचा प्रसार सर्वत्र झाला. समुद्रकिनाऱ्यावर तो लवकर उडतो आणि कमी वाऱ्यात तो उडण्यासाठी वेळ घेतो. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात पतंगाने सुद्धा भाग घेतल्याचा पुरावा उपलब्ध आहे. जॉन सायमन ह्या ब्रिटिश माणसाच्या विरोधातील चळवळ आपणास माहित असेल. भारतीय वैधानिक आयोगाचे ते अध्यक्ष होते. ह्या आयोगाला भारतीय नेत्यांचा विरोध होता. ह्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांचे भारतात आगमन झाले होते. सर्वत्र गो बॅक सायमन हि घोषणा देण्यात येत होती. जेव्हा ते लखनौच्या केसरबागेतून जाणार होते, तेव्हा आजूबाजूला सशस्त्र सैनिकांचा बंदोबस्त होता. त्यावेळी लखनौ मधील लोकांनी पतंगावर गो बॅक सायमन लिहून ते उडवू लागले. हे पाहून सायमन साहेबांचा राग अनावर झाला आणि एका मुलाकडे जाऊन त्याचा पतंगाचा दोर कापून टाकला. परंतु असे असंख्य पतंग सायमन साहेबांच्या डोक्यावरून उडत होते.
अशाप्रकारे पतंग आपल्याला आनंद आणि शुभ संदेश देऊन आपले मन प्रसन्न ठेवतो. जेव्हा तो मकरसंक्रातीला उडवण्यात येतो तेव्हा आपल्या आरोग्यास ऊर्जा मिळून आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
Comments
Post a Comment