*रंग लेखणीचे परिवार*
*आठवडा क्रमांक :116*
*विषय : लेखानाचे ध्येय : गुणवत्ता कि प्रमाण
*
*दिनांक :08/01/2021*
* शब्दांकन : योगेश गोगवेकर*
लेखक आपले लिखाण वेगवेगळ्या रूपात ठेवत असतो. कधी तो कविता लिहितो तर कधी कथा, कधी तो कादंबरी लिहितो तर कधी साहित्यावरची समीक्षा, कधी सामाजिक, आर्थिक किंवा राजकीय घडामोडीवर भाष्य करतो तर कधी इतिहासावर विवेचन. हे सर्व करत असताना लेखकांस स्वतःचे आत्मचिंतन करून ज्ञान प्राप्त करणे जरुरीचे आहे. मग ते शब्दामध्ये उतरवताना प्रत्येक शब्दांचे भान व्यवस्थितपणे हाताळणे गरजेचे आहे. त्यासाठी अवांतर वाचनाची खूप आवश्यकता आहे. कारण वाचनामुळे तुलनात्मक मुद्ये व्यवस्थितपणे लिहिता येतात. जर लिखाण एखाद्या इतिहासाचा संदर्भ घेऊन करणार असेल तर त्या संदर्भाची सत्यता गुणवतेच्या आधारे पडताळणे फार आवश्यक आहे आणि त्यातील कोणताही मुद्या लांबलचक पद्धतीने न मांडता सोप्या आणि ओघावती भाषेत मांडणे जरुरीचे आहे.
लेखानातून व्यक्त होणारा अनुभव स्वयंपूर्ण, उत्कट व सलग असतो असे सांगून सुप्रसिद्ध विचारवंत आणि लेखक नरहर कुरुंदकर म्हणतात की खरा प्रतिभावंत लेखक आपल्या लेखानात बोध आणि रंजन दोन्हीच्याही चौकटी ओलांडून मुक्त झालेला दिसतो. त्यासाठी ते शरतचंद्र सारख्या जीवनवादी लेखकाचे उदाहरण देऊन त्यांच्या लेखानाचे मोठेपण बोधवादी आणि रंजनवादी दोघांनाही कसे मान्य आहे, हे उदाहरण देऊन स्पष्ट करतात. पुढे कुरुंदकर म्हणतात की कुठल्याही लेखानामध्ये खरे महत्व लेखकाच्या भूमिकेला नसून, खरे महत्व लेखनकृतीच्या स्वरूपाला व तिच्यातील अनुभवाच्या स्वरूपाला आहे. त्यामुळे प्रत्येक लेखकाला जीवनाचे आकलन व अवलोकन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. हे सर्व गुणवत्तेच्या आधारे केल्यास एक चांगली निर्मिती झाल्याचे समाधान वाचकास मिळेल.
गुणवत्ता प्रमाण मानून लेखन करणारी लेखिका म्हणजे इरावती कर्वे. त्यांनी बरेच लिखाण केले आहे. पण त्यांनी महाभारतावर लिहिलेले युगान्त हे पुस्तक मला खूप आवडते. ते वाचत असताना एक वाचक म्हणून एक गोष्ट जास्त जाणवते ती म्हणजे महाभारतावर त्यांनी केलेला अभ्यास. युगान्त वाचताना त्यांनी लिहिलेले महाभारतातील प्रत्येक व्यक्तिमत्ववरील लिखाण हे खूप मौलिक आणि महत्वाचे असल्याचे जाणवते. त्यातील भीष्म आणि कृष्णावरील लेख छान तर आहेच पण गांधारी आणि द्रौपदी वरील लेख आपल्याला वेगळ्या पद्धतीने विचार करण्यास भाग पाडतात. कर्णा वरील त्यांचा लेख कर्णाकडे वेगळ्या प्रकारे पाहण्याचा दृष्टीकोन देतो. त्यांचे हे लेखन अनेकांना आवडेल की नाही हे माहित नाही पण त्यांनी केलेले महाभारताचे आकलन इतके छान आहे की त्यातील प्रत्येक पात्राचा शोध आपण वर्तमानकाळाच्या पद्धतीने घेत असतो.
गुणवत्तेच्या आधारावर वाचण्यात आलेली अजून एक निर्मिती म्हणजे रणजित देसाई ह्यांनी लिहिलेली ऐतिहासिक कादंबरी श्रीमान योगी. ह्यात ऐतिहासिक सत्य सांगताना देसाईने कल्पनेचा वापर खूपच सुंदर पद्धतीने केला आहे. ही कादंबरी त्यांनी शिवाजी महाराजांवर लिहिली आहे आणि महाराजांचे व्यक्तीमत्व प्रत्येक लेखकला आव्हान असते. रणजित देसाईने ते आव्हान स्वीकारून एक सुंदर कलाकृती कादंबरीच्या रूपाने सत्य घटना सांगत ठेवली आहे.ह्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिताना नरहर कुरुंदकर लिहितात, " सामाजिक कादंबरीसमोर आकलन -अवलोकन यांसाठी सामाजिक वास्तव असते, ऐतिहासिक कादंबरीसमोर ऐतिहासिक वास्तव्य असते. ह्या वास्तवाचा स्वीकार करून निर्मितीच्या आकाशात पंख पसरून झेप घ्यावयाची असते. या प्रतिक्रियेत एकीकडे कलेच्या पातळीवर सत्य साकार होत असते, नवनिर्मिती होत असते व दुसरीकडे कलाकृती जन्म घेत असते ".
अजून एका पुस्तकाचा उल्लेख इथे करावसा वाटतो ते म्हणजे तिमिरी एन मुरारी ह्यानी लिहिलेले तालिबान क्रिकेट क्लब. ह्यात लेखाकाने तालिबान सरकारच्या काळात अफगाणिस्तानातील महिलांचे जीवन कसे तणावग्रस्त होते हे सांगताना महिलांच्या भीतीदायक जीवनाचे वास्तवादी चित्र उभे केले आहे. ह्यात लेखाकाने तालिबान सरकारच्या कारकिर्दीत घडलेल्या घडामोदींचा व्यवस्थित अभ्यास केल्याचे जाणवते.
गुणवत्तेचा आधार घेऊन अनेक लेखकांनी आपल्या लिखाणाची निर्मिती केली आहे. मग ती निर्मिती मराठीत असो किंवा इंग्रजीत. ती कलाकृती वाचताना वाचक म्हणून मिळालेला आनंद खूप वेगळा असतो. त्यासाठी अनेक पुस्तकांची नावे सांगता येतील. त्यात कादंबरी, कथा, ऐतिहासिक विश्लेषण वगैरे अनेक प्रकार आहेत. त्यामुळे लेखकांनी प्रमाणापेक्षा गुणवत्तेवर अधिक लक्ष द्यावे कारण गुणवत्ताच आपल्याला चांगल्या प्रकारचे लिखाण देऊ शकते मग ते लिखाण जास्त केल काय किंवा थोड केले काय त्यामुळे काही फरक पडत नाही, फक्त लिखाणाचा विषय स्पष्ट झाला पाहिजे. त्यामुळे वाचकांच्या विचारांना स्पष्टता लाभते आणि ज्ञानाचा किंवा माहितीचा प्रसार होण्यास मदत होऊ शकते.
Comments
Post a Comment