*रंग लेखणीचे परिवार*
*आठवडा क्रमांक 114*
*सॉरी : मर्मबंधातली ठेव ही ( वैचारिक)
*
*शब्दांकन : योगेश गोगवेकर*
*दिनांक :26/12/2020*
बहुतेक माणसे काही ना काही छंद जोपासत असतात. मला पुस्तकांचा संग्रह करून वाचण्याचा आणि त्यातील उपयुक्त माहिती नोंद करून ठेवण्याची आवड आहे. मग ती पुस्तकं राजकीय इतिहासा बद्दल असो किंवा चित्रपटा बद्दल असो किंवा क्रिकेटच्या खेळाबद्दल असो. तो वाचण्यात मला खूप आनंद मिळत असतो. जसा आनंद मला पुस्तकं वाचल्यामुळे मिळतो, तसाच आनंद मला क्रिकेटचे सामने बघताना आणि भारतीय संगीत ऐकतानाही होतो. मग तो क्रिकेटचा सामना कुठलाही असो, त्याच्या हारजीत पेक्षा त्या खेळाची सुंदरता बघण्यात मजा येते. तसेच भारतीय संगीताबद्दल. मला वेगवेगळ्या प्रकारचे संगीत ऐकायला खूप आवडते.
हल्लीच माझ्या एका शालेय वर्ग मैत्रीणेने अहीर भैरव रागातील अलबेला साजन घर आयो ही बंदिश आमच्या शाळेच्या Whatsup ग्रुप वर पाठवली. ती बंदिश गायली होती अबी आणि अंतरा नंदा ह्यांनी. ती ऐकत असताना अनेक आठवणी जाग्या झाल्या. त्यातील एक आठवण झाली ती म्हणजे कुमार गंधर्व ह्यांनी सादर केलेले भैरव रागाचे अनेक प्रकार. ही गोष्ट माझ्या मैत्रिणीला सांगताच तिने कुमारांनी सादर केलेला भैरव के प्रकार ह्या कार्यक्रमाची रेकॉर्डिंग Whatsup वर पाठवली. ती ऐकून झाल्यावर मन प्रसन्न झालं. त्यात कुमारांनी भैरव रागा बरोबर अहीर भैरव, शिवमत भैरव, गुणकली, भवमत भैरव, बिहद भैरव आणि भैरव रागातील तुकाराम महाराजांचा एक अभंग गायाला आहे. त्यात असलेले भवमत भैरव आणि बिहड भैरव हे दोन राग कुमारांची निर्मिती आहेत. कुमारांनी हे भैरव रागातील वेगवेगळे प्रकार अशाप्रकारे गायले की ते मनाला सहज भिडतात. कुमारांनी अशी किमया अनेक रागासाठी केली आहे.
कुमार गंधर्व म्हणजे भारतीय संगीत सृष्टीतील अखंड झरणारा प्रचंड प्रवाह. त्यांनी संगीतातील पारंपरिक पद्धती मोडून काढल्या आणि शात्रीय संगीतातील व्याकरणाचा वापर करून त्यातील कलात्मक सौंदर्य अगदी सहजपणे सादर केले. ते सर्व करू शकले कारण त्यांची श्रुतीवर असलेली हुकूमत, स्वरांचे असलेले उत्स्फूर्त ज्ञान आणि रागाच्या मूळ स्वरूपाचे अचूक अध्ययन. ते नेहमी म्हणत असत की बंदिश बनवली जात नाही, ती स्फूरते व स्वर, लय आणि रागसकट साकार होते. त्यांच्या मते राग फक्त गायचा नाही तर त्याला बंदिशीच्या माध्यमातून नटवायचे आहे. ह्याचा अर्थ कुमारजी पारंपरिक घराणे पद्धतीवर टीका करत होते किंवा त्यांना ती पद्धत मान्य नाही असा बिलकुल नाही. उलट ते अनेक घरांणे गायकांचे चाहते होते.त्यांच्या मते परंपरा ही एक वाहती नदी आहे त्यात आपण कधी दोनदा पाऊल टाकत नाही. जेव्हा ते वाहणे थांबेल, तेव्हा नवीन निर्मिती होणार नाही. त्यांचा विरोध घराणे पद्धती मधील एकमुखी पणाला आणि नक्कल करण्याला होता.
कुमारांकडे ख्याल, ठुमरी, टप्पा, तराणा , भजन आणि अभंग ह्या संगीताचा प्रचंड संग्रह होता. आयुष्याच्या सुरुवातीला क्षय रोगाचा त्रास सहन करत कुमारांनी परत आपली गायकी सुरु केली. त्यानंतर त्यांनी अनेक रागांची निर्मिती केली. त्यातील प्रमुख रागांची नावे देत आहे. मालवती, अहिमोहिनी, गौरी बसंत, लंकेश्री, संजारी, लगन गांधार , मधवा, सहेली तोडी, भवमत भैरव, बिहाड भैरव, चैती भूप, दुर्गा केदार, नंद केदार आणि गांधी मल्हार. नवीन निर्मिती रागांबरोबर त्यांनी अनेक कार्यक्रम सुद्धा केले आहेत. ते असे आहेत. गीतवर्षा, मला उमजलेले बाल गंधर्व, तुकाराम: एक दर्शन, ठुमरी टप्पा तराणा, गौड मल्हार दर्शन, तुलसी : एक दर्शन त्रिवेणी ( कबीर, मीरा आणि सूरदास ह्यांच्या वरील कार्यक्रम ) आणि निर्गुण भजनाना शास्त्रीय रागरूप देणे. याशिवाय त्यांनी संगीतावर ग्रंथलेखन केले आहे तसेच बंदिशीची रचना लिहून ठेवली आहे.
कुमारांच्या बऱ्याच रेकॉर्डिंग्स उपलब्ध आहेत. पण मला त्यांची निर्गुण भजनावरील रेकॉर्डिंग खूप आवडते. त्यात त्यांनी संगीतातील असंख्य पैलूचे दर्शन घडवले आहे. त्यामुळेच त्यांच्यातला विचारवंत आणि प्रतिभासंपन्न गायक कलाकाराची ओळख होते. म्हणूनच ते नुसते गायक नव्हते, ते नायकही होते. कारण नायक चिजाही करतो, ज्ञानीही असतो आणि गवई सुद्धा असतो.
आज कुमार आपल्यात नाही. त्यांना जाऊन एकोणतीस वर्षे झाली. त्यांनी निर्माण केलेल्या गोष्टी पुढे येण्याऱ्या अनेक पिढीला उपयुक्त होतील. त्यांचा अनोखा दृष्टीकोन त्यांचे शिष्य किंवा अनुयायी आम्हा सर्वापर्यंत पोचवतील.
कारण हा अमूल्य ठेवा आहे, सॉरी : मर्मबंधातील ठेव ही.
Comments
Post a Comment