*रंग लेखणीचे परिवार*
*आठवडा क्रमांक: ११३*
*विषय क्रमांक- ४: जगण्यात मौज आहे (कथा)*
*शब्दांकन : योगेश गोगवेकर*
हल्लीच सुंदराबाई हॉल मध्ये पुस्तकांचे प्रदर्शन लागले होते. तेथे काही पुस्तकं विकत घेत असताना माझ्या पाठीवर एक थाप पडली. मागे वळून पाहतो तर माझा कॉलेज पासून असलेला मित्र शंतनू होता. खूप दिवसांनी आम्ही भेटत होतो. आम्ही पुस्तके घेऊन बाहेर आल्यावर बराच वेळ बोलत उभे राहिलो आणि जुन्या आठवणी काढत आजपर्यंत काय केले यावर चर्चा करत राहिलो.
तो मला सांगत होता आज माझ्याकडे सर्व आहे. मुंबईत दोन घरं आहेत, वीकएंड साठी पुण्याजवळ एक सुंदर घर बांधले आहे. आजच्या स्पर्धात्मक जगात इतका गुंतून गेलो की त्यातून बाहेर येणे जमलेच नाही. सर्व काही मिळवले, लग्न झालं, मुलं झाली आणि वाटलं आता मस्त पैकी आराम करून आयुष्य घालवू. पण कसले काय! वाढत्या वयाबरोबर स्पर्धेमध्ये भाग घेणे अशक्य होऊ लागले. आता तर ऑफिसची कामे फोनवर होऊ लागली होती. शरीर सहज पणे साथ देत नव्हते. घरात सर्वाना त्यांची त्यांची कामे होती, त्यामुळे आपापसातील संवाद कमी होत गेला. मित्र हि आता भेटत नव्हते. रोजचे कार्यक्रम तेच तेच होते आणि नवीन काय घडत नव्हते. कुणाला आता आपली गरज नाही असे वाटत होते. थोडक्यात आयुष्य जगण्याचा कंटाळा आला होता.
आणि अचानक एका संध्याकाळी You Tube वर बेगम अख्तर ह्यांनी गायलेली पिलू रागातील एक गजल मिळाली आणि लगेच चालू केली. ती गजल होती " दूर है मंझिल, राहे मुश्किल, आलम है तनहाई का ". बेगम अख्तर ह्यांच्या सुरांनी साजलेले ते शब्द अधिक अर्थपूर्ण वाटले. ह्या गजलमध्ये म्हटल्याप्रमाणे अजून आपले ध्येय गाठण्यासाठी वाट कठीण आहे तरीपण एकट्यानेच चालायला हवे. तेव्हा एक गोष्ट जाणवली ती म्हणजे बेगम अख्तर म्हणजे सर्व वातावरणात भरून राहिलेला स्वर आणि रसपूर्ण अविष्कार! त्यासाठी परत एकदा बेगम अख्तर नव्याने ऐकू लागलो. त्याचबरोबर कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, माणिक वर्मा, वगैरे ऐकू लागलो आणि परत एकदा आयुष्याची मजा घेऊ लागलो. स्पर्धात्मक जगापासून हळू हळू बाजूला होत परत एकदा क्रिकेटचा खेळ पाहू लागलो, गाण्याची मैफिल ऐकू लागलो, नवीन कथा कादंबरी वाचू लागलो आणि वाटू लागले कुणीतरी नव्याने गात आहे, कुणी काहीतरी लिहीत आहे, कुणी परत एकदा आपली चित्रकला सादर करीत आहेत. त्यामुळे परत एकदा जीवनाकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन बदलला आणि वाटू लागले की अजूनही जगण्यात मौज आहे.
आयुष्य जरी लहान असले तरी मोकळ्या मनाने ते जगण्यास पुरेसे आहे. वेगवेगळ्या गोष्टींचा आस्वाद घेत मजा करू कारण जगण्यात मौज आहे.
मुंबई
19/12/2020
Comments
Post a Comment